शशीच्या ह्या कथेने मला थक्क केले....गुंग होऊन वाचत गेलो...आणि नंतर शांत बसून राहिलो....शशी...तुसी ग्रेट हो...शाब्बास!
वर्तुळ - शशी डंभारे
काही गोष्टी, घटना मुळातच गुंतागुंतीच्या असतात. कशाचा कशाशी वरवर काहीही संबंध नसतो. पण व्यक्ति, जागा, परिस्थिती इतक्या मिळत्या जुळत्या असतात की आपण आश्चर्यचकितच नव्हे तर प्रसंगी अनामिक भीतीने कंपितही होतो. जगण्याच्या एकुण परिसरात आपल्यासह, आपल्यासारखी अनेक वर्तुळं आजुबाजूने आपापल्या वेगात, परिघात फिरत असतात. एखादं वर्तुळ दुसऱ्या दूरदूरच्या वर्तुळाच्या आसपास येतं आणि स्पर्श करून जातं. दोन वर्तुळांच्या जगण्यातल्या अस्पष्ट तारा जवळ याव्यात, स्पर्श व्हावा, ४४०चा करंट लागावा आणि जीव निव्वळ थिजून जावा असेही अनुभव येतात.
२००५ च्या मार्च - एप्रिलचे विदर्भातले खणखणीत उन्हाचे दिवस होते ते. या वर्षाच्या मागची-पुढची काही वर्ष फारच खडतर गेली. जगणं निव्वळ हातघाईवर आलेलं. कुठलीशी गर्द आणि गूढ सावली पसरून होती आयुष्याच्या या टप्प्यावर. जन्म आणि मृत्यु यातले अंतर किती निमुळते असू शकते हे दर्शवणा-या अनेक घटना आजूबाजूला घडून गेल्या होत्या. घडत होत्या. जीव कुठेच खऱ्या अर्थाने रमत नव्हता. स्वतःला कामात झोकून देणे , व्यस्त ठेवणे हाच एक तात्पुरता उपाय त्या परिस्थितीत मला उपलब्ध होता. वाईटातून चांगले इतकेच की कामात झोकून देण्यामुळे ऑफिसमधले मुल्यांकन चांगले वाढले होते. गोपनीय अहवालात 'अतिउत्कृष्ट' शेऱ्यांची भर पडली होती.
माझे तत्कालीन अधीक्षक अभियंता अतिशय हुशार- कर्तबगार इंजीनिअर तर होतेच पण त्याही पेक्षा अत्यंत सुस्वभावी, आणि स्टाफची काळजी घेणारे अधिकारी होते. पर्सन्यालिटीही छान, अगदी हैण्डसमच. चेह-यावर कायम तरळणारे हसू. सरकारी ऑफिसरला मैच न होणाऱ्या अशा अनेक गोष्टी होत्या त्यांच्यात. अधिकारी असूनही ऑफिसला ऑफिसच्या वेळेत पोहचणारे आणि ऑफिसची वेळ संपली की स्टाफलाही ' घरी निघा आता' म्हणणारे माझ्या माहितीतले ते एकमेव ऑफिसर. अशा ऑफिसरसोबत काम करण्याचे एक वेगळेच समाधान असते. त्या खडतर काळात त्यातल्या त्यात ऑफीस ही एकच बाब सुखावह होती माझ्यासाठी.
पण हा निखळ आनंदही फार काळ टिकला नाही. त्यालाही कारुण्याची झालर लागली लवकरच .
साईटच्या विजिट सांभाळून शक्यतो ऑफिसलाच उपस्थित असणारे साहेब सलग ८ दिवस ऑफिसला गैरहजर राहीले म्हणून चौकशी केली तर समजले की मागील ६ महिन्यांपासून त्यांची मिसेस कैंसरने आजारी असून त्यांना आता मुंबईच्या हॉस्पिटलला हलवले आहे.
