Quantcast
Channel: BookHungama
Viewing all 1118 articles
Browse latest View live

स्पर्श–विनया पिंपळे

$
0
0

विनया जियो...सुंदर लेखन....एका स्त्रीची नाजूक भावना किती अल्लद पकडली आहे शब्दात

स्पर्श – विनया पिंपळे

सुरुवातीला सहज म्हणून बोलता बोलता ओळख झाली आणि नंतर बोलता बोलता सहज म्हणूनच मैत्री सुद्धा !!

निरोप घेताना अगदी सहज म्हणूनच त्यानं हात पुढे केला आणि तितक्याच सहजपणे संस्काराचे, संस्कृतीचे असंख्य डोळे आतून-बाहेरून सर्वांगभर रुतल्याचं तिला जाणवलं. तिनं उत्तरादाखल हसत हसत हात जोडले. 'हुश्श!' म्हणत सगळे डोळे आपोआप मिटले गेले.

.... पण 'आपण हातात हात घेतला असता तर ...!! ....तर कदाचित ...

गेल्या कित्येक वर्षांपासून या 'कदाचित' नंतरच्या झुळझुळत्या मोहक स्पर्शापाशी तिचे मन अडकून आहे. एकटीच्या एकांताला सोबत म्हणून का होईना .... कुणीच डोळे उघडत नाही.


मी माझा–गौरी लहुरीकर

$
0
0

रूपक कथेचे एक स्वतंत्र स्थान आहे....आणि ते महत्वाचे आहे.

मी माझा – गौरी लहुरीकर

बागेत सगळी फुलं होती.... एकमेकांशी न बोलताच मस्त वार्यावर डोलत उभी होती... अचानक गुलाब बोलता झाला... आजपासून बागेचा राजा मी ...सर्वांना मी सांभाळणार... जास्वंद ओरडले,का म्हणून??वा रे वा तुच का सगळीकडे?...तुलाच का रे भारी हौस!आम्ही आहोत इथे.... गुलाब म्हणाला...अरे, तुला का एवढे वाईट वाटतय... मी तेवढा समर्थ आहे सांभाळायला...तितक्यात चमेली म्हणाली..तु तुझ्या काट्यांनी किती किती जखमी करतोस सर्वांना..आणि तुझी मिजास तर बघ...जिथे तिथे आमच्या पुढे असतोस..गुलाब हसला...माझ्या रूपाने सुद्धा घायाळ होतात... माझ्या शिवाय लग्न, समारंभ नाही, स्वागत शुभेच्छा नाही...मधुचंद्र नाही... प्रेमाचे प्रतीक म्हणजे मी.... मी मिळवलय हे सर्व.... आणि तेही माझ्या सामर्थ्याने...हळूच मोगरा म्हणाला...जाऊद्या रे ..आपणही का भांडतोय विनाकारण.. माणसं भांडतात तसे... गुलाबा...सगळेच काही ना काही घेऊन आलेले आहेत... कुणी रूप,रंग, सुगंध, आकार, डौल....तुझ्याकडे सर्व आहे... पण तेवढा गर्व नको रे... तितक्यात बागेत काही टवाळखोर आले... आणि झाडावरचे सगळे गुलाब ओरबडले....खाली विखुरलेल्या पाकळ्या मुसमुसल्या....मी सुंदर होते हा गुन्हा झाला बहुधा...आणि तो गर्व नव्हता...तो.....जाऊद्या.. कोण समजणार?!!

शिकार–उमेश पटवर्धन

$
0
0

ही कथा सुद्धा सुंदर रूपक कथा आहे...मी मुद्दामून दोन्ही रूपक कथा एकाच दिवशी दिल्या आहेत.

शिकार – उमेश पटवर्धन

त्या जंगलात ते नाजूक, कोवळे हरीणाचे पिल्लू मुक्त फिरायचे. एका जागी ते स्थिर नसायचे. कधी इकडे तिकडे उड्या मार, कधी कोवळया वेलींशी लगट कर तर कधी झऱ्याच्या पाण्यात मनसोक्त खेळून घे असे उद्योग ते दिवसभर करायचे. हरीण हरीणी हे कौतुकाने पाहत आणि सुखावत. त्यांचा दोघांचा खूप खूप जीव होता आपल्या पिल्लावर! पण त्याचबरोबर ते अधून मधून त्या पिल्लाला धोक्याचा इशारा देत असत. हे जंगल दिसते तितके सुरक्षित नाही, वाघ, सिंह, लांडगे आपल्या मागावर कसे असतात हे ते त्या पिल्लाला वेळोवेळी समजवायचे. पण पिल्लाला ते मनातून कधी खरं वाटलं नाही. इतक्या सुंदर जंगलात असं काही हिंस्त्र त्याने आत्तापर्यंत बघितलं नव्हतं.

पण दुर्दैवानं हरीण हरीणीचं खरं होतं. एक लांडगा त्या पिल्लाला मनसोक्तपणे खेळताना दररोज बघायचा आणि जीभल्या चाटत रहायचा. कधी आपण या लुसलुशीत पिल्लाची शिकार करायची हे तो मनोमन ठरवत होता.

अखेर त्याला ही संधी मिळाली. त्या दिवशी कळप सोडून पिल्लू एकटेच त्या झऱ्यापाशी आले होते, पाण्यात खेळायला..आई बाबांना न सांगता..त्यांची नजर चुकवून.. लांडगा मागावर होताच, त्याने काही वेळ पिल्लाला पाण्यात मनसोक्त खेळू दिले आणि अचानक समोर येऊन त्याच्यावर झडप घातली. पिल्लाला काही समजायच्या आत लांडग्याने त्याच्या नरडीचा घोट घ्यायला चालू केलं होतं. शेवटचा श्वास घेताना पिल्लाला दिसले ते लांडग्याचे वखवखते, लाल, विखारी डोळे..

हळू हळू जंगलात ही गोष्ट पसरली. बरेच जण हळहळले..काहींनी आपापल्या पिल्लांना बजावले..काहींनी लांडग्यांचा बंदोबस्त करायची मागणी आपल्या गट प्रमुखाकडे केली..तर काहींनी पिल्लाला एकटे फिरण्याबद्दल दोषी धरले.

हरीण हरीणी मात्र सुन्न बसून राहिले होते.. त्यांना एकमेकांशी सुद्धा काय बोलावे ते कळेना.. शेवटी भरल्या गळ्याने हरिणी म्हणाली..

'वेडं होतं नाही आपलं पिल्लू? या जंगलाचे नियम तिला कधी कळलेच नाहीत..तिच्या मनातलं सुंदर जग मी रोज तिच्या नजरेतून पहायचे.. कधी कधी ते खरंही वाटायचं मला..आज त्याचाही अंत झाला..'

काळोख–मृणाल वझे

$
0
0

अंधारातच उजळण्याची क्षमता असते....सुंदर कथा आहे...मृणालची

काळोख – मृणाल वझे

चांगलाच काळोख पडलेला.... गाडी लेट झाली... त्यात लेकासाठी खरेदी करायला गेली. दुकानात पण खूप गर्दी! शेवटी उशीर झालाच !

तिला कधीच या गल्लीतून यायला आवडायचे नाही.शॉर्टकट होता तो, पण कधीच यायची नाही ती. लेकाला सुद्धा सक्त ताकीद दिलेली " कितीही उशीर झाला तरी या रस्त्यावरून यायचे नाही "

अंधारी गल्ली... त्याला लागून असलेल्या गल्लीत सगळी पडदा लावलेली झोपडीसारखीच खोपटी. मिणमिणते दिवे. एकंदरीत अंधारच !!! पिवळा प्रकाश. संध्याकाळ झाली की त्या पडदयामागुन बांगड्यांचा किणकिणाट... हास्याचे आवाज यायचे. मनावर दडपण यायचे तिला.

ती टाळायचीच नेहेमी पण आज तिला पर्याय न्हवता. उद्या मुलाचा बारावीचा पहिला पेपर होता. त्याला लवकर जेवायला घालायचे होते. त्याचे अभ्यासाचे किती झालंय याचा चुचकारून अंदाज घ्यायचा होता.

मनाचा हिय्या करून ती त्या गल्लीत शिरली. झपझप चालू लागली. आज तिचे नशीब जोरावर न्हवतेच. कचकन ठेच लागली आणि चप्पल तुटली. दोन पावले पाय ओढत चालली ती, पण पाऊल पुढे टाकताच येईना. म्हणून ती शेवटी खाली बसली आणि चपलेला पिन लावण्यासाठी पर्स मध्ये शोधू लागली. तेव्हड्यात एक छान शिटी तिला कानावर आली. मनात एकदम धस्स झाले. थोडी सावरली ती... कारण ती शिट्टी "तशी " न्हवती. एक छान गोड पक्षाच्या आवाजाची होती. तिने हलकेच रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बघितले, जिथून तो आवाज आला होता.

एक १६/१७ वर्षाचा मुलगा तिथे उभा होता. चांगले धुतलेले शर्ट पॅन्ट घातले होते. तेल लावून केस विंचरलेले. पायात साध्या स्लीपर ... नुकतीच कुठे मिसरूड फुटायला लागलेली. ती पिन हातात घेऊन बारीक नजरेनी त्याला न्याहाळू लागली. एक जाणवले तिला की त्याच्या चेहेऱ्यावर शांत समाधानी भाव होता. तरीपण तिच्या अंगावर शहारा आला " आता ह्या वयात हे सगळ .... "

तेव्हड्यात तिथल्या एका पडद्यामागुन एका स्त्री????? बाहेर आली. नटलेली...चांगली साडी....हातभार बांगड्या...चेहेऱ्याला भडक मेकअप ..आणि हातात काहीतरी ...! दिसलं नाही तिला ते. तिला काय करावे सुचेना. चप्पल तर नीट होत न्हवती. भरभर चालता पण येणार न्हवते. हातात घेऊन चालावे तर रस्ता बकाल होता. दगड, धोंडे,कचरा ... दुर्गंधीने व्यापलेला!!!!!

पुन्हा ती चपलेशी झटपट करू लागली. पण तिचा एक डोळा आणि पूर्ण लक्ष त्या मुलाकडे होते. पडद्यामागुन आलेली स्त्री धावतच रस्ता क्रॉस करून त्या मुलाजवळ आली. चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता!!!!!

तिने हळूच बघितले त्या दोघांकडे ...बघताच मात्र तिच्या डोळ्यात पाणी तरळले!!

ती स्त्री त्याच्या जवळ पोहोचल्यावर तो पटकन तिच्या पायाशी वाकला आणि त्याने त्या स्त्रीला नमस्कार केला. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या चेहेऱ्यावरून ओवाळून आपली बोटे कानशिलाकडे मोडली. तिच्या हातात दोन महागाईतली पेनं होती. तिला त्यांचा संवाद थोडा थोडा ऐकू येत होता.

"कल पहिला पेपर ना? अच्छा लिखना .... मन लगाकर पढना... ! रोज सुबह कूछ खानेको ना मिला, तो दो केला खाके पेपरको जाना ! मन और पेट शांत होगा तो पेपर अच्छा लिखोगे"

असेम्हणून त्या स्त्रीने त्या मुलाच्या हातात काही पैसे सरकवले. तो पुन्हा एकदा खाली वाकला आणि भर्रकन निघून गेला.

तिने आपल्या लेकासाठी घेतलेले पॅड एकदम उराशी घट्ट कवटाळले... चप्पल हातात घेतली आणि बाहीने डोळे पुसतपुसत पुन्हा एकदा झपझप चालायला सुरवात केली

कचऱ्यावरून चालत होती ती....पण मन मात्र एकदम स्वच्छ होऊ गेले होते ...!

बाळा-संजन मोरे

$
0
0

संजनचा बऱ्याचदा हेवा वाटतो...आपल्याकडे आपले शब्द असावेत आणि सांगण्यासारख इतक काही असाव...व्वा!

बाळा-संजन मोरे

“ बाळा ...आज आमची ईराची जत्रा आहे. आईला विचारून जत्रेला येशील? “उम्या सांगत होता. बाळाने पण उम्याकडून या जत्रेविषयी बरेचवेळा अैकले होते. बाळाने मग आईची परवानगी घेतली. तो काका नको म्हणत होता. ती लोकं चांगली नाहीत म्हणत होता. दारू गाळतात, माणसं मारायची सुपारी घेतात. चोऱ्या करतील, दगाफटका करतील, वाटमारी करतात. तसल्याची संगत नको, असं त्याचं मत होतं. पण बाळा ठाम होता. आईने मग परवानगी दिली.

