Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

डिगूदादा-Surendra Patil

$
0
0

अत्यंत सशक्त व्यक्तिचित्रण हां ह्या कथेचा आत्मा आहे.

डिगूदादा – सुरेंद्र पाटील

दादा म्हणजे दादाच होते. रुबाबदार आणि जिगरबाज ! त्यानी नुसतं बघितलं तर समोरच्याची पातळ व्हायची. त्याना अरेला कारे म्हणणारा उभ्या हयातीत कोणी भेटला नव्हता.ते घरातून निघाले की, रस्त्यात माणसं झुकून रामराम घालायची. वाड्यातही त्यांच्या थोरलेपणाचा मान आणि दहशत होती. गावाविषयी प्रचंड कळवळा असलेले दादा गावची शान होते. त्यांच्यासारखं आमच्या वाड्यातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातही कोणी नव्हतं. पिवळा रेशीम फेटा,पांढरी स्वच्छ इस्त्रीची कापडं त्यांच्या गोऱ्या रंगाला शोभत. गावात कोणी नवी कापडं घालून मिरवू लागलं की लोक म्हणत,

'का गा, डिगू पाटील समजतो व्हय सोत्ताला? नागानं नाचलं म्हणून म्हांडुळानं नाचलं तर जमतंय का ? '

गावासाठी डिगंबर पाटील,डिगूदादा असले तरी वाड्यात दादाच म्हणायचे त्याना. वाड्यातला कोणी वाकडं वागलं की दादा त्याच्या घरी जाऊन कान धरीत.त्याना दम निघत नसे.कधीकधी दात घासतच ते त्या घरात टपकायचे. मग तो कोणीही असो. दादाना अचानक आलेलं पाहिलं की, घरच्या बायापोरांची भंबेरी उडायची.चाचरं भरल्यावनी व्हायचं.लालबुंद डोळे करुन दादा कावायचे,

'पाटलाच्या पोटाला यिवून आता आसलं हालकं वागनं शिकलास का रं , नकट्या ? जरा बापजाद्याचं नाव ठिव.मानूसजलम पुन्ना पुन्ना येतनी, गावात हामचं नाक जावदिवू नका..'

'न्हाय दादा..'

'काय न्हाय दादा? हामी लय हिशेबानं वागताव गावात म्हणून इथवर आलाव. आंगाला डाग लागू दिलनी !..पुन्ना तुजं काय कानावर आलं तर याद राख..मी हाव आन् तू हैस.'..एवढं बोलल्यावर पुढचा कान पकडून शरण जायचा! त्याच्यापुढे पर्यायच नसायचा दुसरा. दादा वाड्यासाठी जणू सुप्रीम कोर्ट होतं.

दादा भीमराव पाटलानी ओटीत घेतलेले दत्तक होते. पण ती गोष्ट आम्हाला कळायला तरुणपण यावं लागलं. सख्खे-चुलत हा भेद वाड्यात नव्हता.आमचे वाडे वेगळे होते इतकेच..आलेला पाहुणा साऱ्या वाड्यात पाहुणचार झोडायचा. दादाच्या ढेळजेला तर तो जायचाच. नाहीतर दादा त्याना विचारायचे,

'मया लय पातळ केलो पावणे!'

दादाला भरपूर शेती होती.पाचसहा सालगडी अन् आठएक बैलं शेतीत राबत.गाई म्हशींनी दावण भरलेली.दोन लेकरं अन् दोन बायका असा संसार होता.रुबाबदार घोडी आणि महिन्द्रा जीप दिमतीला होती.गावात दुसऱ्या कोणाकडे जीप नव्हती.गावातल्या अनेक सोयरिकीची साक्ष म्हणजे ही जीप.मी जरा टापटीप राहायचो म्हणून दादा मला रोज सोबत नेत.म्हणत,' रावसाबच्या पोराला घेऊन या,लातुरला जायचं हाय.'.