कसाबसा ऑफिसात प्रकाश शोधणारं मन पुरतं काळवंडून गेलं हे ऐकून. जीव कसनुसा झाला इतक्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती त्रास, समस्या, विचार लपवलेले असतील याचा विचार करून.
पुढच्या काही दिवसातच सरांच्या मिसेस गेल्या.
अगदी आवश्यक तितकेच दिवस घरी राहून लवकरच सर ऑफिसला रुजू झाले आणि रूटीन कामाला लागलेही.
एका दिवशी सरांनी केबिनमधे बोलावले म्हणून आत गेले तर त्यांच्या समोर एक साधारण चेहऱ्याचा साधारण उंचीचा, टोटली साधारण टाइपचा माणूस अदबीने उभा होता.
" मैडम, यांची फाइल स्पेशअली तुम्ही बघा, आणि आवश्यक ती सगळी कार्यवाही तात्काळ करा. यांचे काम जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर व्हायला हवे. कोकणातून आलेत. येण्या जाण्यात वेळ जाणार नाही याची काळजी घ्या." असे साहेबांनी म्हटले म्हणून मी लागलीच फाइल उचलून केबीन बाहेर जाण्यास वळले तेंव्हा त्या व्यक्तीशी नजरानजर झाली. तर ती व्यक्ती माझ्याचकड़े बघत होती नी नजरानजर झाल्या क्षणी जरा गडबडललीय असे मला वाटले. क्षणभराचाच तो अवधी. मी त्यांना ' माझ्या सोबत या' असे नजरेने खुणावत केबीनमधून बाहेर पडले आणि जागेवर आले.
त्यांची फाइल बघितली तर कणकवलीच्या एका सब डिवीज़नला जुनियर क्लर्क होते. विदर्भात कुठेही, कुठल्याही जिल्ह्यात त्वरीत बदली हवी होती.
बदली मागण्यास कारण ' व्यक्तिगत अडचण ' असे नमूद होते.
वय ४०.
नियुक्ती mpsc मार्फ़त.
पहिली नेमणुक कणकवलीचीच.
म्हणजे जवळ जवळ १५ वर्षे एकाच ठिकाणी सर्विस झालेली.
विदर्भातला माणूस कणकवली सारख्या ठिकाणी इतकी वर्षे कसा थाम्बलाथांबला याचे मला विलक्षण आश्चर्य वाटले.
"इतकी वर्ष कशी काढलीत तिकडे? साधारण ३ वर्षाने तुम्ही विदर्भात बदलीसाठी पात्र ठरले असतात. १५ वर्षांची सर्विस झालीय तुमची." मी विचारलेच.
"नोकरीची खुप गरज होती मैडम. जिथे पोस्टिंग मिळेल तिथे जान्याची तयारी होती. कणकवलीला पोस्टिंग मिलाली तेंव्हा काहीही विचार न करता लगेच जॉइन झालो. क्वार्टर दूर होतं सबडिवीजन पासून म्हनुन ऑफिस जवळच खोली केली. घरमालक आणि त्याची फॅमिली जाम प्रेमल. मुलासारखा जीव लावला मला त्यांनी."
त्याच्या ' जाम प्रेमल' शब्दावर मी उडालेच. त्याच्या बोलण्यात कोकणी लय होतीच. पण कोकणातली मूळ माणसं 'ळ' शब्द 'ल' आणि ' ण ' शब्द 'न ' असा उच्चारतात, त्यांची ती 'कावला - बगला, आनी -पानी ' वाली भाषा त्यांच्या ओरिजिनल कोकणी हेलसकट या विदर्भीयन माणसाने नुसती स्वीकारलीच नव्हती तर स्वतात रुजवून ही घेतलीय याचे फार कौतुक वाटले .
" फार आवडले कोकन मला, तिथल्या मानसांसकट. रमलो होतो मी तिकडे. तिकडचाच झालो. तिकडंच सेटल होनार म्हनून घरही घेतलं ४ खोल्यांचं. एच डी एफ सी च्या लोनवर.