बाळा खुशीतच नाईकवस्तीत आला. धोतर, पैरण, पटकावाले म्हातारे गडी, तर पायजमा, पैरण टोपी वाले तरणे गडी. अर्धी चड्डी अन तीन गुंड्याचे शर्ट वाली उम्याची पीढी. परकर झंपरातल्या पोरी अन इरकली साड्यावाल्या बायका. सगळी नाईकवस्ती नटून तयार होती. उम्याच्या दारातच दोन ट्रायल्या लागल्या होत्या. एकात बायामाणसं तर दुसऱ्यात गडी बाप्ये. बाळापण उम्याबरोबर ट्रायलीत चढला. मांडी घालून बसला. ईराला ठेवलेले पाच बालींगे ट्रायलीतच होते. गळ्यात चाफ्याच्या फुलांची माळ अन कपाळाला पिवळा भंडारा. वर्षभर संभाळलेले ते बालींगे लदलद करत होते. फुरफुरत होते. बाळाची नजर सारखी त्यांच्यावरच पडत होती. आज त्यांच्यावरच जत्रा होणार होती, बाळाला त्याची थोडीशी कल्पना आली होती. त्याला वाईट वाटले. काही प्राण्यांचा जन्मच मुळी माणसाच्या खाण्यासाठी असतो. देव खरंच असेल का? नसेलच बहुतेक! बाळा विचारात मग्न होता. तेवढ्यात ट्रॅक्टर सुरू झाला. ट्रायलीत गर्दी झाली. माणसं फाळक्यावर बूडं टेकवून एकमेकाला धरून बसली. प्रवास सुरू झाला. गचके खात, आदळत आपटत माणसं माळाच्या दिशेने निघाली.

प्रचंड माळ होता. सगळी मुरमाड जमीन. जवळपास लोकवस्तीचा मागमूस नाही. माणसं उतरली. ट्रायल्या पाण्यावर गेल्या. आसपासच्या विहरी शोधून पाण्याचे ड्रम भरले, त्याला फडकी गुंडळली. पाणी हेंदकळत ट्रॉल्या माळावर आल्या. मग ड्रम खाली उतरवले. उन्हाचा कार झाला होता. बायांनी कळकं रोवून, धोतरं पातळं लावून सावली केली. मग पाट्या वरूट्यावर मसाला वाटन सुरू झाले. वरवंटा गुरगुर करत पाट्यावर फिरू लागला. मसाला रगडला जावू लागला. कांदा, लसूण, खोबरं, लाल मिर्ची. पातळ लगदा, बाया हाताने निपटून हंड्यात भरू लागल्या. तोवर चूलवाण पेटलं. उम्याच्या आईसहीत बाकीच्या बाया, भाकरी थापायला बसल्या. पीठ मळता मळता त्यांच्या कपाळाचा घाम पीठात मिसळू लागला. कदाचीत त्यामुळेच त्या चूलीवरच्या भाकरीला चव येत असेल. उन्हाचा कार होताच. बालींगे वाजत गाजत एका रूईटीच्या झुडूपाजवळ न्हेले. चारपाच शीळा पडलेल्या होत्या. त्यांना गुलाल, भंडारा फासला. बकऱ्यांनापण लावला. बकरी भेदरली. उम्या बाळाला घेवून बाजूला आला. बाळाला ते बघवणार नव्हतंच. तरीपण बकऱ्यांचं ते केविलवाणं घुसमटलेलं बेंबटणं कानावर येतच होतं. माना सोडवल्या, रक्ताचा अभिषेक झाला. तूटलेल्या मानांची बकरी माळावर आली. तळवट, पोती अंथरली होती. बकरी टांगली, सरसर कातडी काढली. पांढरी धोट बकरी उघडी पडली. कुऱ्हाडी , सत्तूर, सुऱ्यांचे घाव होवू लागली. तूकडे पडू लागले. घमेली भरू लागली. सगळ्यांची कामे चोख चालू होती.

“ ये ..पोरांनो ..आरं निस्तं काय बसलायस ..जावा ती डेडाळी धूवून आणा .. “

कुणी तरी त्यांना म्हणलं, तसं उम्याने एक डेडाळे उचलले. बाळाला पाण्याची बादली, तांब्या घ्यायला सांगीतला. बाजूला आले. सुरीने डोबाळले होतेच. आतला चारा सांडत होता. उम्याने उलटे करून आतला सगळा चोथा काढून टाकून दिला. मग बाळाने पाण्याची धार लावली. तोवर बाकीची पोरंपण आतडी पोतडी घेवून आली. त्या उजाड माळावर कुत्र्यांनापण कुठून वास आला कुणास ठाऊक ? पण कुत्रीपण आली. त्यांची कळवंड सुरू झाली. सगळं स्वच्छ झाल्यावर रिकाम्या झालेल्या बादलीत आतडी पोतडी टाकली. पोरं तळावर आली. चूलवाणं तयारच होती. ढणढणा जाळ लागला, पातेली तापली. तेल, कांदा लसूण, खोबरं, सगळं खरपूस परतलं गेलं कडीपत्त्याच्या पेंढ्या ओरबडून टाकल्या. मग हळद मीठ कालवलेलं मटण पातेल्यात पडलं, लांब दांड्याच्या उलथन्याने उलथं पालथं होवू लागलं.चरचरीत फोडणी बसली मटनाचा सुवास सुटला. गडी खूश झाले. गांजा मळला गेला. चिलमी भरल्या. नारळाच्या केसराची गोळी, खडा, छापी, दमदार झुरके सुरू झाले. माणसं धुंदावली. उन्हाचा कार होताच. भर उन्हात मटन रटरट शिजू लागलं.

उन्हाचा कार होताच. भुंड्या रखरख माळावर एकही झाड नव्हते.खुरटी झूडपं होती. बायांच्या डोईवर पदर होते. बाप्यांच्या डोक्यावर पटके, टोप्या, फेटे होते. पोरं भुंडी , बोडकीच होती. उम्याने आईकडे जावून, पिशवीतले दोन गमजे काढले. एक डोक्याला गुडाळला. दुसरा बाळाला दिला. बाळाने उम्याचे बघून गाठी मारल्या. आता बाळा थोडासा त्यांच्या सारखा दिसू लागला. मटन शिजत होतं, तोवर ढोल घूमू लागले, हलगी कडाडू लागली, पिपाण्या वाजू लागले. काठ्या कुऱ्हाडीचे खेळ सुरू झाले. जो तो आपआपली कला दाखवू लागला. भंडारा उधळला जावू लागला. कुऱ्हाडीवर कुऱ्हाडी पडू लागल्या, घाव झेलले जावू लागले. बाळाचे काळीज लकाकू लागले. गड्यांनी जूनं लाल मातीचं मैदान कुदळी टिकावाने उकरलं, खडे वेचले, काटा कुटा काढला. मग झटापटी सुरू झाल्या. पोरं लंगोट लावून एक मेकाला भीडली. गडी बाप्ये, म्हातारी उघडी होवून एकमेकांना झोंबू लागली. दंड थोपटले जावू लागले. उम्यापण उघडा झाला. बाळाला उघडा केला. एका चिवट लवलवत्या बारक्या पोराने बाळाबरोबर कुस्ती धरली. उम्याने बाळाला कुस्तीचे पवित्रे शिकवले. हातात हात कसा द्यायचा, बोटात बोट, मनगट कसं धरायचं, पाठीचा बाक, जमीनीवर भक्कम उभं कसं ठाकायचं, थोडक्यात सांगीतलं. पोरालाही सांगीतलं. पोराने दोनतीन डाव केले, बाळाला लाल मातीत थोडासा घोळसला. मग बाळाला एक डाव सांगून स्वतः त्या डावावर चितपट झाला. बाळाला मजा आली. खारीक खोबरं उधळली. घामानं, मातीनं अंग ओलंचिक्क झालं. मग पोरं विहरीवर पळाली. विहरीत उड्या टाकल्या. मनसोक्त डुंबली. पाण्यात बुड्या देवून एकमेकाचा पाठलाग करत तळापर्यंत जावू लागली. बाळाला थोडं थोडं पोहायला येत होतं. पंधरा मिनिटात उम्याने त्याला पोहण्याच्या सगळ्या कला शिकवल्या. बाळाचा आत्मविश्वास दूणावला.

पोरं पोहून तळाकडं आली. देव देव झाला. ईरांना वाजत गाजत निवद गेला. तळवट टाकले, उन्हातच पंक्ती बसल्या. जेवणं सुरू झाली. ताटं गच्च भरली, भाकरी कुस्करल्या. लोकं नळ्या फोडू लागली, रस्सा वरपू लागली. बाळाची इच्छा होत नव्हती, त्याला ते बालिंगे दिसत होते. पण बाळा खेळून दमला होता, भूकही लागली होती. मग बाळाही जेवला. जेवणं झाली. पान सुपारी आली. तळवटावर बैठक मारून सगळे पान सुपारी खावू लागले, अन बसल्या बसल्या पटदिशी मरून गेले. बाळा बावरला. बायकांचा कल्लोळ उसळला. पळत आल्या. रडू रडू पोरांना, माणसांना उठवू लागल्या. वाजंत्र्यांनी सुरांचा आक्रोश मांडला, बाया शोक करू लागल्या, देवाचा धावा सुरू झाला, विनवनीची गाणी सुरू झाली. देव प्रसन्न झाला. एक एक विर उठू लागला. सगळे जीवंत झाले.

कधी काळी, या उघड्या माळावर जेवनात विष घालून विरांना मारलं होतं. बायांना कळाल्यावर त्या पळत आल्या. त्यांचा आक्रोश आभाळभर झाला. खंडोबा मल्हारीच्या कानावर गेला. बानू, म्हाळसा कासाविस झाल्या. त्यांनी देवाला विनवनी केली. मग देवाने सगळे वीर जीवंत केले. त्या विरांच्या स्मरणार्थ ही जत्रा दरवर्षी, भर दुपारी उन्हाच्या कारात भरते. वीरांच्या बदल्यात देवाने पाच बालिंगे मागून घेतले. वीर जीवंत झाले. सगळ्यांनी एकमेकांना कडकडून मीठ्या मारल्या. बायांनी पोरांचे मटामटा मूके घेतले. उम्या जीवंत झाला. बाळाला आनंद झाला. त्याने उम्याला मीठी मारली. पोरांनी बाळाला मीठी मारली. बाळा त्यांच्यातला झाला.

उत्तरक्रीया-Madhavi Vaidya

$
0
0

किती समृद्ध कथा आहे ही...डॉ. माधवी वैद्य एका मोठ्ठ्या सुट्टी नंतर पुन्हा एकदा नुक्कडवर

उत्तरक्रीया - डॉ. माधवी वैद्य

समोर चिता ढणढणत होती. ती शांत मनानं कोणा बेवारशी बाईची उत्तरक्रीया मनोभावे पार पाडत होती. हे काम तिनं आपण होऊन अंगावर घेतलं होतं. सकाळी सकाळीच चर्चच्या काही नन्स तिच्याकडे बोलवायला आल्या. ‘ताई ! एक बेवारशी बाई आहे,तिला अग्नी द्यायचा आहे. याल का? नाही, खूप कामात दिसताय तुम्ही,एकदा वाटलं आपणच उरकून टाकावं सगळं. पण तुम्ही सांगितलं आहेत ना! असं काही काम असेल तर बोलावत चला म्हणून आलो. वेळ नसेल तर.’ ती उत्तरली ‘नाही नाही काम काय होतंच राहील. मला बोलावत चला तुम्ही.’ एका कर्तव्य भावनेतून नन्स हे काम करत होत्या आणि तशाच कर्तव्य भावनेतून ती त्यांना साथ देत होती. गुरुजींनी सांगितलेले सारे अंत्यविधीचे संस्कार तिनं मन घट्ट करून पार पाडले होते. त्या जळत्या जिवा शेजारी त्याच्यासाठी चार अश्रू ढाळायलाही कोणीच नव्हतं... तिच्या मनात आलं, कोण असेल ही अभागी बाई? जिच्या मागे पुढे कोणीच नाही? कशी जगली असेल ही? काय काय सोसलं असेल हिनं? काय काय भोगलं असेल? तिचं मन हेलावून गेलं. दर वेळी अशा बेवारशी प्रेताला अग्नी देताना तिला असंच हेलावून जायला होई. त्या व्यक्तीसाठी जमेल तसं प्रेमानं सर्व करून ती त्याला अग्नी देत असे. विचारात गढून गेलेली ती भानावर आली. समोर चिता जळत होती. ज्वाळा त्या बाईला चोहो बाजूंनी घेरू लागल्या. जिवंतपणी जगण्याचे चटके बसलेल्यांना त्या ज्वाळाही सुखावून जात असतील का? एका कवीनं आपल्या कवितेत म्हणून ठेवलं आहेना ! ‘शव हे कवीचे जाळू नका हो,जन्मभरी हा जळतचि होता.’ फक्त कवीच नाही , अनेक माणसं अशीच जन्मभर जळत असतात. कवी निदान शब्द प्रभू तरी असतात, त्यांच्या जाळणार्‍या व्यथा वेदनांना कुठेतरी वाट तरी मिळत असते. पण सामान्य माणसं जिवंत पणीच जळण्याचे चटके सोसत सोसतच इहलोकीची क्लेशकारक यात्रा संपवतात,तसंच झालं असेल या बाईचं. तिच्या मनात आलं... आपल्या आईचं देखील असंच झालं ना ...

