सुमित्राच्या लिखाणाची खोली मोजणे कधी कधी खूप कठीण होते. वेदानाच्या गाभाऱ्यातला तो एक हुंकार असतो.
तळ – सुमित्रा
तो कोरा कॅनव्हास दिसला. रंगांनी तो भरावा असं पुन्हा वाटलं, तरी तो कुठल्या रंगानं रंगावा, कसलं चित्र चितारावं हे काही ठरत नव्हतं. कित्येक दिवस कोरा असणारा तो कॅनव्हास पाहता पाहता या सगळ्या रंगात असलो तरी आपण असंच विनारंगाचे आहोत, असंच तिला वाटत राहिलं.
बसल्या बसल्या मग मनात आलं, रंगहीन असणंही चांगलं असतं..शुभ्र! कशातही मिसळून अस्तित्वहीन होणारा किंवा मिसळून जाणारा. कशाला हवेत रंग? कशाला हवी रंगाची उधळण? आपला रंग सगळ्या रंगात राहून वेगळाच..तो रंग वेगळा राहिला की आपणहून तो वेगळा ठेवला? उत्तर शोधू गेलं तर आपण त्या उत्तर आणि प्रश्नांच्या मालिकेत गुरफटणार.....उत्तर मिळणार नाही कदाचित पण समोरचा कॅनव्हास कोरा ठेवायचा हे पक्कं होईल का?
विचारांत गढता गढता मग वाटलं कोरा ठेवूया कॅनव्हास असं म्हटलं तरी ते फारसं खरं नव्हतं. त्या शुभ्र कॅनव्हासवर आठवणींच्या रेषा सराईतपणे उमटत होत्या, अगदी उत्स्फूर्तपणे. आठवणीचेच रंगही भरले जात होते अगदी झरझर.. लाल, निळा, जांभळा, गुलाबी..हिरवा.. रंगाच्या किती छटा तशा आठवणीही तशाच.. रंगाच्या छटांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म फरकांसारख्याच.. रंगांसारख्याच कधी लोभावणाऱ्या, तर केव्हा आर्त असणाऱ्या...
जीवघेण्या! आठवणींच्या स्मरणचित्रात एकाएकी मनात समुद्राची गाज ऐकू आली, पावलं मऊशार वाळूतून मनोमन फिरून आली आणि त्या क्षणी अभावितपणे हातातल्या कुंचल्याने निळ्या रंगात बुडी मारली.. अंदमानच्या समुद्राचं निळशार पाणी आठवणींच्या कॅनव्हासवरून समोरच्या कॅनव्हासवर उतरू लागलं...बघता बघता कोरा कॅनव्हास समुद्र झाला.... फक्त तिचा असा.. निळाशार... आकाशी रंगाचा...... खोल आणि तळ न गाठता येणारा...पण तरीही