" २ मुलं आहेत मैडम. मोठी मुलगी ६ वीत, छोटा मुलगा दूसरीत. लगेच ट्रांसफर झाली तर मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्याबरोबर इईकडच्या शालेत घालता येईल म्हणून धावपल. आई म्हातारी आहे. इकडे नातेवाईक आहेत थोड़े फार. मुलांना सांभालायला मदत होईल. "
माझ्या डोक्यात घंटा वाजू लागल्या अनेक प्रकारच्या.
बायको वगळून सगळ्यांबद्दल सांगतोय हा.
बायकोशी पटत नसेल का? डिवोर्स प्रकरण असेल का? हा इकडचा विदर्भातला .....ती तिकडची असेल का? कोकणातली? वगैरे वगैरे.
विचारलेच मग, "तुमची मिसेस?"
सरसरून डोळे भरून आले त्याचे. कसेबसे घोगऱ्या आवाजात शब्द बाहेर आले.
"ती गेली ना मैडम."
"गेली म्हणजे ?"
"वारली"
' बापरे ' मी मनातून दचकले. माझ्या साहेबांनी स्पेशियली या केस मधे का इंटरेस्ट घेतलाय याची लिंक लागली.
तोही खुर्चीतुन उठून बाहेर गेला, त्याचा प्रचंड विस्कटलेला चेहरा लपवत.
मलाही रडू आले जोरात. ते दिवसच तसे होते काळे कभिन्न. विचित्रच असायचं सगळं आजूबाजूला. अंधुक अंधुक. विस्कळीत-विस्कळीत आणि जिव गुदमरवणारं.
बदलीसाठी मुंबई परिमंडळातून 'ना - हरकत ' प्रमाणपत्र तो सोबतच घेवून आला होता. पण आता इकडे नागपुर परिमंडळाच्या सर्कलला जाऊन पोस्ट वेकंट आहे का, असली तर कुठल्या जिल्ह्यात, कुठे ......इथपासून सगळे पहावे लागणार होते. परिमंडळाचा एडिशनल चार्ज माझ्या साहेबांकडे असला तरी काम २ वेगवेगळ्या सर्कल्सशी निगडीत असल्याने मी माझ्या ऑफिस कडून कितीही घाई केली तरी किमान ५-६ दिवस तरी लागणार होतेच सगळ्या प्रोसेसला.
"कुठे थांबला आहात" विचारले दुसऱ्या दिवशी तर कुठल्याशा होटलला थांबल्याचे सांगितले.
रोज सकाळी मी ऑफिसला पोहचण्यापूर्वीच तो पोहचलेला असायचा आणि माझ्या टेबलवर समोरच्या खुर्चीत बसलेला दिसायचा. पुढच्या २-३ दिवसात आमच्यात बऱ्या पैकी दोस्ती झाली. मला खरं तर कणवच यायची त्याला पाहिले की. सुरुवातीला तो जास्त थांबायचा नाही समोर. आजूबाजूला असायचा. चहा वगैरे आला की मी त्याला आवाज द्यायची, तर 'नको' च म्हणायचा. पण २-३ दिवसात जरा रुळला. मी त्याच्या फाइल वर काम करताना, नोटशीट लिहताना, संबधित डेस्कच्या त्यावर सह्या आणताना सोबत रहायचा. बाकी वेळेतही मी माझ्या इतर फाइल्स निपटवताना समोरच्या खुर्चीत बसून रहायचा. बोलका असावा मुळचाच. बोलता बोलता त्या ४ दिवसात त्याने मला त्याचे तोवरचे जवळजवळ सगळे आयुष्यच सांगून टाकले.