तिचं मन बरेच वर्ष मागे गेलं. लहानपणी जरा समजत्या वयाची असताना जिवंतपणी जळणं म्हणजे काय याचा अनुभव तिनं घेतला होता. तिची आई रात्र रात्र खोकून खोकून औषध पाण्याशिवाय तडफडत जगत होती. तिची अशी अवस्था का झाली? कोणी केली? हिला आज पर्यंत काहीच माहीत नव्हतं..तिला फक्त आई भोगत असलेल्या व्यथेची ओळख होती.ही बिचारी तिला कधी तरी लिमलेटची गोळीच आणून दे, कधी पाणी पाज,असेच उपाय करत तिचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करीत होती.पण चिमुकले हात तिचे... आईच्या भयंकर रोगाला सावरण्यासाठी कितीसे उप योगी पडणार? मग दुसर्‍यापाशी दयेची याचना! तिथेही या लहानग्या जिवाला अपुरेपण जाणवायला लागलं. तिचा काही उपायच चालेना,तिला कोणाची मदत घ्यावी ते कळेना ..शेवटी तिनं गाठलंन चर्च. फूटपाथवर राहाताना ती बघत होती,या बाजूला असलेल्या इमारतीतून काळे झगे घातलेल्या बायका बाहेर पडतात आणि आपल्या सारख्या लोकांना काही खायला प्यायला आणतात,दवापाणी करतात. अगदी आजारी असणार्‍या लोकांना मायेनं उचलून त्या इमारतीत नेतात.आणि काही काही लोक काही दिवसांनी या इमारतीतून बरे होऊन बाहेर येतात...तिच्या मनाला या विचारानं जरा धीर आला होता. आपल्या आईलाही असंच दवापाणी मिळेल का? आपल्या आईला या बर्‍या करू शकतील. या एकाच आशेवर ती त्या इमारतीत शिरली आणि तिच्या दैवाची दारेच जणू उघडली गेली. त्या नन्सनी तिचं म्हणणं आस्थापूर्वक ऐकलं. त्यांनी तिच्या आईला मोठ्या प्रेमानं चर्च मधे नेलं. न्हाऊ माखू घातलं.दवापाणी केलं. पण आई हाताला लागली नाही. नन्सच्या प्रयत्नांना दुर्दैवानं अपयश आलं. त्यांनी तिला अत्यंत ममत्वानं जवळ घेतलं. तिचे डोळे पुसले. आई देवाघरी गेली म्हणजे काय ? हे स्पष्टपणे कळण्याचं तिचं वय नव्हतं. फक्त तिला इतकीच अंधुकशी जाणीव झाली होती,आपली आई आता काही परत उठणार नाही बहुतेक.ती आता कधीच परत न उठण्यासाठी झोपी गेली आहे आणि आता देवबाप्पा तिला बरं करायला नेणार आहे. ..

नन्सच्या पुढचा प्रश्न आणखी गंभीर होता तो तिच्या आईच्या उत्तरक्रीयेचा. तो काळ रेशनचा होता. प्रेत जाळायलाही पुरेसे पेट्रोल,डीझेल मिळत नव्हते,मिळत होते ते पुरवठ्याला येत नव्हते. त्यांच्याकडील चितेसाठी लागणार्‍या डीझेलचा साठा संपला होता. कोणातरी मोठ्या माणसाच्या परवानगी शिवाय ते मिळणे शक्य नव्हते. त्यांनी सरळ या लहानगीला उचललं आणि त्या गेल्या कलेक्टर साहेबांकडे..कलेक्टर साहेब उमद्या मनाचा,दयाळू अंत:काणाचा होता. हे सार्‍या शहराला माहीत होते. अशा प्रकारे येणार्‍या प्रामाणिक अडचणींना ते आपणहून राजमार्ग सोडून आडवळणानं मदत करतात, हे ही नन्सनी अनेकदा अनुभवलेले होते... नन्सनी त्यांच्या समोर हात जोडले.या चिमुरडीला त्यांच्या समोर उभे केले आणि तिच्या आईची करुण कहाणी सांगण्यास सुरुवात केली... कलेक्टर खरोखरीच इतके सहृदयी होते की हे ऐकताना व चिमुरडी कडे बघताना त्यांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. ते सर्व तजवीज करून हिच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले. हिचे आणि हिच्या आईचे भाग्य इतकेच की आईचा अंत्यविधी कलेक्टरांच्या हातून झाला. हे सारं बघून हिचा लहानगाजीव इतका भांबावलेला होता की तिनं कलेक्टरांचा हात गच्च पकडून ठेवला होता. त्यांनी तिला कडेवर उचलून घेतलं होतं. ते जायला लागल्यावर तिनं आक्रोशून इतका गोंधळ घातला इतका की शेवटी कलेक्टरांनी तिला उचलले आणि सरळ आपल्या गाडीत घालून आपल्या घरी नेले. तिथून पुढे गतजन्मीचे असतील पण ऋणानुबंध असे जुळले की ती त्यांच्या घरी मुलीसारखी राहू लागली. त्यांनी तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला. मग तर तिचं रीतसर दत्तक विधानंच झालं. एकाच प्रसंगाने तिचं मातृ छत्र हिरावून नेलं होतं आणि पितृछत्र बहाल केलं होतं. ...काय नियतीचा अजब खेळ म्हणायचा हा !

कलेक्टरांच्या घरी, त्यांच्या संस्कारात हिला वाढायला मिळावं हे हिच्या भाग्यात लिहिलं होतं. येणारी जाणारी माणसं या चूणचूणीत मुलीकडे बघून म्हणत,‘काय हुषार,समजदार,गुणी पोर आहे कलेक्टरांची!’ आणि तिला कौतूकानं विचारत,‘बाळ ! मोठेपणी कोण होणार तू?’ ही एका क्षणात सांगे,‘मी ना! आबांसारखी मोठी कलेक्टर होणार!’आणि योगायोगानं एक दिवसती कलेक्टर झाली. तिच्या आबांना कोण आनंद झाला होता. कोण कुठल्या रस्त्यावर पडलेल्या पोरीनं नशीब काढलं होतं. सार्‍या गावाला कलेक्टरांनी पेढे वाटले त्या दिवशी. ती आबांच्या अत्यंतिक आदराने पाया पडली. पाया पडताना म्हणाली,‘आबा!आशीर्वाद द्या. माझं शिक्षण,माझा जन्म गोरगरीबांच्या मदतीसाठी खर्ची पडो.’ आबांनी तिला आशीर्वाद दिला. त्यांनी आशीर्वादासाठी डोक्यावर हात ठेवताच तिला तिच्या आईची ढणढणारी चिता स्पष्ट नजरेसमोर येत होती. ती मनातल्या मनात प्रार्थना करीत होती, ‘देवा ! जे हात मला आशीर्वाद देण्यासाठी लाभले आहेत,त्या हातांचं बळ माझ्यात उतरू देत. त्यांच्याच सारखी जनतेची निरलस सेवा माझ्या हातूनही घडू देत.’

आबांचा आशीर्वाद घेऊन ती पहिल्या दिवशी जेव्हा आपल्या खुर्चीत बसली तेव्हा चर्च मधून काही नन्स तिचा छोटेखानी सत्कार करायला आल्या. त्यांच्या हातात चंदनाचा हार होता. त्यांच्यापैकी एका नर्सला तिनं ताबडतोब ओळखलं. तिनंच तिला उचलून कलेक्टरांकडे नेलं होतं.न्हाऊ माखू घातलं होतं. चार घास प्रेमानं भरवले होते...त्या समोर दिसताच ती तत्काळ आपल्या खुर्चीतून उठली. त्यांचे हात हातात घेत म्हणाली,

‘मला आशीर्वाद द्या. आज मला हा दिवस दिसतो आहे तो तुमच्यामुळे.. मी जन्मभर ऋणी राहीन तुमची.’तिला आपल्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रूंना आवर घालणं शक्य झालं नव्हतं. ते अश्रू आभाराचे होते, कृतज्ञतेचे होते. त्या वृद्ध नननं तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं म्हणाली,

‘पोरी ! गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते,याचा कधीही विसर पडून देऊ नकोस. तो आकाशातला बाप फार मायाळू आहे. त्यानं आपल्याला गरीबांची सेवा करण्याकरता इथे पाठवलेलं आहे. ही गोष्ट तुझे आबा कधीही विसरले नाहीत. तू ही विसरू नकोस,विसरणार नाहीस अशी खात्री आहे आम्हाला.’

तिनं त्यांना आश्वासित केलं.म्हणाली,

‘काळजी करू नका.आबा आता थकले आहेत,पण मला कधीही बोलवा.हक्कानं बोलवा. मी येणार नाही,असं होणार नाही. हा शब्द आहे माझा’ त्या तिचे हे बोलणे ,ऐकून समाधान पावल्या. ती वृद्ध नन तिला म्हणाली,

‘ हो. ते तर तू करशीलच. खात्री आहे आमची. पण आणखी एका उत्तरक्रीयेची जबाबदारी तुला उचलावी लागेल. तुझ्या आबांचा काळ तुलनेनं बरा होता.आता तुझ्यासमोर अवघड काळ उभा ठाकलेला आहे. तुझे आबा गरीब,असहाय्य लोकांची उत्तरक्रीया करायला हातभार लावत होते. आता तुझा सामना असणार आहे,तो समाजात ल्या बेगुमानपणे वागणार्‍या,उन्मत्त, आडदांड नरकंटकांशी.त्याुंची उत्तरक्रीया करण्याची जबाबदारी तुला उचलायची आहे.हे आडदांड लोक गरीबांना त्यांच्या सर्व सामान्य हक्कांपासून वंचित ठेवत आहेत त्यांना अनेक प्रकारे नाडताहेत. त्यांचे जगणे असह्य करून सोडत आहेत. त्यांचा नायनाट करणे, म्हणजेच गरीबांना जगण्यासाठी मदत करणे,त्यांना चार घास सुखानं खाता येतील याची सोय करणे अशा अमानवी लोकांची जिवंतपणीच उत्तरक्रीया करण्याचे बळ ईश्वर तुला देवो, ही त्या दयाळू आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करते... ’

त्या ननचे चार शब्द तिच्यासाठी लाख मोलाचे ठरले. तेव्हा पासून ती एक अत्यंत निडर कलेक्टर म्हणून वाखाणली गेली. तिच्या अधिकार कक्षेत असणारे,गुन्हे करणारे,गरिबांना नाडणारे , भ्रष्टाचारी,दुराग्रही,चोर,लफंगे,पिळवणूक करणारे नेते तिच्या कारकीर्दीत गजाआड गेले. प्रसंगी जोखीम स्वीकारूनही तिने समाज नितळ करण्याचा जणू विडाच उचलला. परिणामी तिच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशात सर्वत्र आश्वासक वातावरण निर्माण झाले. तिच्या आबांना मनात वाटत राहिले,खरोखर माझ्या पोटच्या पोरीनं तरी मला इतकं समाधान दिलं असतं की नाही कायकी.. सर्वसामान्य लोक बिनधास्तपणे आपल्याला नाडणार्‍या लोकांना विचारू लागले,

‘ ए ! सरळ वागतोस? की कलेक्टरबाईंना तुझी उत्तरक्रीया करायला सांगू?’

हळुहळू तिच्या कारभाराची प्रशंसा होऊ लागली.सरकारनंही या स्वच्छ कारभाराची दखल घेतली.राष्ट्रपतींच्या हस्ते तिच्या समाज सेवेबद्दल तिचा सन्मान झाला.इतके मानसन्मान मिळत होते पण ती चर्च मधल्या नन्सचे बोलावणे आले की धावून जात होती.

तशीच धावत पळत एका बेवारस बाईची उत्तरक्रीया करायला ती चर्च मधे पोहोचली होती.अशी उत्तरक्रीया करताना तिला तिच्या आईची खूप आठवण येई. तिचे डोळे पाणावत ती मनातल्या मनात म्हणत असे,‘मला आज सारे सारे मिळाले आहे,फक्त तूझ्याशिवाय...पण प्रत्येक मातृरूपात मला तुझीच छबी दिसते, दिसू शकते,हे माझं भाग्य आहे..’

तिच्या मनात तिचा सारा जीवनाचा पट उलगडत होता... समोर कोणा बेवारशी बाईची चिता ढणढणत होती... ती तिची उउत्तरक्रीया अत्यंत ममत्वानं पार पाडत होती...

बाईपण–शशी डंभारे

$
0
0

ही कथा वेगळी आहे...पण अत्यंत ताकदीची आहे....पत्राच्या स्वरूपात आहे...

बाईपण–शशी डंभारे

सई,

तुझ्या मनातलं विचारांचं, भावनांचं झाडं नेहमीच सळसळतं मला पाहून...

फांद्या झेपावतात तुझ्या, माझ्या मनापर्यंत पोहचण्यासाठी.

आणि जीवही तुटतो तुझा, मी " तू " बनू नयेस यासाठी, हे पहिल्याच भेटीत कळलं होतं मला.

पण मी वाट पाहत राहीले.

मला खात्री होती.

शिशीरात पानगळीच्या निमित्ताने भेट होईलच तुझ्याशी.

आज तू आलीस. वारा जोराचा होता.

गळलो दोघीही ब-याच.

पानांचा खच.

ओळखूच येईनात कुठली तुझी कुठली माझी.

एकमेकींना निष्पर्ण होताना पाहूनही अल्हाद दाटून आलेला डोळयात.

पाणीही साचलं तू "काळजी वाटते तुझी" म्हणालीस तेव्हा.

आणि मी "नको काळजी करुस" म्हणाले तेव्हाही.

कुठले वेगळे स्त्रोत होते आदीम स्त्री जातीचे एकमेकींशी बोलताना देव जाणे, पण ओळख द्यावी लागली नाही वेगळी.

हातात हात घालून चालत रहावं एकमेकींना ऐकत असं वाटत होतं एवढं नक्की.

