जबरदस्त भाग...आसावरी शाब्बास!
पद्मालय – आसावरी देशपांडे
भाग ९
मनवा
थांबव, माझ्या धमन्यातून निर्लज्जपणे वाहणारे रक्ताचे पाट, नाहीतर उकळू दे रक्त इतके की गोठलेल्या रक्ताला देखील नमावेच लागेल, माझ्या मेंदूच्या उडालेल्या चिळकांड्यानं सांग एकदाच घेऊन जा मला पूर्णपणे...नको देऊस असा शाप की माझ्याच धगधगत्या वेदनांना जन्म घ्यावा लागेल पुन्हा पुन्हा...
माझ्या शरीरभर पसरलेल्या नसा सुकू दे, कोरड्याठक्क होऊ दे, यातली एकएक नस जोडून रचू दे चंदनी चिता 'माझ्या जिवलगा' तू पहूड त्यावर निर्धा्स्तपणे...तुझ्या पेटलेल्या देहाची धग मी शांत करेन..असे तरी भाग्य माझ्या भाळी दे ..परमेश्वरा...
नसेल बसला मेळ आमच्या पत्रिकेतील ग्रहांचा...पण आमची मनं तर घट्ट अडकलीत न रे एकमेकांत? कर ना रे उलथापालथ ग्रहांची...माझ्या आयुष्यातले हे वादळ कर ना रे दूर परमेश्वरा.. उभ्या आयुष्यात त्याने नाही मानलं कधी तुला..नाही नमला कधी तुझ्यापुढे....पण दे अशी प्रचिती की उभ्या आयुष्याचे ऋणी होऊ..कारण तू..परमेश्वर आहेस... तुला सारे काही शक्य आहे... पत्रिका दामले काकांना दाखवली तेव्हा ते म्हणाले होते
“जो पर्यंत तू मिहीर सोबत आहे तो पर्यंत मिहीरला काहीच धोका नाही...पण ज्यावेळेस मिहीर आणि तुझ्यात दुरावा येईल..तेव्हा या नात्याचा शेवट होईल, आणि ज्या दिवशी याचा परमेश्वरावर विश्वास बसेल तो दिवस याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल"
कसल्या जर तर च्या बेड्या बांधून ठेवल्यात आमच्या आयुष्यापुढे.. संसारात नंदनवन फुलवण्याचे स्वप्न ऊरात बाळगले; पण इथे तर गोठ्यातली मूकी जनावरे देखील माझ्याकडे पाहून फिदीफिदी हसत का आहेत? माझं स्वप्न आकार घेण्यापूर्वीच नाहीसं का झालं? कसं शक्य आहे ? म्हणजे मिहिरचा खरंच देवावर विश्वास बसला ?कधी ?कसा? आणि त्याच्या हातावर काय लिहिलंय...
"ओम देहदृष्ट्या तू दासो..हं जीवदृष्ट्या त्वदंशकंम। आत्मदृष्ट्या तदेवाहम् इति मे निश्चिता मति:।।"
हे परमेश्वरा। हे परमात्मा देहदृष्टीने विचार करता मी तुझा दास आहे. देह धारण करणे माझ्या इच्छेवर अवलंबून नाही. कोणता देह धारण करावा हे मी ठरवू शकत नाही , देह सोडून जाणे माझ्या हाती नाही, आणि या देहात असेपर्यंत काय अनुभवावे,काय सहन करावे, हे स्वातंत्र ही मला नाही.
जीवाच्या दृष्टीने विचार करता माझा जीव हा तुझा अंश आहे. आत्म्याच्या दृष्टीने विचार करता माझा आत्मा म्हणजे प्रत्यक्ष तूच आहेस,या बद्दल माझे मनात काहीही संदेह नाही , तशी माझी खात्री पटली आहे.
इतक्यात,'ताई'...शारदाच्या किंकाळीने मनवाचे डोळे खाडकन उघडले...इतक्या भयंकर स्वप्नातून जागी झाल्यानंतर .'.ते स्वप्नच होते ' याचा तिला दिलासा मिळाला. मनवा तडक शारदाच्या किंकाळीच्या दिशेने गेली आणि.....
क्रमशः