मुळ गांव अकोला जिल्ह्यातले कुठलेसे. घरची अत्यंत गरीबी. वडील लहानपणीच गेलेले. आईने मोलमजुरी करून वाढवलेले. शेती वाड़ी नाही. गरिबीमुळे फारसे नातेवाईक नाहीत. त्यामुळे मंत्रालयातुन क्लर्क पदासाठी चक्क कणकवलीची आर्डर हातात पडली तरी गांव-शहर-जिल्हा, बदलल्याचे विशेष दुःख झाले नव्हते. झाला होता तो फ़क्त आनंदच. नोकरी मिळाल्याचा आनंद. स्वभाव मायाळू. कोकण मातीशी लवकरच एकजीव झाला. इकडचे होते नव्हते विकून कोकणचा माणूस झाला. विदर्भ सोडून जाताना सोबत फ़क्त आई आणि इकडची त्याच्या सारख्याच गरीब कुटुंबातली, गरीब स्वभावाची एक मुलगी लग्न करून ' बायको' म्हणून घेवून गेलेला.
तसा प्रगतशील विचाराचा असावा. १२वी पास बायकोचा डी. एड. ला नंबर लागावा म्हणून स्वतः खटपट केली. तिचा नंबर लागलाही. पण मुंबईच्या कॉलेजला. २ वर्ष मुंबईत होस्टेलला रहावे लागणार होते. मात्र ती त्यासाठी अजिबात तयार नव्हती. तिला होस्टलला सोडून माघारी निघाला तर ती गळ्यात पडून हमसाहमशी रडली.
' मी नाही राहू शकणार तुम्हाला सोडून' 'कमी पैशात संसार करेन, एका पगारात भागवेन' 'पण मला इथे सोडून जाऊ नका' म्हणत होती. याने तिला खुप समजवले. कसाबसा हात सोडवून कणकवलीला परत आला. पण घरी आल्यावर तिच्याशिवाय यालाही अजिबात करमेना. आई पण ' कशाला तिच्या नोकरी-बीकरीचे खूळ तुझ्या डोक्यात, चांगलं चाललाय की आपलं ' वगैरे भुणभुण करत होती.
आठवडाभराने भेटायला गेला तर बायको तापाने फणफणलेली. याला बघुन पुन्हा रडायला लागली. गळ्यात पडली. ' मी घरी येते' म्हणत.
लगोलग हा तिला कणकवलीला परत घेवून आला.
पुढे तिच्या नोकरीचा विषय दोघांनीही काढला नाही. मात्र तिच्या शब्दांना ती पूर्ण जागली. याच्या एकट्याच्या पगारात सासू आणि २ मुलांचा संसार तिने छान फुलवला.
अवघ्या ३८ व्या वर्षी याच्या त्या गोड बायकोला असे झाले तरी काय असणार हा प्रश्न माझ्या ओठांवर सारखा सारखा यायचा. पण तो त्याच्या सुखी संसाराच्या वर्णनात इतका रमलेला असायचा की तो प्रश्न विचारुन त्याला वास्तवाच्या जमिनीवर आणणं नको वाटायचं मला. सांगता सांगता त्या टप्प्यावर येवून तो स्वतःच सांगेल 'ते कारणही ' म्हणून मी तो प्रश्न तसाच राखून ठेवलेला.
४ दिवसात मलाही त्याची सवय होऊन गेली. एकदा लंचमधे डब्यातली पोळी भाजी त्याला आग्रहाने खाऊ घातली तेंव्हा त्याने प्रयासाने त्याचे डोळे वाहण्यापासून थांबवलेले मला कळले. तो तसाही माझ्या चेहऱ्याकडे डायरेक्ट बघायचा नाही. इकडे तिकडे पाहत बोलायचा. मी कोकणातली असल्याने मला त्याच्या बोलण्यातला कोकणी हेल ऐकणे फार सुखद वाटायचं. मी ही माझ्याकडून माझे कोकणातले गांव, माझे नातेवाईक वगैरे विषय काढून त्याला बोलतं ठेवायचे. काम करता करता त्याला ऐकत रहायचे. एक दोन वेळा लक्षात आले की मी फाइल मधे काम करत असताना किंवा माझे त्याच्याकडे लक्ष नसताना तो माझ्या चेह-याकडे टक लावून पाहतोय. माझे लक्ष गेले की दचकतो, घाबरल्यासारखा होतो, इकडे तिकडे पाहतो. पण मी मनावर घ्यावे इतक्या वेळा नाही घडले. मीही दुर्लक्षच केले .