पाठमोरी वळलीस तेव्हा चुकून नाही तर समजून उमजून माझी पानं वेचून घेऊन जात आहेस हे कळलं मला.

तुलाही कळलं असेलच.

माहिती आहे दोघींनाही, यापुढे माझं हिरवेपण घेऊन बहरशील तू ...

आणि तुझ्या काळजीची जांभळी फुलं असतील माझ्या फांदीफांदीवर..

किती आदीम ना, तुझ्या माझ्यातलं हे बाईपण !

आभास-Supriya Bharaswadkar

$
0
0

सुप्रिया भारस्वाडकरचे नुक्कड वर हे पदार्पण आहे...खूप अपेक्षा निर्माण करणारी कथा तिने दिली आहे.

आभास-सुप्रिया भारस्वाडकर

खिडकीतून घराच्या मागचा हिरवागार डोंगर आणि तो छोटासा धबधबा पाहून तिला खूप तीव्रतेने त्याची आठवण झाली. तिच्या मनात विचारांचे अनेक छोटे मोठे हिरवे डोंगर उभे राहिले.. अगदी समोर दिसत असलेल्या डोंगरासारखे. तो असता तर काय केले असते त्याने हा नजारा पाहून? हळूच मागून येऊन त्याने तिचे डोळे बंद केले असते, ती नेहमीप्रमाणेच त्याच्या स्पर्शाने रोमांचित झाली असती. मग त्याने विचारले असते जाणूनबुजून, ओळख पाहू कोण? आणि तिनेही माहिती असून उत्तर दिले असते, आधी ओळख पटण्यासाठी काही खूण तर हवी ना. मग त्याने नुकतीच सुचलेली एक कविता त्याच्या हळुवार आवाजात गाऊन दाखवली असती. त्याची कविता पूर्ण होईपर्यंत त्याच्यात हरवून गेलेली ती, अचानक भानावर आली असती आणि नेहमीप्रमाणेच त्याच्या मिठीत सामावून गेली असती.

स्वतःच्याच विचारात गुंगून गेलेली असताना तिची तंद्री मोडली त्या पावसाच्या थेंबांनी. जणू तिला वास्तवात आणण्यासाठी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली होती. चेहऱ्यावर पडणाऱ्या त्या तुषारांनी तिला जाणवले की ती पुन्हा एकदा त्या स्वप्नांच्या दुनियेत रमली होती. तो असण्याचा आभास तर आहे, पण तो कुठे आहे प्रत्यक्षात? कुठे आहे, कसा आहे काहीच तर माहिती नाही आपल्याला. त्याला आपली आठवण आहे की नाही हेही माहित नाही. आणि आपण मात्र अजूनही त्याच्या येण्याची वाट पाहतोय.

तो येऊनही वास्तवात काहीच फरक पडणार नव्हता. दोघांच्या वाटा नियतीनेच वेगळ्या केलेल्या होत्या तेव्हाच. पण फक्त एकदा त्याला बघण्याची, भेटण्याची आस मात्र कायम होती. बाहेर पावसाच्या काळ्याकुट्ट ढगांनी जस अंधारून आलं होत, तसं तिचं मनही उदासीनतेने झाकोळून गेलं. आणि जसजसा पावसाचा वेग वाढत गेला, तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंचा आवेग तिलाही थोपवता येईना..


फुलराणी–सुचिता घोरपडे

$
0
0

आजची सुचीताची कथा वेगळी आहे...तिच्या नेहमीच्या बाजा पेक्षा...आणि हेच मला तिचे कौतुक वाटते...ती प्रयोग करीत रहाते.

फुलराणी – सुचिता घोरपडे

आबांना शोधत शोधत परसदारी आले, तर ते तिथेच होते त्यांच्या जीवाभावाच्या वडाच्या जोडीने वाढलेल्या फुलराणीच्या वेलीजवळ बसलेले. आज माईला जाऊन चार महिने होत आले पण आबांची मनस्थिती अजूनही काही बदललेली नव्हती.कितीवेळा आबांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रयत्न केला पण व्यर्थ. आबांनी अगदी घट्ट कोषामध्ये बंद केले आहे स्वतःला. माईसोबत व्यतीत केलेल्या सगळ्या आठवणी जश्या काही त्यांनी आतमध्ये साठवून ठेवल्या आहेत आणि जगाचे भान विसरून ते फक्त त्या आठवणी सोबतच जगत आहेत. त्यांचा कोणी सोबती असेल तर तो परसदारी असणारा वड आणि त्यावर चढलेली ती फुलराणीची वेल.

वर्षानवर्षे जशी माईने आबांना सोबत केली तशीच काहीशी ह्या वेलीनेही त्या वडाला सोबत केली आहे. तो वड तिच्या फुलांनीच सजला आहे. त्याच्या आधाराने वाढताना ती वेलही स्वतःचे अस्तित्व विसरून हसते, फुलते. फक्त त्या वडासाठीच जणू काही ती सजते सवरते. तिने तिच्या फुलापानांनी त्याच्या पूर्ण अंगा खांदयावर हिरवी जरतार विणली आहे आणि त्यानेही अगदी प्रेमाने तिला आपलेसे केले आहे. त्यांना वेगळे पाहताच येत नाही कधी, असे वाटते की ते दोघे एकमेकात अखंड मिसळून गेले आहेत. तिच्या शिवाय तो आणि त्याच्या शिवाय ती अधुरेच वाटतात. अगदी माई आणि आबांसारखे. कधी असे वाटलेच नव्हते की माई आबांपैकी एकाला असं एकटे झालेले पहावे लागेल. आबा अगदी एकटे पडले आहेत माई शिवाय.

का कोणास ठाऊक पण माई गेल्या पासून ही फुलराणी सुकत चालली आहे. किती खतपाणी केले आबांनी पण तिची पानगळ काही केल्या थांबत नाही आहे. आता तर आबा रोजच तिच्या सोबत माईशी बोलल्याप्रमाणे बोलत राहतात. असं म्हणतात की झाडांसोबत बोलले की त्यांची चांगली वाढ होते. पण ही वेल तर सुकतच चालली आहे. तो वडही सध्या हिरमुसलेलाच वाटतो. फुलराणीच्या वाळत चाललेल्या झामोळ्यांनाही त्याने अगदी घट्ट कवटाळले आहे.

आबांना सोडून जायला मन तयार होत नाही आहे. पण काय करावे मुले तिकडे एकटी आहेत. आणि आबा काही केल्या हे घर, त्या वड आणि फुलराणीला सोडून यायला तयार नाहीत. त्यांच्याही भावना गुंतल्या आहेत या सर्वांमध्ये. साहजिकच आहे ते. त्यामुळे असं त्यांना एकटे सोडून आबा कधीच नाही तयार होणार माझ्यासोबत येण्यासाठी.

काही दिवसांनी आबांचा फोन आला, “आपली फुलराणी पडली गं मनु....माझा वड आज धाय मोकलून रडत आहे.....त्याची सोबत तुटली...उन्मळून पडली गं फुलराणी. माझ्या वडाला आता असं ओणवा झालेलं मला नाही पहावत मनु.....”आबा आज माई गेल्या पासून पहिल्यांदा असे रडत होते. मला आता त्यांची काळजी वाटत होती.

मी खूप समजावलं आबांना तेव्हा कुठे आबा शांत झाले.माईलाच पहात होते ते त्या फुलराणीत आणि आज ती गेली परत एकदा त्यांना एकटे सोडून.

मागे एकदा गावी जाऊन आले. आबांना भेटून मन खूप उदास झाले. आबा अगदी एकाकी दिसत होते. परसदारीचा वडही खूप थकल्या सारखा वाटत होता. त्याचीही दशा आबांसारखीच झाली होती. तोही फुलराणी गळून पडल्यापासून एकाकी झाला होता. फुलराणी शिवाय ओकाबोका झालेले त्याचे रूप पाहवत नव्हते. ह्यावेळीही आबा नाही आले माझ्यासोबत. मला म्हणाले, माझी गरज आहे वडाला, मला इथे थांबलेच पाहिजे.

एक दिवस परत आबांचा फोन आला, “मनु आपला वडही पडला गं आज. फुलराणीविना नाही राहता आले त्याला एकटे....तो नाही जगू शकला फुलराणी शिवाय. त्याचे अस्तित्वच तिने स्वतः सोबत नेले होते, मग कसा राहील तो तिच्याशिवाय......?”

आबांनी फोन ठेवला...मी ध्यानावर आले आणि अचानक एक अनामिक भीती उरी दाटून आली. आता मला जावे लागणार होते. आबा... आबा आता खरंच एकटे पडले. माझी गरज आहे त्यांना. मला गेलेच पाहिजे.

मी गावी आले. अंधार दाटला होता. तडक आत शिरले. आबा आराम खुर्चीत माईचा फोटा छातीशी कवटाळून झोपले होते. मी अलगद तो फोटो काढून घेतला आणि....आणि आबांचा थंडगार स्पर्श हाताला जाणवला.

प्रेम-मृणाल वझे

$
0
0

एखादे प्रेम आत जपत जगाव लागत...त्याची पालवी सुकू द्यायची नाही हे तत्व आपण जपाव लागत...

प्रेम-मृणाल वझे

तो तिच्या प्रेमात लहानपणापासूनच होता .... नक्की कधी सुरवात झाली ते त्याला सुद्धा आठवत नाही.

साधारण शाळेत जायला लागला होता तेव्हा ती त्याच्या दृष्टीस पडली. मग मात्र त्याला ती फार हवीहवीशी वाटायला लागली. फार वेळ तिच्या बरोबर राहिला की आई वाकून वाकून बघायची. मधेच कधीतरी दटावायची. पण मग मात्र काहीतरी पुटपुटत निघुन जायची.

जस जसा मोठा होत गेला तस तसे प्रेम वाढायला लागले. सारखं तिच्याबरोबर राहावं असे वाटू लागलं. मग मात्र आईने विरोधच पुकारला. आता जास्तच लक्ष देऊ लागली. ओरडू लागली. बाबाना नाव सांगीन अशी धमकी पण देऊ लागली !!

मग त्याने जरा आवरतेच घेतले! १०/१२ वीच्या परीक्षेच्या वेळी त्यानेच मनावर दगड ठेवला. त्याच झटक्यात इंजिनियरिंग पूर्ण केले.

आता तरी ....!!! पण नाहीच जमले त्याला ... !नाही विरोध करू शकला आपल्या आई वडिलांना ...!

मग काय नोकरी .... लग्न .... संसार ह्यात तो इतका गुरफटून गेला की सरतेशेवटी तो आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आला ... नोकरीतली निवृत्ती ... !!!

मधून मधून ... बहुदा रोजच दमून अंथरुणाला पाठ टेकतांना, त्याला रोज एकदा तिची आठवण यायची. पण दमल्याने डोळ्यावर झोप असायची. आणि तो स्वप्नातच रंगून जायचा तिच्या बरोबर...!!!

आज निवृत्तीनंतरचा पहिला दिवस... उठतानाच मोकळा श्वास घेतला .... मन खंबीर केले ... अर्थात आज आईबाबांची करडी नजर न्हवतीच त्याच्याकडे ...!

आज त्याने कोणालाच जुमानायचे नाही असे ठरवले .... पायात चप्पल घालून तो आपल्या प्रेमाला भेटायला निघाला .... आता उरलेले आयुष्य फक्त तिच्या बरोबर घालवायचे असा निर्धार केला आणि तो दुकानात शिरला ......

दुकानदाराकडे त्यांनी त्याच्या प्रेमाची " चित्रकलेच्या वहीची " मागणी केली ... आणि छातीशी कवटाळून तो घराकडे परंतु लागला.

राधी–सुनीत काकडे

$
0
0

राधी - खूप भावली...आत जाऊन भिडली...डोळ्यासमोर उभी राहिली...

राधी – सुनीत काकडे

वावराच्या बांधावरल्या गजपनात, ओढ्या नाल्याच्या दाट जाळीत एखाद्या नागीनी सारखी वाट काढंत ती आत शिरायची. चुंबळ करायला एखादं चिंधुक आणि जरमलची परात हातात घेऊन राधी माळरानाकडं निघाली की गावातल्या दोनतिन वाण्यांपर्यंत त्याची खबर पोट्टी सोट्टी पोहचवायची, खबरीच्या बदल्यात लालभडक गारेगार वसुल करायला ती विसरायची नाही. रानातुन येतांना परातीत न मावनारं गावरान मधाचं पोळ घेऊनच यायची. तसंबी वाडीतली पोरं काही रिकामे बाप्पे मध हुडकत फिरायची पर राधीची बातंच न्यारी होती. तिच्यावाणी मधं कोनालाच हुडकायला जमायचं नाही. तिच्या वाट्याचा भावपन जादा होता आणि वरून तिला मिठ मिरचीचा वानुळाबी मिळायचा. तिनं आणलेल्या मधाला बाजारात चढाभाव मिळायचा, एक राटवाडी वरून येणारा मास्तर प्रत्येक बाजारात ते खरेदी करून जायचा, काय माहीत कसं पन त्याला तिने आणलेलं मध बरोबर ओळखतां यायचं. त्याला चांगलीच मधाची पारख होती.