दिवसभर जीपमधे दादाबरोबर फिरायला मिळणार म्हणून माझा बारका जीव खूष व्हायचा ! मग जीपने दादा बैलबाजार,आडत,बाजार ,जत्रा करीत..कधीकधी बबरुतात्या(दादाचे चिरंजीव) जीप चालवित.नवे बैलं आणले की त्यांना आरती ओवाळून वाड्यात आणलं जाई ! मी शाळेत जाईपर्यंत असंच चालत होतं.

दादाचा वाडा दगडी काळ्याभोर चिऱ्यानं बांधलेला.समोर तोंडाला ढेळजा.तिथं कायम वर्दळ.गावातले पेच तिथं सुटत.तिथं दादा असले की, दुसऱ्या दारातून वाड्यात घुसायचो आम्ही ! वर माडी होती.गावात देवळातलं रामायण बंद पडलं.दादांनी रामायण पेटीवर गाणाऱ्या नागनाथ मास्तर आणि अर्थ सांगणाऱ्या हणमंतसिंहाला बोलावलं.ते दोघंही ढेळजंला आले.दादांनी कशाला बोलवलं त्याना कळेना.

'हाणमंतसिंग, देवळातलं रामायण का बरं बंद केलो ?..'

हणमंतसिंग गरीब शिपाई.शाळेत होते पण रात्री मंदिरात रामायणातल्या ओवींचा अर्थ छान सांगत..दादांना काय उत्तर द्यायचं त्याना कळेना.ते गप्पच बसले.संकोचले.

'नागनाथ, देवळातलं रामायण का बंद केलो ? ' नागनाथ मास्तरला दादांनी विचारलं.नागनाथ मास्तर दुनियाचं फटकळ.

'दादा, ऐकायला कोणच यिना देवळात.देव धरम ,पोथी लोकावाला किरकिर वाटू लागलीय.मंग काय करावं , तुमीच सांगा ? '

‘आस्सं? ..मंग हामच्या वाड्यात चालू करा रामायण. वाड्यातले बायकापोरंबी ऐकतील. गावातलेबी काई लोकं येतील! करा चालू .'

दादांनी त्यांना धक्का दिला. दोघांनी दादाकडे आनंदाने यायचं कबूल केलं. मग दादाच्या वाड्यातही रामायण रंगू लागलं.तीनेक तास हरिनामाचा गजर होऊ लागला. दादाच्यात रामायणाची समाप्ती जोशात होई.मग वाड्यातल्या दुसरा कोणीतरी पांडवप्रताप ग्रंथ लावी.साखळी चालत राही.दादांमुळे ग्रंथ वाचणारे ,अर्थ सांगणारे बरेच लोक तयार झाले..गावात पहिला टीव्ही दादांनीच आणला. रामायण,महाभारत बघायला वाड्यात दुनियाची गर्दी व्हायची.

'रावसाब हाय का?' म्हणत ते दोन दिवसाला तरी आमच्या वाड्यात अण्णाला भेटायला येत.घरी वाड्यातल्या, गावातल्या प्रश्नावर चर्चा चाले .भूतकाळ,वर्तमान उगाळला जाई.

दादाच्या शेतात शेळ्या पाळलेल्या होत्या.बाहेरगावच्या चोरांनी एका रात्री त्या घेऊन गेल्या. दादाचं डोस्कंच सरकलं. त्यानी पत्ता का माणसं फिरवली. शेळ्या किनीच्या मांगानी नेल्या होत्या.किनीचे मांगं म्हणजे डाका घालायला कुप्रसिद्ध ! पोलीसाची डोकेदुखी. दादानी घोडी काढली.जीप बबरुतात्याला काढायला लावली.म्हणाले,

'चला निघा लवकर. गाडीत बसा! '

ट्रकमधे काठ्या घिवून गावातले लोक घेतले.किनीच्या मांगवाड्यावर त्यांनी धाड घातली.तिथं एका कोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या.गड्यानी शेळ्या ओळखल्या.दादांनी त्या ट्रकमधे कोंबायला लावल्या.दादाला आणि गर्दीला बघूनच मांगवाडा चिडीचूप झाला होता.मांगं जागेवर नव्हते.असले तरी समोर आले नाहीत. मांगं दुसऱ्या दिवशी येऊन दादाकडे कान धरु लागले.दादांनी त्याना माफ केलं.