त्याच्या बदली ऑर्डरचे काम जवळ जवळ होतच आले होते. तो बऱ्यापैकी सावरलाही होता आता. बहुधा इतके बोलल्यामुळे त्याच्या मनाचा बराच निचरा झाला असावा.
" मैडम पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये ?" एकदा म्हणाला.
" कोणती ? "
"क्षणभर माझ्यापासून दूर राहणे पसंत न करणारी ती, गेली तर साफ़च गेली हो! इतक्या दिवसात साधी स्वप्नात पण आली नाही एकदाही."
काय उत्तर द्यावे मलाही कळेना. तो बायकोचे नाव घ्यायचा नाही. ती, तिचं, तिने असं म्हणायचा. एकंदर लक्षात आलं की बायको गेल्याचा त्याचा देवापेक्षा, परिस्थितीपेक्षा, तिच्या जाण्याच्या कारणापेक्षा 'तिच्या ' वरच राग होता. तिने जायला नको होते त्याला असं एकटं टाकून अशा अर्थाचा. तिचं जाणं तो मनातून मान्यच करत नसावा. अनपेक्षित आलेल्या या परिस्थितीशी दोन हात करणं सुरु होतं फ़क्त त्याचं. ती गेलीय हे जाणिवांत पोहचलेलं नव्हतं नीट. ती स्वप्नात तरी कुठून येणार?
इतका प्रेम करणारा नवरा, मुलं सोडून भर संसारातुन उठून गेलेल्या, त्या न पाहीलेल्या बाईसाठी माझं मन आतून आक्रंदू लागलं खुप. तिला तरी कुठे जायचं होतं याला सोडून? मुलांना सोडून? काय अवस्था असेल तिच्या मनाची निघून जाताना? या प्रश्नांनी माझंही मन कासावीस होऊ लागलं.
दिसायला कशी असेल? सुंदर की याच्या सारखीच साधारण ? ऊंच, बुटकी, लट्ठ, बारीक़....? मला आता जितकं जमेल तितकं तिच्याबद्दल ऐकावंसं वाटत होतं.
"दिसायला कशी होती हो तुमची मिसेस? "
माझ्या प्रश्नाने तो गड़बड़ला. खुपच गड़बड़ला.
"चांगली होती. म्हणजे खुप सुंदर नव्हती, सावली होती. ऊंची साधारनच. लग्नाचे वेली तर खुप लुकड़ी होती. पण कोकन मानवले मैडम तिला. जाड़ी झाली होती आता. म्हनजे खुप जाडी
पन नाही. समजा, तुमच्या इतकीच."
आता मी गडबडले.
पण त्याच्या चेहऱ्यावर अगदीच साधे काही सांगितल्याचा भाव होता. उलट डोळ्यात थोडासा ओलच दिसत होता साचलेला.
मी मग सोडूनच दिला तो विषय.
आज तो आला की त्याला ऑर्डर देता येणार होती. टाइप्ड कॉपीज़ माझ्या टेबल वर होत्या. एक सही बाकी होती फ़क्त सुपरिंटेंडेंटची. तेवढी झाली की त्याचा-माझा हा ५ -६ दिवसांच्या सोबतीचा प्रवास संपणार होता.
मी ऑफिसला पोहचण्यापूर्वीच तो माझ्या टेबलसमोर खुर्चीत येवून बसलेला दिसला. मी दिसले तसा मनापासून हसला. ४ दिवसात पहिल्यांदाच इतका सहज हसताना दिसला.