ऊद्या बाजाराचा दिस होता, राधीनं जरमलची परात ऊचलली, ओसरीला दारू पिऊन पडलेल्या दादल्याला कचकाऊन शिवी घालुन ती बाहेर पडली. या वाटांचा तिच्यावर जीव जडला होता, आपनहुन त्या तिच्यासाठी मोकळ्या व्हायच्या. ओढ्याच्या गवतात भले भले पाय ठेवायला टरकायचे पर तिला कधी भ्या वाटलं नाही आणि वाटांनीही तिला दगा दिला नाही.

रानातल्या जांभळीच्या दाट सावलीला किश्याच्या केसांतुन हात फिरवत ती गाणी गायची, तसा तिचा आवाज चांगला नव्हता पण किश्या म्होरं तिचं काही चालायचं नाही. वेळेच भान रहायचं नाही. पोटात आग पडली की किश्याचा हात धरून रानमेवा हुडकत फिरायचं. असंच त्याच्या सोबत फिरत असतांना टेकडाच्या कपारीवर मधाचं मोहळं दिसलं. कितीतरी थवे तिथं राबत होती. किश्याला त्या मधानं भुरळ पाडली, तो ईरेला पेटला व्हता, त्यांन जोखीम घेतली आणि तो कपारीला रेटुन पुढं सरकला. पर जे होऊ नये तेच झालं, तोल गेला आणि एक आर्त किंकाळी रानाचं काळीज चिरत हवेत विरून गेली.

त्या किंकाळीचा आवाज आजही तिच्या कानात घुमतो, त्या आवाजानेच ती भानावर आली, किश्या गेल्यावर वर्षा दोन वर्षात तिच्या बानं दारूच्या नशेत गावातल्याच बेवड्या सोकाजीशी लगीन लाऊन दिलं. तवापासुन पोटाची खळगी भरायला ती जरमलची परात घेऊन फिरतीए.

कपारी जवळ पोहचलेयावर तिला किश्या मधाच्या पोळाकडं सरकतांना काय म्हनाला होता ते आठवलं, 'पुढच्या वेळेला डब्बा घेऊन येईल, आण्णाला खुप आवडंल मध, मामा सोबत राटवाडीला पाठऊन देईल...'

पर तिला अजुनही एक कोडं ऊलगडत नाहीए, एवढ्या जालीम माशींच पोळ उघड्या हातांनी काढुनसुद्धा तिला एकही मधमाशी चावत का नाहीए....?

हुंकार–सुमित्रा

$
0
0

सुमित्राचे अनुभव विश्व .... एक समृद्ध कथा

हुंकार – सुमित्रा

अस्ताव्यस्त पसरलेल्या मनाला गोळा करत ती उठली तरी मनातल्या आणि तनातल्या तृप्तीला ती थांबवू शकत नव्हती. उसळत्या आणि उफाळत्या लाटेवर स्वार होत एकमेकांत मिसळून गेलेली ती अख्खी वेळ आठवत ती तशीच बसून राहिली होती.

मागे वळून पाहिल्यावर तिला आणखीनच तृप्त वाटलं, कारण तोही तसाच हलेकच हसू चेहऱ्यावर पसरून झोपला होता. त्याच्या घट्ट मिठीची आठवण तिला पुन्हा शहारवून गेली आणि त्याच वेळेस तिच्या डाव्या बाजूनं मुटकुळं करून झोपलेल्या इवल्या हातांनी तिला जवळ ओढल्याचा भास झाला. ती वळली.

तो त्या मुटकुळं करून बिनघोर झोपलेल्याने त्याच्या बाळमुठींनी तिच्या बोटांना धरून ‘ममम..आंआं...’ असं काहीस घशातल्या घशात गुरगुर आवाज करत तिला ओढलं आणि मगाच्या घट्ट मिठीपेक्षा आत्ताच्या या क्षणी तिला या बाळमिठीची भूल वाटली..

त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येईनात तेव्हा त्या बाळमिठीच्या आणि घट्ट मिठीच्या तिच्या अशा त्या दोघांच्या मधोमध झोपत दोघांना स्वतःशी कवटाळून घेत तृप्तीचा हुंकार दिला..

फुगा–उत्कर्षा सुमित

$
0
0

उत्कर्षा खूप दिवसानी कथा घेऊन आली आहे...आणि खरच शेवटच्या वाक्याने तिला एक वेगळेच परिमाण दिले...

फुगा – उत्कर्षा सुमित

रोज संध्याकाळी गावात उतरायच अन् तिथून चालत वरती यायच हा आमचा दिनक्रम ठरलेला. रोज राघव माझी वाट पाहायचा.आज मी लवकर आलेले. आज मला वाट पाहावी लागत होती..आजुबाजुला बायका भाज्या घेऊन बसलेल्या.आइसक्रीमच्या गाड्या, कुल्फीवाला, चार-पाच लहान मुलं फुगे घेऊन उभी हे सगळ पाहत राहिले. इतक्यात बस आली आणि राघव खाली उतरला

"ओय्य, भाजी वैगेरे घ्यायची आहे का? अस काय बघतेयस समोर." राघव उतरला तरी माझ लक्ष अजूनही त्या फुगेवाल्या मुलांकडे होत.

"काही नाही. त्या मुलांकडे बघतेय. किती लहान वयात कामाला लागतात ही. शिक्षण तर नाहीच. सुख ही नाही. फक्त कष्टच. खूप वाईट वाटत रे अस पाहिलं की.."

" नाईलाज असतो ग त्यांचाही. चल आपण निघुया.आज डेरीमिल्क खायची आपण. सिल्क घेऊन येतो मी. सिल्क खात खात जाऊ आपण.."

"आज अचानक डेरी मिल्क सिल्क खायचा मूड साहेबांचा?”

मी सुध्दा विचारातून बाहेर येत नॉर्मल व्हायचा प्रयत्न केला.

“सहजच ग..”

म्हणत तो बेकरीत गेला.मी बाहेर वाट पाहत राहिले. तोवर एक मुलगा माझ्यासमोर फुगे घेऊन आला.

" ताई, एक फुगा घ्या ना?"

" फुगा घेऊन काय करणार बेटा आम्ही?..नको फुगा.."

मी काही बोलणार इतक्यात बेकरीतून बाहेर येत राघव म्हटला.

" दादा तुमच्या मुलांसाठी घ्या.." त्याच्या हातातल्या डेरीमिल्क कडे पाहत तो मुलगा बोलत होता.

" बर् हे पैसे घे..फुगा राहू दे..दुसऱ्या कोणाला तरी दे.." मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत हातात पैसे देत म्हटले.

" फुकटचे पैसे नको ताई..तुम्ही फुगा घ्या.."

"बर दे फुगा.."

एक फुगा घेत मी त्याला पैसे दिले. तरी त्याच लक्ष राघवच्या हातातल्या डेरीमिल्ककडे होत.

"तू नाही खेळत का रे फुग्यासोबत?" राघवने विचारल.

" खेळावस वाटत दादा पण् मालक मोजून देतो फुगे..एकाचा हिशोब नाही लागला तरी मारतो.."

इतकं सगळ बोलतानाही त्याच लक्ष डेरीमिल्ककडेच होत..

"हा फुगा आमच्याकडून तुला..आणि ही डेरीमिल्क सुध्दा..दादा म्हटलस ना मला मग दादाकडून गपगुमान घ्यायची"

राघवने त्याच्या हातात डेरीमिल्क देत म्हटल.त्याच अस बोलण मला अनपेक्षित होत..त्या मुलाने काही न बोलता फुगा आणि डेरीमिल्क घेतली.

"आणि हो..बाळ झाल की रोज तुझ्याकडून फुगे घेऊन जाईन मी.."

"नक्की दादा.." आ

पल्याला कायमच एक गिर्हाईक मिळेल या विचारानेच तो आनंदला

" हो नक्की.." राघव ही हसत हसत म्हटला.

मी पाहत होते..मघापासुन मी फक्त त्या मुलांच्या सुखाचा विचार करत होते. पण् राघवने त्यांना समाधान दिल होत..

वर्तुळ-शशी डंभारे

$
0
0

शशीच्या ह्या कथेने मला थक्क केले....गुंग होऊन वाचत गेलो...आणि नंतर शांत बसून राहिलो....शशी...तुसी ग्रेट हो...शाब्बास!

वर्तुळ - शशी डंभारे

काही गोष्टी, घटना मुळातच गुंतागुंतीच्या असतात. कशाचा कशाशी वरवर काहीही संबंध नसतो. पण व्यक्ति, जागा, परिस्थिती इतक्या मिळत्या जुळत्या असतात की आपण आश्चर्यचकितच नव्हे तर प्रसंगी अनामिक भीतीने कंपितही होतो. जगण्याच्या एकुण परिसरात आपल्यासह, आपल्यासारखी अनेक वर्तुळं आजुबाजूने आपापल्या वेगात, परिघात फिरत असतात. एखादं वर्तुळ दुसऱ्या दूरदूरच्या वर्तुळाच्या आसपास येतं आणि स्पर्श करून जातं. दोन वर्तुळांच्या जगण्यातल्या अस्पष्ट तारा जवळ याव्यात, स्पर्श व्हावा, ४४०चा करंट लागावा आणि जीव निव्वळ थिजून जावा असेही अनुभव येतात.

२००५ च्या मार्च - एप्रिलचे विदर्भातले खणखणीत उन्हाचे दिवस होते ते. या वर्षाच्या मागची-पुढची काही वर्ष फारच खडतर गेली. जगणं निव्वळ हातघाईवर आलेलं. कुठलीशी गर्द आणि गूढ सावली पसरून होती आयुष्याच्या या टप्प्यावर. जन्म आणि मृत्यु यातले अंतर किती निमुळते असू शकते हे दर्शवणा-या अनेक घटना आजूबाजूला घडून गेल्या होत्या. घडत होत्या. जीव कुठेच खऱ्या अर्थाने रमत नव्हता. स्वतःला कामात झोकून देणे , व्यस्त ठेवणे हाच एक तात्पुरता उपाय त्या परिस्थितीत मला उपलब्ध होता. वाईटातून चांगले इतकेच की कामात झोकून देण्यामुळे ऑफिसमधले मुल्यांकन चांगले वाढले होते. गोपनीय अहवालात 'अतिउत्कृष्ट' शेऱ्यांची भर पडली होती.

माझे तत्कालीन अधीक्षक अभियंता अतिशय हुशार- कर्तबगार इंजीनिअर तर होतेच पण त्याही पेक्षा अत्यंत सुस्वभावी, आणि स्टाफची काळजी घेणारे अधिकारी होते. पर्सन्यालिटीही छान, अगदी हैण्डसमच. चेह-यावर कायम तरळणारे हसू. सरकारी ऑफिसरला मैच न होणाऱ्या अशा अनेक गोष्टी होत्या त्यांच्यात. अधिकारी असूनही ऑफिसला ऑफिसच्या वेळेत पोहचणारे आणि ऑफिसची वेळ संपली की स्टाफलाही ' घरी निघा आता' म्हणणारे माझ्या माहितीतले ते एकमेव ऑफिसर. अशा ऑफिसरसोबत काम करण्याचे एक वेगळेच समाधान असते. त्या खडतर काळात त्यातल्या त्यात ऑफीस ही एकच बाब सुखावह होती माझ्यासाठी.

पण हा निखळ आनंदही फार काळ टिकला नाही. त्यालाही कारुण्याची झालर लागली लवकरच .

साईटच्या विजिट सांभाळून शक्यतो ऑफिसलाच उपस्थित असणारे साहेब सलग ८ दिवस ऑफिसला गैरहजर राहीले म्हणून चौकशी केली तर समजले की मागील ६ महिन्यांपासून त्यांची मिसेस कैंसरने आजारी असून त्यांना आता मुंबईच्या हॉस्पिटलला हलवले आहे.

कसाबसा ऑफिसात प्रकाश शोधणारं मन पुरतं काळवंडून गेलं हे ऐकून. जीव कसनुसा झाला इतक्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती त्रास, समस्या, विचार लपवलेले असतील याचा विचार करून.

पुढच्या काही दिवसातच सरांच्या मिसेस गेल्या.

अगदी आवश्यक तितकेच दिवस घरी राहून लवकरच सर ऑफिसला रुजू झाले आणि रूटीन कामाला लागलेही.

एका दिवशी सरांनी केबिनमधे बोलावले म्हणून आत गेले तर त्यांच्या समोर एक साधारण चेहऱ्याचा साधारण उंचीचा, टोटली साधारण टाइपचा माणूस अदबीने उभा होता.

" मैडम, यांची फाइल स्पेशअली तुम्ही बघा, आणि आवश्यक ती सगळी कार्यवाही तात्काळ करा. यांचे काम जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर व्हायला हवे. कोकणातून आलेत. येण्या जाण्यात वेळ जाणार नाही याची काळजी घ्या." असे साहेबांनी म्हटले म्हणून मी लागलीच फाइल उचलून केबीन बाहेर जाण्यास वळले तेंव्हा त्या व्यक्तीशी नजरानजर झाली. तर ती व्यक्ती माझ्याचकड़े बघत होती नी नजरानजर झाल्या क्षणी जरा गडबडललीय असे मला वाटले. क्षणभराचाच तो अवधी. मी त्यांना ' माझ्या सोबत या' असे नजरेने खुणावत केबीनमधून बाहेर पडले आणि जागेवर आले.