दादा लग्नाला गेले ,अवकाश असला की बँडवाला मुद्दाम दादांसाठी वाजवायचा.मग दादा पैसे देऊन त्याला खूष करायचे.अावडीचे गीत ऐकायचे. त्यांचे दोस्तही मग अनुकरण करायचे ! आम्हाला ऐकायला मजा यायची..

दादांना तमाशाची आवड होती,लातुरच्या तमाशागृहात चकरा असायच्या.तशी मराठी सिनेमाची आवड होती. पिंजरा नावाचा सिनेमा त्यानी कितीवेळा पाहिला त्यांनाच माहीत ! ते लातूरला जीपने मुद्दाम पिंजऱ्यासाठी जायचे.लोकांनाही दाखवायचे..जीप चौकातून जाताना कुटाळ लोक म्हणत,

'पिंजरा बघायचाय का रं कुणाला ?..जीप निघाल्याय दादाची. जीपलाबी पाठ झाला आसंल पिंजरा ! ' दादांबरोबर पिंजरा बघायला मिळणं समवयस्कांना मौजेचं वाटे !. पिंजरा त्याना खूप भावला. तमाशा कलावंताच्या जीवनाबद्दल मनात सहानुभूती निर्माण झाली असावी.

कारण त्यांच्या जीवनात घटना तशी घडली.जणू लोकांना दादाकडे बोट दाखवायला जागा झाली.दादा सतत एका तमाशागृहात जायचे.एकदा दादांनी तिथली मुलगीच माळ घालून आणली !! तिची कैफियत ऐकून त्यांचं मन द्रवलं. आपण दोन लेकराचे बाप आहोत हेही ते विसरले. घरात आधी दोन बायका.पहिलीला मूल नाही म्हणून दुसरी बायको केलेली. तिला दोन मूल झाले.बबरु,पद्मीन.सारं आनंदाचं गोकुळ ! पण दादांनी तमाशातली पोर आणल्यानं वाड्यात वादळ उठलं.गावात कुजबूज सुरु झाली,

'पाटलानं हे चांगलं केलनी , गड्या ! '

'घरी सुन आली , दादाला हे शोबतं का ?,' वाडा बोलला,' आता हेंचे कान कोण धरावं ? '

'त्या बाईला लेकरु झालं तर कसं ? इस्टेटीत वाटेकरी येणार.'

‘बबरुच्या जीवाला कोडं पाडलं दादानं ..',म्हणूनही बबरुतात्याची कोरडी चिंता साऱ्यांनाच वाटू लागली.पण दादांनी घरात स्पष्ट सांगितलं,

'कुणाला राग येवं लोभ येवं. हातातून घडलं ते घडलं..हिला म्या माळ घालून आणलाव. बबरु, हिला तिसऱ्या मायची जागा दे. ही काही ठिवलेली नव्हं .' मग गावातील तोंडं गप्प झाली. वाडाही थंडगार झाला. पुढं तिला बाई म्हणून वाड्यानं मान दिला.बाईही दादाच्या जीवनात विरघळून गेली.दादाबरोबरीनं शेतीकडं तिनं ध्यान दिलं.या प्रकरणाची तोंडचर्चाच जास्त झाली.पुढं बाईला लेक झाली, पण त्यानंही विशेष खळबळ घरात उठली नाही..

दादाचा दिवस पाचलाच सुरु व्हायचा.ते तांब्या घेऊन शौचाला बाहेर पडायचे.आंघोळ करुन शिवलिंगाची पूजा झाली की दुधभाकरीचं जेवण करायचे.त्याना मधुमेहानं लवकरचं गाठलं.पण ते वक्तशीर औषधे घेत.पुढे तर रोज इन्शुलीनची इंजेक्शने ते घेत.स्वत:च.हे पथ्य जीवनभर त्यानी पाळलं..