चहा आला. ' यांनाही दे चहा ' असे मी चहावाल्या पोराला खुणावले तर रोजच्या सारखे 'नको ' वगैरे म्हणाला नाही. उलट ' मी पैसे देवू का मैडम आज, तुमची फार मदत झाली हो, तुम्ही खुप केले माझ्यासाठी' वगैरे म्हणाला.
'आमचा चहावाला आमच्या पाहुण्यांकडून पैसे घेत नाही' असे म्हणत मी दुसऱ्या एका महत्वाच्या फाइलकड़े वळले. मधे एकदोनदा नजर वर झाली तर हा अनिमिष डोळ्यांनी माझ्याकड़े पाहत असलेला दिसला. मी माझी नजर थांबवलीच आज त्या पॉइंटवर प्रश्नार्थक नजरेने. तर यावेळी तोही घाबरला नाही.
" मैडम, तुम्ही विचारले ना काल, माझी मिसेस कशी दिसत होती. काल सांगितले नाही. कारन तुम्ही विश्वास ठेवला नाही, भलताच अर्थ काढला तर अशी भीती वाटली. पण आता सांगून टाकतो. मैडम, माझी मिसेस हुबेहुब तुमच्या सारखी दिसायची. अगदी हुबेहुब. तुम्हाला पहिल्यांदा साहेबांच्या केबिनमधे पाहिले तेंव्हाच जाम उड़ालेलो मी. इतका कसा सारखेपना? अजिबात संबंध नसलेल्या दोन मानसांत? हा प्रश्न मला पन पडलेला. मी इथे तासंतास बसलो. तुमचे लक्ष नसले की तुमचा चेहरा बघायचो. वेगला अर्थ नका काढू मैडम. तुमच्यापेक्षा रंगाने थोड़ी उजल होती. पण चेहरा असाच. मिलता जुलता एकदम. हसायची पन तुमच्या सारखीच. फरक एकच, की तुमचे केस छोटे आहेत बापकट, तिचे एकदम लाम्बसडक, कंबरेच्या खालीपर्यन्त."
" फ़क्त ३ दिवस दवाखान्यात राहीली मैडम, फ़क्त ३ दिवस. साधं आंबे खान्याचं निमित्त हो. वाडीतून आंबे आले होते. घरातल्या सगल्यांनीच खाल्ले. हिलाच कसे बाधले देवालाच माहित. मी ऑफिसला होतो. निरोप आला तसा घराकडे धावलो तर ही उलट्यांनी बेजार. लगेच डॉक्टरकड़ नेलं . डॉक्टर म्हनाला फ़ूड पॉइज़न. सिविलला न्या. पन मी प्राइवेटला नेलं. एडमिट केलं. ३ दिवस एडमिट होती. दुसऱ्या दिवशी खरंतर सलाइन पन काढली डॉक्टरनी. अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट मिलाली होती हो. उठून बसलेली. माझ्या आईला 'आई' च म्हनायची. सासू-सुनेत मायलेकींचे प्रेम हो. तर आईला म्हणाली तुला मी अशी बरी दिसतेय का? माझे केस विंचरून दे. चेहरापन पूस आणि टिकली पडलीय कपालावरची. घरी गेलीस की आधी माझं टिकल्यांचं पाकिट पाठव यांच्याजवल , आठवनीने."
“आई ने तिचे केस विंचरले. घट्ट वेनी-बीनी घातली. चेहरा पुसून दिला.
ती त्या दिवशी जास्तच चांगली दिसत होती की काय, नेहमीपेक्षा, जास्त चांगली-जास्त उजल वाटली मला. सलाइन बिलाइन मुले की काय देवालाच माहित."