त्यांची फाइल बघितली तर कणकवलीच्या एका सब डिवीज़नला जुनियर क्लर्क होते. विदर्भात कुठेही, कुठल्याही जिल्ह्यात त्वरीत बदली हवी होती.

बदली मागण्यास कारण ' व्यक्तिगत अडचण ' असे नमूद होते. वय ४०. नियुक्ती mpsc मार्फ़त. पहिली नेमणुक कणकवलीचीच. म्हणजे जवळ जवळ १५ वर्षे एकाच ठिकाणी सर्विस झालेली.

विदर्भातला माणूस कणकवली सारख्या ठिकाणी इतकी वर्षे कसा थाम्बलाथांबला याचे मला विलक्षण आश्चर्य वाटले.

"इतकी वर्ष कशी काढलीत तिकडे? साधारण ३ वर्षाने तुम्ही विदर्भात बदलीसाठी पात्र ठरले असतात. १५ वर्षांची सर्विस झालीय तुमची." मी विचारलेच.

"नोकरीची खुप गरज होती मैडम. जिथे पोस्टिंग मिळेल तिथे जान्याची तयारी होती. कणकवलीला पोस्टिंग मिलाली तेंव्हा काहीही विचार न करता लगेच जॉइन झालो. क्वार्टर दूर होतं सबडिवीजन पासून म्हनुन ऑफिस जवळच खोली केली. घरमालक आणि त्याची फॅमिली जाम प्रेमल. मुलासारखा जीव लावला मला त्यांनी."

त्याच्या ' जाम प्रेमल' शब्दावर मी उडालेच. त्याच्या बोलण्यात कोकणी लय होतीच. पण कोकणातली मूळ माणसं 'ळ' शब्द 'ल' आणि ' ण ' शब्द 'न ' असा उच्चारतात, त्यांची ती 'कावला - बगला, आनी -पानी ' वाली भाषा त्यांच्या ओरिजिनल कोकणी हेलसकट या विदर्भीयन माणसाने नुसती स्वीकारलीच नव्हती तर स्वतात रुजवून ही घेतलीय याचे फार कौतुक वाटले .

" फार आवडले कोकन मला, तिथल्या मानसांसकट. रमलो होतो मी तिकडे. तिकडचाच झालो. तिकडंच सेटल होनार म्हनून घरही घेतलं ४ खोल्यांचं. एच डी एफ सी च्या लोनवर.

" २ मुलं आहेत मैडम. मोठी मुलगी ६ वीत, छोटा मुलगा दूसरीत. लगेच ट्रांसफर झाली तर मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्याबरोबर इईकडच्या शालेत घालता येईल म्हणून धावपल. आई म्हातारी आहे. इकडे नातेवाईक आहेत थोड़े फार. मुलांना सांभालायला मदत होईल. "

माझ्या डोक्यात घंटा वाजू लागल्या अनेक प्रकारच्या.

बायको वगळून सगळ्यांबद्दल सांगतोय हा.

बायकोशी पटत नसेल का? डिवोर्स प्रकरण असेल का? हा इकडचा विदर्भातला .....ती तिकडची असेल का? कोकणातली? वगैरे वगैरे.

विचारलेच मग, "तुमची मिसेस?"

सरसरून डोळे भरून आले त्याचे. कसेबसे घोगऱ्या आवाजात शब्द बाहेर आले.

"ती गेली ना मैडम."

"गेली म्हणजे ?"

"वारली"

' बापरे ' मी मनातून दचकले. माझ्या साहेबांनी स्पेशियली या केस मधे का इंटरेस्ट घेतलाय याची लिंक लागली.

तोही खुर्चीतुन उठून बाहेर गेला, त्याचा प्रचंड विस्कटलेला चेहरा लपवत.

मलाही रडू आले जोरात. ते दिवसच तसे होते काळे कभिन्न. विचित्रच असायचं सगळं आजूबाजूला. अंधुक अंधुक. विस्कळीत-विस्कळीत आणि जिव गुदमरवणारं.

बदलीसाठी मुंबई परिमंडळातून 'ना - हरकत ' प्रमाणपत्र तो सोबतच घेवून आला होता. पण आता इकडे नागपुर परिमंडळाच्या सर्कलला जाऊन पोस्ट वेकंट आहे का, असली तर कुठल्या जिल्ह्यात, कुठे ......इथपासून सगळे पहावे लागणार होते. परिमंडळाचा एडिशनल चार्ज माझ्या साहेबांकडे असला तरी काम २ वेगवेगळ्या सर्कल्सशी निगडीत असल्याने मी माझ्या ऑफिस कडून कितीही घाई केली तरी किमान ५-६ दिवस तरी लागणार होतेच सगळ्या प्रोसेसला.

"कुठे थांबला आहात" विचारले दुसऱ्या दिवशी तर कुठल्याशा होटलला थांबल्याचे सांगितले.

रोज सकाळी मी ऑफिसला पोहचण्यापूर्वीच तो पोहचलेला असायचा आणि माझ्या टेबलवर समोरच्या खुर्चीत बसलेला दिसायचा. पुढच्या २-३ दिवसात आमच्यात बऱ्या पैकी दोस्ती झाली. मला खरं तर कणवच यायची त्याला पाहिले की. सुरुवातीला तो जास्त थांबायचा नाही समोर. आजूबाजूला असायचा. चहा वगैरे आला की मी त्याला आवाज द्यायची, तर 'नको' च म्हणायचा. पण २-३ दिवसात जरा रुळला. मी त्याच्या फाइल वर काम करताना, नोटशीट लिहताना, संबधित डेस्कच्या त्यावर सह्या आणताना सोबत रहायचा. बाकी वेळेतही मी माझ्या इतर फाइल्स निपटवताना समोरच्या खुर्चीत बसून रहायचा. बोलका असावा मुळचाच. बोलता बोलता त्या ४ दिवसात त्याने मला त्याचे तोवरचे जवळजवळ सगळे आयुष्यच सांगून टाकले.

मुळ गांव अकोला जिल्ह्यातले कुठलेसे. घरची अत्यंत गरीबी. वडील लहानपणीच गेलेले. आईने मोलमजुरी करून वाढवलेले. शेती वाड़ी नाही. गरिबीमुळे फारसे नातेवाईक नाहीत. त्यामुळे मंत्रालयातुन क्लर्क पदासाठी चक्क कणकवलीची आर्डर हातात पडली तरी गांव-शहर-जिल्हा, बदलल्याचे विशेष दुःख झाले नव्हते. झाला होता तो फ़क्त आनंदच. नोकरी मिळाल्याचा आनंद. स्वभाव मायाळू. कोकण मातीशी लवकरच एकजीव झाला. इकडचे होते नव्हते विकून कोकणचा माणूस झाला. विदर्भ सोडून जाताना सोबत फ़क्त आई आणि इकडची त्याच्या सारख्याच गरीब कुटुंबातली, गरीब स्वभावाची एक मुलगी लग्न करून ' बायको' म्हणून घेवून गेलेला.

तसा प्रगतशील विचाराचा असावा. १२वी पास बायकोचा डी. एड. ला नंबर लागावा म्हणून स्वतः खटपट केली. तिचा नंबर लागलाही. पण मुंबईच्या कॉलेजला. २ वर्ष मुंबईत होस्टेलला रहावे लागणार होते. मात्र ती त्यासाठी अजिबात तयार नव्हती. तिला होस्टलला सोडून माघारी निघाला तर ती गळ्यात पडून हमसाहमशी रडली.

' मी नाही राहू शकणार तुम्हाला सोडून' 'कमी पैशात संसार करेन, एका पगारात भागवेन' 'पण मला इथे सोडून जाऊ नका' म्हणत होती. याने तिला खुप समजवले. कसाबसा हात सोडवून कणकवलीला परत आला. पण घरी आल्यावर तिच्याशिवाय यालाही अजिबात करमेना. आई पण ' कशाला तिच्या नोकरी-बीकरीचे खूळ तुझ्या डोक्यात, चांगलं चाललाय की आपलं ' वगैरे भुणभुण करत होती.

आठवडाभराने भेटायला गेला तर बायको तापाने फणफणलेली. याला बघुन पुन्हा रडायला लागली. गळ्यात पडली. ' मी घरी येते' म्हणत.

लगोलग हा तिला कणकवलीला परत घेवून आला.

पुढे तिच्या नोकरीचा विषय दोघांनीही काढला नाही. मात्र तिच्या शब्दांना ती पूर्ण जागली. याच्या एकट्याच्या पगारात सासू आणि २ मुलांचा संसार तिने छान फुलवला.

अवघ्या ३८ व्या वर्षी याच्या त्या गोड बायकोला असे झाले तरी काय असणार हा प्रश्न माझ्या ओठांवर सारखा सारखा यायचा. पण तो त्याच्या सुखी संसाराच्या वर्णनात इतका रमलेला असायचा की तो प्रश्न विचारुन त्याला वास्तवाच्या जमिनीवर आणणं नको वाटायचं मला. सांगता सांगता त्या टप्प्यावर येवून तो स्वतःच सांगेल 'ते कारणही ' म्हणून मी तो प्रश्न तसाच राखून ठेवलेला.

४ दिवसात मलाही त्याची सवय होऊन गेली. एकदा लंचमधे डब्यातली पोळी भाजी त्याला आग्रहाने खाऊ घातली तेंव्हा त्याने प्रयासाने त्याचे डोळे वाहण्यापासून थांबवलेले मला कळले. तो तसाही माझ्या चेहऱ्याकडे डायरेक्ट बघायचा नाही. इकडे तिकडे पाहत बोलायचा. मी कोकणातली असल्याने मला त्याच्या बोलण्यातला कोकणी हेल ऐकणे फार सुखद वाटायचं. मी ही माझ्याकडून माझे कोकणातले गांव, माझे नातेवाईक वगैरे विषय काढून त्याला बोलतं ठेवायचे. काम करता करता त्याला ऐकत रहायचे. एक दोन वेळा लक्षात आले की मी फाइल मधे काम करत असताना किंवा माझे त्याच्याकडे लक्ष नसताना तो माझ्या चेह-याकडे टक लावून पाहतोय. माझे लक्ष गेले की दचकतो, घाबरल्यासारखा होतो, इकडे तिकडे पाहतो. पण मी मनावर घ्यावे इतक्या वेळा नाही घडले. मीही दुर्लक्षच केले .

त्याच्या बदली ऑर्डरचे काम जवळ जवळ होतच आले होते. तो बऱ्यापैकी सावरलाही होता आता. बहुधा इतके बोलल्यामुळे त्याच्या मनाचा बराच निचरा झाला असावा.

" मैडम पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये ?" एकदा म्हणाला. " कोणती ? " "क्षणभर माझ्यापासून दूर राहणे पसंत न करणारी ती, गेली तर साफ़च गेली हो! इतक्या दिवसात साधी स्वप्नात पण आली नाही एकदाही."

काय उत्तर द्यावे मलाही कळेना. तो बायकोचे नाव घ्यायचा नाही. ती, तिचं, तिने असं म्हणायचा. एकंदर लक्षात आलं की बायको गेल्याचा त्याचा देवापेक्षा, परिस्थितीपेक्षा, तिच्या जाण्याच्या कारणापेक्षा 'तिच्या ' वरच राग होता. तिने जायला नको होते त्याला असं एकटं टाकून अशा अर्थाचा. तिचं जाणं तो मनातून मान्यच करत नसावा. अनपेक्षित आलेल्या या परिस्थितीशी दोन हात करणं सुरु होतं फ़क्त त्याचं. ती गेलीय हे जाणिवांत पोहचलेलं नव्हतं नीट. ती स्वप्नात तरी कुठून येणार?

इतका प्रेम करणारा नवरा, मुलं सोडून भर संसारातुन उठून गेलेल्या, त्या न पाहीलेल्या बाईसाठी माझं मन आतून आक्रंदू लागलं खुप. तिला तरी कुठे जायचं होतं याला सोडून? मुलांना सोडून? काय अवस्था असेल तिच्या मनाची निघून जाताना? या प्रश्नांनी माझंही मन कासावीस होऊ लागलं.

दिसायला कशी असेल? सुंदर की याच्या सारखीच साधारण ? ऊंच, बुटकी, लट्ठ, बारीक़....? मला आता जितकं जमेल तितकं तिच्याबद्दल ऐकावंसं वाटत होतं.

"दिसायला कशी होती हो तुमची मिसेस? "

माझ्या प्रश्नाने तो गड़बड़ला. खुपच गड़बड़ला.

"चांगली होती. म्हणजे खुप सुंदर नव्हती, सावली होती. ऊंची साधारनच. लग्नाचे वेली तर खुप लुकड़ी होती. पण कोकन मानवले मैडम तिला. जाड़ी झाली होती आता. म्हनजे खुप जाडी पन नाही. समजा, तुमच्या इतकीच."

आता मी गडबडले.

पण त्याच्या चेहऱ्यावर अगदीच साधे काही सांगितल्याचा भाव होता. उलट डोळ्यात थोडासा ओलच दिसत होता साचलेला.

मी मग सोडूनच दिला तो विषय.

आज तो आला की त्याला ऑर्डर देता येणार होती. टाइप्ड कॉपीज़ माझ्या टेबल वर होत्या. एक सही बाकी होती फ़क्त सुपरिंटेंडेंटची. तेवढी झाली की त्याचा-माझा हा ५ -६ दिवसांच्या सोबतीचा प्रवास संपणार होता.

