विलक्षण कथा .... काही सांगायची गरज नसते...काही ऐकायची गरज नसते...फक्त असणे पुरते.....आशुतोष तू जिंकलीस रे...
काय झालं...? – आशुतोष पुरोहित
शेवटी न रहावून तिनं स्टेटस अपडेट केलंच... ' Got Deeply Hurt... ' दुसऱ्या सेकंदाला तिच्या account वर msgs चा पाऊस...
"काय झालं ?", "काय झालं ?", "काय झालं ?".... एकंच प्रश्न वेगवेगळ्या सुरात चिवचिव करायला लागला.. "काय झालं...?" !!! एक खूप मोठं उत्तर असणारा, दोनच शब्दांचा छोटा प्रश्न...! सुरुवातीला तिलाही जरा दोन क्षण ' भारी' वाटलं.. आपली कोणीतरी काळजी करतंय हे पाहून.. पण, जो माणूस खरंच दुखावला गेलाय, तो त्याचं दुःख,
'काय झालं ?'
या, दुधाचा रतीब घालावा, इतक्या सहजतेने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नाहीच कोंबू शकत...
तिला कोणाकोणाला काय काय सांगावं कळेना.
मग तिनेही generalच, 'nthng much' असा थंड reply दिला.. काही चिवट(किंवा चावट) मित्र-मैत्रिणींनी पाठपुरावा केला... पण ते तेवढ्यापुरतंच..
तिचा प्रेमभंग वगैरे झाला नव्हता. पण कोणाच्यातरी अनपेक्षित वागण्यामुळे, ती आतून पुरती हलली होती..ढासळली होती.. पण, ' Got Deeply Hurt 'हे तीन शब्द, आतून किती चिरलं गेल्यावर मग पोतडीतून बाहेर काढायचे असतात, हे अनेकांना माहिती नसते. प्रत्येक गोष्टीत वरचेवर फक्त दुःखच वेचणार्यांना ते नाहीच कळायचं..!
एवढ्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला. भरून आलेला ढग डोंगराशी थटल्यावर फुटावा, तसं, तिकडून "हॅलो" ऐकल्याबरोबर, ही धायमोकलून रडायला लागली.. ५-७ मिनटं ती फक्त रडत होती.. फक्त रडत...
रडणं थांबल्यावर ती एकच वाक्य म्हणाली, "Thank You So Much "...
पलीकडून गोड हसण्याचा आवाज आला..खरंतर गेल्या ५-७ मिनिटात काहीच 'झालं' नव्हतं त्यांच्यात.. तरीही "काय झालं?" या प्रश्नाचं उत्तर पलीकडे पोहोचलं होतं..
बाकी काहीच 'झालं' नाही त्यांच्यात.... काहीच नाही....