"तिला अशी व्यवस्थित बघुन आई म्हनाली मला घरी पोहचवून दे, मुलंपण २ दिवस नीट जेवली नाहीयेत. मी स्वयंपाक करते. हिचा डबा देते. "
ही पन म्हणाली जाऊन येवा घरुन. पन लवकर या आणि तेवढा टिकल्यांचा पाकिट आठवनीने आना."
"बस्स , स्कूटर वर आईला घेवून मी घरी आलो. जरा बसलो. शेजारून पोरं घरी आली. त्यांना आई बरी आहे सांगतच होतो. तर दवाखान्यातून फोन. ' ही शिरीयस ' म्हनून.
कसाबसा दवाखान्यात पोहचलो तर ही गेलेली पन. अर्ध्या-एक तासाचा खेल फक्त. होत्याची नव्हतीच झाली मैडम ती तर"
तो नॉनस्टॉप, एका दमात सांगत होता आणि मी नॉनस्टॉप हादरत होते.
कुठलासा भीतीचा एक ढग सरसर चढ़त गेला मनभर.
बारीकसा कंप सुटला अंगाला.
काही तरी आणखी सांगणार हा माणूस आता, माझ्याशी दॄढ संबंध असलेलं, आणखी घट्ट संबंध असलेलं , साम्य असलेलं अशी एक घंटा मेंदूत ठणठण वाजू लागली.
आणि मेंदूला न विचारता ओठांतून प्रश्न गेला,
"तिचं नाव ? "
माझा आवाज प्रचंड घोगरा झालेला. घशाला कोरड पडलेली.
" नो, नाही, नसावं" अशा अर्थाचा गाज अंगभर उमटत असतानाच त्याने तिचे नाव उच्चारले.
येस. आजूबाजूचे जग थांबले, थिजलेच त्या क्षणी.
आमचे दोघीचे नाव 'एक' च होतं.
थांबलं.....त्याचं सांगणं, माझं विचारणं.
कपाळावर चरचर उमटलेला घाम तिथेच सुकला, विरला. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावून एका दमात पूर्ण संपवत मी स्वतःला कसंबसं नॉर्मल केलं.' इतकंच होतं हे वर्तुळ..... आता संपलंय...... तुला स्पर्श करणं इतकाच हेतु यात निसर्गाचा..... बाकी आक्खं वर्तुळ वेगळं ....तुझं-तिचं ." असं ठामपणे स्वतःला बजावत.
भेदरलेली नजर स्थिर झाली. शरीरातला कंप थांबला.
शिपायाने सही झाली म्हणून आणून ठेवलेल्या त्याच्या बदलीच्या ऑर्डरचा पातळ शुभ्र कागद नीतळपणे फड़फड़त होता टेबल वर.
मी तो उचलला. त्याला दिला. आभार वगैरे मानत तो निघून गेला. त्याच्या स्वभावानुसार, सहज.
कारण त्याला माझे पाहिले नाव कुठे माहित होते? टेबलवरच्या नेम प्लेटवर फ़क्त इनिशियल्स होती.
मला त्या टोटल सिचुएशन मधून बाहेर पडायला बरेच दिवस लागले.
मी कुठल्याशा वेगळ्या वर्तुळाला स्पर्श केला त्या दिवसात इतकेच होते ते प्रकरण माझ्यासाठी. यापुढे मला ते सारे आठवायचे नव्हते की त्यापुढचे काही समजूनही घ्यायचे नव्हते.
पुढे कधीच त्या माणसाची मी कुठे चौकशी केली नाही. त्याचेही नंतर कधीच कुठल्या कारणाने समोर येणे झाले नाही.
आयुष्य बदलत जाते प्रत्येक टप्प्यावर. माझेही बदलले. ते काळे कभिन्न दिवस सरले. जराजरा उजळत गेले आजूबाजूचे वातावरण आणि जगणेही.
फ़क्त, उन्हाळ्यात मिळतील तसे भरपूर आंबे खाणे त्या दिवसापासून थांबले ते थांबलेच.