मी ऑफिसला पोहचण्यापूर्वीच तो माझ्या टेबलसमोर खुर्चीत येवून बसलेला दिसला. मी दिसले तसा मनापासून हसला. ४ दिवसात पहिल्यांदाच इतका सहज हसताना दिसला.

चहा आला. ' यांनाही दे चहा ' असे मी चहावाल्या पोराला खुणावले तर रोजच्या सारखे 'नको ' वगैरे म्हणाला नाही. उलट ' मी पैसे देवू का मैडम आज, तुमची फार मदत झाली हो, तुम्ही खुप केले माझ्यासाठी' वगैरे म्हणाला.

'आमचा चहावाला आमच्या पाहुण्यांकडून पैसे घेत नाही' असे म्हणत मी दुसऱ्या एका महत्वाच्या फाइलकड़े वळले. मधे एकदोनदा नजर वर झाली तर हा अनिमिष डोळ्यांनी माझ्याकड़े पाहत असलेला दिसला. मी माझी नजर थांबवलीच आज त्या पॉइंटवर प्रश्नार्थक नजरेने. तर यावेळी तोही घाबरला नाही.

" मैडम, तुम्ही विचारले ना काल, माझी मिसेस कशी दिसत होती. काल सांगितले नाही. कारन तुम्ही विश्वास ठेवला नाही, भलताच अर्थ काढला तर अशी भीती वाटली. पण आता सांगून टाकतो. मैडम, माझी मिसेस हुबेहुब तुमच्या सारखी दिसायची. अगदी हुबेहुब. तुम्हाला पहिल्यांदा साहेबांच्या केबिनमधे पाहिले तेंव्हाच जाम उड़ालेलो मी. इतका कसा सारखेपना? अजिबात संबंध नसलेल्या दोन मानसांत? हा प्रश्न मला पन पडलेला. मी इथे तासंतास बसलो. तुमचे लक्ष नसले की तुमचा चेहरा बघायचो. वेगला अर्थ नका काढू मैडम. तुमच्यापेक्षा रंगाने थोड़ी उजल होती. पण चेहरा असाच. मिलता जुलता एकदम. हसायची पन तुमच्या सारखीच. फरक एकच, की तुमचे केस छोटे आहेत बापकट, तिचे एकदम लाम्बसडक, कंबरेच्या खालीपर्यन्त."

" फ़क्त ३ दिवस दवाखान्यात राहीली मैडम, फ़क्त ३ दिवस. साधं आंबे खान्याचं निमित्त हो. वाडीतून आंबे आले होते. घरातल्या सगल्यांनीच खाल्ले. हिलाच कसे बाधले देवालाच माहित. मी ऑफिसला होतो. निरोप आला तसा घराकडे धावलो तर ही उलट्यांनी बेजार. लगेच डॉक्टरकड़ नेलं . डॉक्टर म्हनाला फ़ूड पॉइज़न. सिविलला न्या. पन मी प्राइवेटला नेलं. एडमिट केलं. ३ दिवस एडमिट होती. दुसऱ्या दिवशी खरंतर सलाइन पन काढली डॉक्टरनी. अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट मिलाली होती हो. उठून बसलेली. माझ्या आईला 'आई' च म्हनायची. सासू-सुनेत मायलेकींचे प्रेम हो. तर आईला म्हणाली तुला मी अशी बरी दिसतेय का? माझे केस विंचरून दे. चेहरापन पूस आणि टिकली पडलीय कपालावरची. घरी गेलीस की आधी माझं टिकल्यांचं पाकिट पाठव यांच्याजवल , आठवनीने."

“आई ने तिचे केस विंचरले. घट्ट वेनी-बीनी घातली. चेहरा पुसून दिला.

ती त्या दिवशी जास्तच चांगली दिसत होती की काय, नेहमीपेक्षा, जास्त चांगली-जास्त उजल वाटली मला. सलाइन बिलाइन मुले की काय देवालाच माहित."

"तिला अशी व्यवस्थित बघुन आई म्हनाली मला घरी पोहचवून दे, मुलंपण २ दिवस नीट जेवली नाहीयेत. मी स्वयंपाक करते. हिचा डबा देते. "

ही पन म्हणाली जाऊन येवा घरुन. पन लवकर या आणि तेवढा टिकल्यांचा पाकिट आठवनीने आना."

"बस्स , स्कूटर वर आईला घेवून मी घरी आलो. जरा बसलो. शेजारून पोरं घरी आली. त्यांना आई बरी आहे सांगतच होतो. तर दवाखान्यातून फोन. ' ही शिरीयस ' म्हनून.

कसाबसा दवाखान्यात पोहचलो तर ही गेलेली पन. अर्ध्या-एक तासाचा खेल फक्त. होत्याची नव्हतीच झाली मैडम ती तर"

तो नॉनस्टॉप, एका दमात सांगत होता आणि मी नॉनस्टॉप हादरत होते.

कुठलासा भीतीचा एक ढग सरसर चढ़त गेला मनभर.

बारीकसा कंप सुटला अंगाला.

काही तरी आणखी सांगणार हा माणूस आता, माझ्याशी दॄढ संबंध असलेलं, आणखी घट्ट संबंध असलेलं , साम्य असलेलं अशी एक घंटा मेंदूत ठणठण वाजू लागली.

आणि मेंदूला न विचारता ओठांतून प्रश्न गेला,

"तिचं नाव ? "

माझा आवाज प्रचंड घोगरा झालेला. घशाला कोरड पडलेली.

" नो, नाही, नसावं" अशा अर्थाचा गाज अंगभर उमटत असतानाच त्याने तिचे नाव उच्चारले.

येस. आजूबाजूचे जग थांबले, थिजलेच त्या क्षणी.

आमचे दोघीचे नाव 'एक' च होतं.

थांबलं.....त्याचं सांगणं, माझं विचारणं.

कपाळावर चरचर उमटलेला घाम तिथेच सुकला, विरला. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावून एका दमात पूर्ण संपवत मी स्वतःला कसंबसं नॉर्मल केलं.' इतकंच होतं हे वर्तुळ..... आता संपलंय...... तुला स्पर्श करणं इतकाच हेतु यात निसर्गाचा..... बाकी आक्खं वर्तुळ वेगळं ....तुझं-तिचं ." असं ठामपणे स्वतःला बजावत.

भेदरलेली नजर स्थिर झाली. शरीरातला कंप थांबला.

शिपायाने सही झाली म्हणून आणून ठेवलेल्या त्याच्या बदलीच्या ऑर्डरचा पातळ शुभ्र कागद नीतळपणे फड़फड़त होता टेबल वर.

मी तो उचलला. त्याला दिला. आभार वगैरे मानत तो निघून गेला. त्याच्या स्वभावानुसार, सहज. कारण त्याला माझे पाहिले नाव कुठे माहित होते? टेबलवरच्या नेम प्लेटवर फ़क्त इनिशियल्स होती.

मला त्या टोटल सिचुएशन मधून बाहेर पडायला बरेच दिवस लागले.

मी कुठल्याशा वेगळ्या वर्तुळाला स्पर्श केला त्या दिवसात इतकेच होते ते प्रकरण माझ्यासाठी. यापुढे मला ते सारे आठवायचे नव्हते की त्यापुढचे काही समजूनही घ्यायचे नव्हते.

पुढे कधीच त्या माणसाची मी कुठे चौकशी केली नाही. त्याचेही नंतर कधीच कुठल्या कारणाने समोर येणे झाले नाही.

आयुष्य बदलत जाते प्रत्येक टप्प्यावर. माझेही बदलले. ते काळे कभिन्न दिवस सरले. जराजरा उजळत गेले आजूबाजूचे वातावरण आणि जगणेही.

फ़क्त, उन्हाळ्यात मिळतील तसे भरपूर आंबे खाणे त्या दिवसापासून थांबले ते थांबलेच.

बाळा-संजन मोरे

$
0
0

शाळेतल्या मुलांच्या डोळ्यातली स्वप्न त्यांनीच पुरी करायची असतात...काय सुंदर कथा आहे.

बाळा-संजन मोरे

“ चाल्लीरे ..चाल्ली ...सहल चालली.”

“ कुठं रे चाल्ली ? …..

“राजाळ्याला चाल्ली ……”

“ बटाटा भात ..आम्ही न्हाय खात “

“ का न्हाय खात …?”

“चव न्हाय त्यात …..”

“ जीलेबी पेढा …...आणिक वाढा .”

सहल, शाळेतून गावाबाहेर पडली अन पोरांच्या घोषणा सुरू झाल्या. एकजण खच्चून ओरडायचा अन बाकी सगळे त्याला उत्तर द्यायचे. चौथी ते सातवीपर्यंतच्या पोरांच्या रांगा रस्त्याने चालू लागल्या. खाकी अर्धी चड्डी, पांढरा हाफ शर्ट, डोक्यावर टोपी घातलेली पोरं, निळा स्कर्ट अन पांढऱ्या झंपरातल्या पोरी. आज दफ्तराचं ओझं नाही. शेरडा मेंढराचे कळप रस्त्याच्या एका बाजूने हाकत न्ह्यावेत तसे शिक्षक, शिक्षिका पोरा पोरींना रस्त्याच्या एका बाजूने शिस्तीत पुढे न्हेत होते पण वांड पोरंच ती. कडेच्या शेतात शिरून हरभऱ्याचे डहाळे उपट, गाजरं उपट, कुणाचा उस मोड, बोरं झाड, चिंचेच्या झाडाला दगड मार असले प्रकार ते करू लागले. पण मग, मास्तरलोक पण त्याकडे डोळेझाक करू लागले.

नावाचीच फक्त सहल ती. आठ दहा मैलावर मारवाड्याचं शेत. कपाशीचा मोठा प्लॉट. कापूस वेचणीला आलेला. बोंडं उकलून पांढरा शुभ्र कापूस बाहेर डोकावतोय.सगळं रान पांढऱ्या ढगांनी फुलून आलेलं. काळ्या मातीचं रान, कापूस जोमदार ! मग पोरं कपाशीला भीडली. वेचणी सुरू झाली. कापूस वेचून पोरं पोरी वटा भरू लागली. वट्यातला कापूस पोत्यात गोळा होवू लागला. कापसावरील चमकदार नारंगी पंखाचे किडे अंगावर चढत होते, अंगावरून पुन्हा उडत होते. वाळलेल्या कपाशीच्या फांद्याचे ओरखडे हातापायावर उमटू लागले. पांढरी नक्षी तयार होवू लागली. पांढराशुभ्र, मऊ लूसलूशीत कापूस अलगद खेचायचा, बोंड मोकळं झालं की कापसाने गच्च भरलेल्या दुसऱ्या बोंडाला हात घालायचा. कापूस काढल्यावर झाडं बोंडं उघडी बोडकी पडत. पोरांनी झपाट्याने तीन चार एकरातला कापूस वेचून काढला. दुपारपर्यंत कापूस वेचणी झाली. मारवाड्याच्या गड्यांनी कापसाचा डोंगर तयार केला. आता तो कापूस बैलगाड्यात भरला जाईल.

पोरांचं काम झालं होतं. सगळे मग हातपाय धूवून जानाईच्या मंदिराकडे आले. चिंचेचं बण होतं. थंडगार सावली. सगळे गोल करून बसले. सगळ्यांचे डबे एकत्र केलेले. चपात्या,भाज्या, भजी, तेल चटणी, लोणची, डाळी, उसळी, वटाणा, पावटे, घेवडे, काय काय. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या भाज्या, बेसणाच्या पोळ्या, वड्या, बघूनच सगळे हरखून गेले. मग सगळ्यांनी मिळून सगळ्याचा फडशा पाडला. जेवण झाल्यावर पोरं पोरी बारवेत उतरली. थंडगार पाणी प्याली, तृप्त झाली चार वाजण्याच्या सुमारास सहल माघारी फिरली…….. .

उम्या, बाळा मुक्त झाले. मस्त वनभोजन झाले होते. पोरं रस्त्यावर थांबेनात, रस्ता सोडून वासरांसारखे इकडे तिकडे हुंदडू लागले. उम्या सरसरत चिंचेच्या झाडावर चढला. मस्त गाभूळल्या चिंचांचे आकडे काढले. खाली आला, सगळ्यांना वाटले. सालं सोडून पोरं चिंचेची गाभूळकी बोटकं चोखू लागली. पोरींच्या तोंडांना पाणी सुटलं. मग बाळाने त्यांनाही आकडे वाटले. सगळे मिटक्या मारत, चिंचा चोखत चालू लागले. वाटेत एक गुऱ्हाळ लागलं. “ये पोरांनो ..या रस प्यायला … “ गुऱ्हाळ मालकाने हाक मारली.पोरं गुऱ्हाळावर आली पोरांसाठी मालकाने एक शेलकी मोळी लावली. पोरं छोट्या घमेल्याने उसाचा रस प्याली. मिशा पांढऱ्या झाल्या. टम्म फुगून, पोटं डळडळ करत पोरं पुन्हा रस्त्याला लागली.