मी शाळेला लातूरला गेलो.पुढं मुंबईलाही गेलो. सुट्टीहून परत जाताना निरोप घेताना दादाच्या पाया पडायचो. दहावी झाल्यावर मी एक पुस्तक लिहीलं होतं.अण्णानी ते दादाना वाचायला दिल्यावर दादानी खूप कौतुक केलं..पुढं मी मुंबईला चित्रकलेच्या शिक्षणाला पैसे कमी पडले की, अण्णा दादाकडून उसने पैसे घेत.दादांनी कधी त्यासाठी परत केलं नव्हतं. माझ्या एका गरीब मित्राला दादा शिक्षणासाठी मदत करायचे, हे मला नंतर कळालं..वाड्यातून कोणी दहावी पास नव्हतं .मी शिकताना पाहून ते खूष व्हायचे,

'तुला शिकवाया रावसाबनं लई कष्ट घेतलाय.तू शिक.घराला पुढं आण.वाड्यातला एकबी भाद्दर धाव्वीपुढं शिकाया न्हाई..मोठी चूक केली पोरांनी .आता मरा म्हणावं मातीत !.'

दादा वाड्यातल्या लेकीची काळजी घेत.माहेरला आल्या की गोडधोड करुन ख्यालीखुशाली विचारीत.जीपने कधी बाहेरगावी गेले अन् प्रवासात वाड्यातील लेक दिली असेल तर,मुद्दाम वाट वाकडी करुन भेटत.पहिल्या प्रथम मुलीच्या शिक्षणाला त्यांचा विरोध होता..पद्मीनबाई सातवीनंतर शिकली नाही ;मात्र बाईपासून झालेल्या कांचनला त्यानी एम. ए .पर्यंत शिकवलं..हा त्यांच्यात मोठा बदल होता.

१९९३च्या भूकंपानं आमचे वाडे जमीनदोस्त झाले.आमचा परिवार विखुरला.दादा त्यांच्या बाहेरच्या वाड्यात राहायला गेले.आम्हीही गिरणीच्या वाड्यात गेलो.लोकं पत्र्याची शेड मारुन राहू लागली.लोकांचा जगण्याचा संघर्ष तर चालू होताच.लोक सैरभैर होते.बाजूच्या गावाच्या पुनर्वसनाची घोषणा झाली,पण आमच्या गावाकडे कोणी नेता पाहिना.आपलं गाव पत्र्याच्या शेडमधेच राहणार म्हणून लोक अस्वस्थ झाले..मग दादा गावातील लोकांना घेऊन शिवराज पाटलांना भेटले.पाटलांना समजवून सांगितलं.चक्र फिरली.गावाचं पुनर्वसन सुरु झालं.पूर्वी दोनेक दिवसात अण्णाकडे त्यांची फेरी असायची, ती विरळ झाली..भूकंपानं गावातही भंगलेपण आले ..पुनर्वसन सुरु झाले मात्र लोकांचं वर्तन बदललं.स्वार्थाचा अतिरेक झाला..सामान्य माणसं हैराण झाली..पुनर्वसनाच्या बरोबरीने गावात हा बदल होत होता .अण्णाना हे बघवत नव्हतं..दादाही गावच्या वर्तनानं वैतागले होते.बांधकाम चालू होतं. तीन ठिकाणी गावात पत्र्याचे निवारे झाले होते.

मी वणवा नावाचं नावाचं नाटक लिहीलं होतं.गावातल्या पोरांनी ते बसवलं होतं.पहिल्या प्रयोगाची तारीख जाहीर केली.लोक जमले.जरा नाटक चालू झालं की पाऊस सुरु झाला.वारंही सुटलं.लोक फाकले.भूकंपग्रस्त गावकऱ्यांना मनोरंजनाचं साधनच नव्हतं.म्हणून माझा हा प्रयत्न होता.दोन दिवसानं पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न केला.स्टेज लावलं .तोंडाला रंग लावून प्रयोग सुरु केला.पण पुन्हा थेंबं तुटू लागली.वारंही सुटलं.

लोक परत गेले...'तुमचा वणवा म्हणलं की पाऊस येतो गड्या ! वणवा न्हाई वनवास हाय ! ' लोकं चिडवायला लागली.योगायोगानं तसंच झालेलं.नाटकाला अडचणच येत होती.

'अरे, दादाच्या हातानं नाटकाचं नारळ फोडा !..नाटक कसं पार पडतनी ते बघा ! ' गावात कोणीतरी सुचवलं. चार दिवसानं दादांच्या हस्ते खरेच नाट्यप्रयोगाचं उद्घाटन केलं.प्रयोगाला कसलीच अडचण आली नाही..नाटकात मी खलनायकाची भुमिकाही केली होती.एका दृष्यात मला सिगारेट ओढत बोलायचं होतं.समोर दादा खुर्चीत मला निरखत बसलेले.मला दडपण आलं.पण मी नेलं निभावून..दादा दुसरे दिवशी सकाळी घरी आले.अण्णाना नाटक चांगलं लिहिल्याचं सांगितलं.अण्णा नाटक बघायला आले नव्हते.

'रावसाब,पोरानं चांगलं नाटक लेव्हलंय की.तू येयला फायजे व्हतं.समाजात जे चाललंय ते मांडलंय पोरांनं..पोरानं नाव काढलं..कुठं हाय त्येनं ? ' दादाच्या पोटात आनंद मावत नव्हता.. मायनं मला उठवलं.मी थकून झोपलो होतो.मी डोळे चोळत दादापुढं गेलो.

'चांगलं बसलंय की नाटक.कामंबी चांगली केल्यात समद्यानं..सोत्ता लिव्हलाव का ? ' दादानी विचारलं.अलीकडे ते मला अहो जाहो बोलायचे.नोकरी करत असल्यापासून तर मला अभिमानाने बोलायचे. मी नाटक स्वत:च लिहिल्याचं सांगितलं. त्याना विश्वास बसत नव्हता. आनंदही झाला होता..चार तास एका जागेवर बसून त्यानी नाटक पाहिलं होतं.

'ते सिगरेट नाटकापुरतं वढलो का रोजच वढताव ? ' दादानी माझी फिरकी घेतली..मी नाटकापुरतं ओढल्याचं सांगितल्यावर मान हलवली.हसले.मग पाठीवर शाबासकी देत निघून गेले..काही महिने असेच गेले. आम्ही बाहेरच्या वाड्यात रुळलो होतो.त्याला गिरणीचा वाडा म्हणत. या वाड्यात अलीकडे अण्णाना बरं नव्हतं. जेवताना त्रास जाणवू लागला.घास गिळताना डोळ्यात पाणी येऊ लागलं.अण्णाला लातूरला नेवून तपासण्या केल्या.रिपोर्ट आला.अन्ननलिकेचा कॅन्सर ! तातडीनं मुंबईला नेलं.पण ऑपरेशन करता आले नाही..अण्णाला गावी आणलं..दादा आलेच की घरी .

'रावसाबला एवढं कायबाय झालं..मला कळविलो का न्हाई .?.लई शाने झालो वाटतं..परक्याला केल्यावनी आसं कारे बाबानो ?.' माझ्यावर निशाना होता ,' काळजी घ्या त्येची.करता यिल तेवढी सेवा करा.'

आता गावात घरवाटप झाल होतंं.आम्ही सगळेच गिरणीच्या वाड्यातून नव्या बांधलेल्या घरात आलो.वाड्यातली घरंही थोड्याफार फरकानं आसपास आली. पण नव्या घरात अण्णाचा त्रास वाढतच गेला.हळूहळू जेवण बंद झालं. पातळही पचेना.घरबार हादरलं.दादा,बबरुतात्या सावलीसारखे आमच्या मागं उभे राहिले.

पण अण्णा गेल्यावर दादांचा हात मोडल्यावनी झाला.बऱ्याच किचकट गोष्टी ते चर्चा करुन सोडवायचे..वाड्यावर दोघांचा वचक होता.दादांच्या अनेक निर्णयाला अण्णाचा पाठिंबा होता..काळ अण्णासाठी थांबला नाही..पुढे तीन वर्ष गेले. बबरुतात्या चुकीच्या लोकांबरोबर बसत असल्याचं त्यांना कळू लागलं,पण त्याना सांगावं कसं , हा प्रश्न उभा राहिला.त्यात बबरुतात्याचं मुळव्याधीचं ऑपरेशन झालं..त्यातूनच बबरुतात्यांना कॅन्सर असल्याचं उघडं पडलं. मग तर दादा जास्तच हैराण झाले.एकुलत्या एका मुलाशी आपण संवाद साधू शकलो नाही,गावच्या,शेतीच्या काळजीत त्याच्याकडं लक्ष देणं झालं नाही,असं त्याना वाटू लागलं..

'आपल्या वाड्याला कुणाचा शाप लागला आसंल.रावसाब तसा गेला आन् आता बबरु.हेंच्याच वाट्याला आसं का यावं ?.काय पाप केलं आसंल हामी ? ' बबरुतात्याला भेटायला गेलं की ते मला हा सवाल करीत.

मुलासाठी ते झटू लागले पण आता उशीर झाला होता..डोळ्यादेखत मुलगा मरणाच्या मुखी जाण्याचं दु:ख त्यानी दाबून टाकलं. दोन बायका, बबरुतात्याची लेकरंबाळं,शेतीचा पसारा सावरण्यासाठी दादा पुन्हा नेटाने उभे राहिले..बाईच्या कांचनचे लग्न करायचा ध्यास त्यानी घेतला.पण मनासारखा मुलगा मिळत नव्हता. दादांनी पंचाहतरी ओलांडली होती..पुतण्या शेतही चांगलं बघत होता.

नव्या गावात हनुमान मंदिराचं काम त्यांच्या हातावर होतं.गावात दारुची दुकानं वाढत होती पण मंदिर नव्हतं.ही गोष्ट त्याना खात होती. ते गावकरी घेवून मुंबई पुण्याला गेले.गावातल्या नोकरदार लोकांना भेटले.मंदिरासाठी पैसा उभा केला.प्रवासाची दगदग आता सोसत नव्हती.जरा चाललं की धाप लागायची.पण त्यानी हातात काठी घेतली नाही..कळस काढेपर्यंत जगणं मिळावं असं त्याना वाटायचं..

मंदिराचा कळस चढला.कळस पाहताना दादाचे डोळे पाण्यानं भरले.हरीनामाचा गजर ऐकून कान तृप्त झाले.टाळकरी नाचत होते.भजन रंगत होतं.ते आता निर्धास्त झाले.मंदिरात आता लोक जमत होते.पोथीही चालू होती.

दादांनी एके दिवशी सकाळचं इन्शुलीनचं इंजेक्शन घेतलं.दूध भाकरीचं जेवण केलं. शेताकडे चक्कर मारुन आल्यावर जरा अस्वस्थ वाटायला लागलं.कपाळावर दरदरुन घाम आला. छातीत कळ आली. दादानी गावातून जीप मागवली. इस्त्रीची कापडं घातली.जीपमधे स्वत: बसले.पण तिथून त्यांचा प्रवास बदलला.रात्री दवाखान्यातून पोरानी त्यांचं प्रेत परत आणलं..अंथरुणावर जराही न पडता दादा गेले.

मी दादाच्या घरी पोचलो तेव्हा दादाचं तोंड दिसत नव्हतं. गाव ,वाड्यातली गर्दी समोर दाटली होती. गावातला व्यवहार बंद झाला होता. प्रेतापुढं हुंदके,आकांत उठला होता. दाटीतून त्यांच्याजवळ गेलो. स्वच्छ इस्त्रीच्या कपड्यात ते झोपल्यासारखे तर वाटत होते.चेहऱ्यावर तेज होतं. रुबाबही तोच होता. मला वाटलं ,दादा उठतील. पाठीवर शाबासकी देतील. म्हणतील, ' चांगलं बसलंय की नाटक. सोत्ता लिव्हलाव का ? '

पण दादा तर जीवनाच्या रंगमंचावरुनच निघून गेले होते..सोत्ताच !


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>