कापूस वेचणीच्या बदल्यात, मारवाडी तीन खोल्यांची फरशी बसवून देणार आहे. उरलेल्या फरश्यांसाठी पोरं, लिंबोळ्याच्या सिझनमध्ये रानोमाळ फिरतील. आंब्यासारखा सुवास सोडणाऱ्या घमघम पिकलेल्या पिवळ्या धम्मक लिंबोळ्या पोरं गोळा करतील. झाडावर चढून, गोड गर असलेली पिकली लिंबोळी तोंडात टाकतील. मग फांदी गदागदा हालवतील. लिंबोळ्याचा सडा पडेल. मग लिंबोळ्या पोत्यात गोळा करायच्या. ओढ्याला घेवून यायच्या. आळं करायचं. लिंबोळ्या पसरवायच्या, मग त्यावर नाचायचं. पाणी टाकायचं. सालं सुटून बाजूला निघतात, गर पाण्याबाहेर वाहून जातो. मग मोठ्या चाळणीत लिंबोळ्या चाळायच्या. चोथा काढून टाकायचा. मग उरतात पांढऱ्या शुभ्र बिया. यांना दर असतो. मग स्वच्छ बियांच्या पिशव्या भरायच्या. शाळेत आणायच्या. वऱ्हांड्यात पसरवायच्या. व्यापारी येतो, बिया वजन करून विकत घेतो. त्याचे पैसे साठतील, अणखी एकदोन खोल्यांच्या फरश्यांची सोय होवून जाईल. उरल्यासुरल्यासाठी उम्या आहेच. रानोमाळ करंज्याची झाडं आहेत. वाळल्या करंजाचा सडा पडतो. करंज्या गोळा करून आणायच्या. वऱ्हांड्यात टाकायच्या. मग बदाम फोडल्यासारख्या दगडाने फोडून आतल्या बिया काढायच्या. पोती भरायची. व्यापारी येतो. करंज्या घेवून जातो. निंबोळ्या, करंज, एरंडाच्या बिया विकून पोरांनी शाळेकडे बराच पैसा साठवलेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू होईपर्यंत फरशा बसवून होतील. मग पोरांचा शेण वेचण्याचा, पोरींचा, वर्ग सारवण्याचा कार्यक्रम बंद होईल. फक्त वऱ्हांडे तेवढे भुंडे राहतील अणखी वर्षभर.

पोरं शाळेत आली. डोळ्यात स्वप्न घेवून घरोघरी पांगली. उम्या, बाळा घराची वाट चालू लागले……


पद्मालय-Asawari Deshpande

$
0
0

थरारक असेच वर्णन आहे ह्या कथेच्या पहिल्या भागाचे....

पद्मालय - आसावरी देशपांडे

दवाने मोहरलेली सोनसळी पहाट पाखरांच्या किलबिलाटाने अधिकच रमणीय झाली,बोचरा वारा रोमारोमात गोड शिरशिरी उमटवत होता,परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावं त्याप्रमाणे तिच्या अवतीभवती मिहीर असला की वातावरण आपोआपच चैतन्यमय व्हायचं, तिचा कण अन कण चैतन्यरूपी सागरात न्हाऊन निघायचा..

खास वाढदिवसासाठी मिहीरने घेतलेली काळी चंद्रकळा पैठणी ती नेसली होती, एरव्ही वेस्टर्न आऊटफिटचा आग्रह करणाऱ्या मिहीरच्या डोक्यात साडीच भूत कुठून आलं याचं तिलाही नवल वाटत होत, टप टपीत मोत्यांची नथ, चिंचपेटी,मोत्याचा एकसर, कपाळावर चंद्रकोर अगदी त्याला हवी तशी ती सजली होती, मूळचीच सुंदर मनवा आज अधिकच सुंदर दिसत होती, तो मनोमन सुखावत होता, लग्न झाल्यापासून तिच्या सहवासातील सोनेरी क्षणा ना त्याने इव्हेंट चे रूपच दिले होते, आजही तिचा वाढदिवस अविस्मरणीय ठरेल यात शंकाच नव्हती, कारमध्ये बसताच मोगऱ्याच्या गजऱ्यानी मनवाचं मन दरवळलं, ती काही विचारणार इतक्यात मिहिरने ठुमरी लावली...

बैरी कोयलिया, कुक सुनाये, मुझ बिरहन का जियरा जलाये, याद पिया की आये, ये दुःख सहा ना जाये... हाये राम ये दुःख सहा ना जाये,

मनवा डोळे मिटून तिच्या ठुमरीशी एकरूप झाली ...तिच्या आवडी निवडी त्याने खूप काळजीपूर्वक जपल्या होत्या. तिच्या तंद्रीला धक्का लागू नये म्हणून मिहीर काळजीपूर्वक गाडी चालवत होता...

मनवा भानावर आली तेव्हा,बाहेर कौलारू घरे दिसू लागली, सूर्य डोंगरमाथ्यावर चांगलाच तळपत होता.. आता दोन तास झाले,शेवटी न राहवून मनवाने विचारलेच,

"मिहीर अरे कुठे जातोय आपण ?"

"मनू सबर का फल मीठा होता है"

"दोन तास धीर धरला आता अजून किती वेळ?" मनवा

"फक्त अजून थोडा वेळ"

"पाहिलेस का मिहीर ग्रुप पण ऍक्टिव्ह झाला" मनवा

"काय म्हणतो ग्रुप?"

"लव्ह बर्डस कुठे आहात, ऍड्रेस पाठवा आम्हीपण येतो पार्टी घ्यायला"

सांग, सरप्राईज..बोलता बोलता मिहीर ने डोळे मिचकावले....

झाडांच्या मांडवाखालून गाडी जात होती, दूरवर अजगरासारखा पसरलेला काळाशार रस्ता भयाण शांततेचं विष ओकत होता, काळजात चर्र होत होतं, थोडं पुढं जात नाही तर एक तळं लागलं, मळकट पाण्याने भरलेलं, थोडसं शेवाळाने थपथपलेलं....हिरवट ,त्या तळयावरून नजर हटत नव्हती,कोणतीतरी गूढता त्यात झाकल्यासारखी वाटत होती, फारच अस्वस्थ व्हायला झालं, मी एक सुस्कारा टाकला.. इतक्यात मिहिरने करकचून ब्रेक दाबला काळी मांजर गाडीखाली येणार होती, माझी धडधड अजूनच वाढली, मन नकळतपणे शुभ अशुभाच्या जाळ्यात फसले,

"मनवा, तुझ्या पर्स मधला कॅमेरा काढून ठेव"

"कॅमेरा कशाला हवा आता?"

"तुझ्या चेहेर्यावरचा लाखमोलाचा आनंद टिपायचा आहे," गाडीतून उतरताच मिहिरने मनवाचे डोळे झाकले, आणि हात समोर करायला सांगितले.मिहिरने तिच्या हातात किल्ल्या ठेवल्या आणि डोळे उघडायला सांगितले, डोळे उघडताच मनवाला एक आलिशान बंगला दिसला,

"कोणाचा बंगला आहे हा?" मनवाने उत्सुकतेने विचारले

"तुझं बर्थडे गिफ्ट, आपले वीकेंड होम 'पद्मालय'

ती काही बोलणार तेवढ्यात मिहिरने आपले बोट तिच्या ओठावर ठेवले..आणि तिला जवळ ओढले...

"एक सेल्फी तो बनती है मनू"

'कुंभारघर' पाली या देवस्थानापासून साधारण वीस किलोमीटर वर असणारे छोटेखानी गाव, डोंगररांगांच्या कुशीत वसलेले टुमदार गाव,अवघी दोनशे तीनशे लोकसंख्या पण निसर्गसौंदर्याच्या बाबतीत समृद्ध असे गाव, बघता क्षणीच मिहीर या गावाच्या प्रेमातच पडला होता, बंगला तसा गावापासून दूर गावबाहेरच होता, पण मनवाला जसं 'ड्रीम होम' हवं होतं अगदी तसाच...

दोन दिवसात मिहिरने टोकन अमाउंट देऊन पंधरा दिवसात उर्वरित रक्कम देऊन लवकरात लवकर बंगल्यावर शिक्कामोर्तब केले.

मनवा अजूनही आश्चर्याच्या सुखद धक्क्यातून सावरली नव्हती..

बंगल्यासमोर फुलझाडांची मोठी बाग.गुलाब, जाई,जुई, शेवंती,हर तर्हेची फुलं बंगल्याच्या दर्शनी भागात, गेट मधून आत शिरताच डाव्या बाजूला सोनचाफा तर उजव्या बाजूला रातराणी दरवळत होती, मनवा त्या गंधाने बेधुंद होऊ लागली, नशेचे गारुड तिला कवटाळू लागले, कुणीतरी तिला संमोहित करावं आणि तिचे स्वतःवरचे सर्व नियंत्रण गळून पडावे तसेच काहीसे झाले, बंगल्याच्या मधोमध गोलाकार हौद होता, दोन मखमली कमळं नुकतीच उमलल्यासारखी दिसत होती, चारी बाजूला मोकळं आवार, गुलबक्षी बोगनवेल बंगल्यावर अस्ताव्यस्त पसरला होता...

बंगल्याच्या 'पद्मालय'या पाटीवर डोळे खिळताच चक्रव्यूहामधे शिरल्याचं जबरदस्त फीलिंग येत असल्याच तिला जाणवले .

मनवा

पाटी पाहता पाहता चक्रव्यूहाच्या गोलाकार रेषांभोवती मी इतकी गुरफटले की परतीच्या प्रवासाचे सारे मार्ग बंद झाले याची देखील जाणीव झाली नाही. हे संवेदना विरहित जग माझ्या जगापासून फार दूर होते. कोणतातरी अदृश्य तंतू मला बंगल्याकडे ओढू पाहत होता, आत...आत..अजून आत...आता फक्त एक काळा लहानसा बिंदू दिसत होता. मी त्याभोवती गोल गोल फिरत राहिले, फिरताना मला तो स्वतःकडे किंचित खेचत होता, गरम उष्ण झळानी आता माझा जीव कासावीस होऊ लागला...चहू बाजूला उष्ण झरे वाहू लागले..त्या उष्ण झऱ्याची मला भीती वाटू लागली. मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले..पण हात पाय कोणीतरी बांधून ठेवले होते आता माझा प्रत्येक अवयव बधिर होत होता......

मनवा ...मनवा

मिहिरची हाक येताच मी भानावर आले, शेकडो मैलांचा प्रवास करून आले असा थकवा जाणवला,उसनं अवसान आणून डोळ्यांनीच विचारले

"काय"

थांब इथेच...असे म्हणून मिहीरने मला दारात उभे राहायला सांगितले...समोर शारदा उभी होती.. औक्षणाचं ताम्हण हातात घेऊन ....

"हे काय शारदा तुला पण माहित होतं?"

"हो ताई पन काय करू सायबांची ताकीद होती सांगायचं न्हाय म्हनून"

शारदा ने भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला, रितसर औक्षण केले, आणि आमच्या बंगल्यात मी पहिल वहील पाउल टाकलं,मनात आलं,

ह्याने आधी सांगितले असतं तर काळी साडी निश्चितच नेसले नसते पण मिहिरचा या गोष्टीवर विश्वास नसल्याने शब्द मागे घेतले.

बंगला फार दिवस बंद असावा कारण प्रत्येक कोपर्यात कोळीष्टकं होती,पाटिवरच्या चक्रव्यूहात मी पुरती अङ्कले होते,त्यामुळे नव्याने या चक्रव्यूहाकड़े पाहण्याचा मोह मी टाळलाच. मघाशी उम्बरठया वरुन बंगल्यात पाउल टाकताना काहीतरी जाणवले.

बंगल्यात पाउल टाकताना आतंरिक उर्मी जास्त प्रबळ झाली, हा ऊम्बरठा पॉझिटिव एनर्जी चा एकमेव स्त्रोत झाला. नकळत हा उम्बरठा संरक्षणाचे कवच वाटून गेला....

ऐस पैस हॉल मधील भींतिवर ब्लैक एंड व्हाइट मधल्या काही फ्रेम्स होत्या, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गूढ़ भाव होते,तर दुसऱ्या बाजूला भींतिवर हिंस्त्र प्राण्यांचे मुखवटे... काही खुनशी तर काही दिनवाणे... मनावर हळूहळू दड़ पण येत होतं, हॉल मधून वर जाणारा चक्राकार जिन्हा पाहताच मी थबकले.....

क्रमशः

सरप्राईज-Umya Kamble

$
0
0

तरल भवानीक कथा बर्याचदां उदास करते...पण उम्याने चमत्कार केला आहे...त्याची ही कथा विलक्षण पोझीटीव्ह उर्जा निर्माण करते...सलाम तुला उमया.

सरप्राईज-उम्या कांबळे

आज प्रेमाचा दिवस वेलेन्टाइन डे ...

सकाळ पासून ती शांत बसून होती घरात... मोबाइलला स्विच ऑफ करून...ऑफिसला सकाळीच निरोप दिला..तब्बेत बरी नाही म्हणून..कामवाल्या बाईलापण सुट्टी दिली... पाळण्यातली गोड परी हसत होती मधूनच..तेवढंच लक्ष जायचं तिच्याकडे...

चार महिने झाले तिच्या बाबाला जाऊन...त्याचीच तर आठवण येत नसेल ... का स्वप्नात अजूनही खेळवतो तिला???

विचारांचं काहूर माजलं डोक्यात...

त्याला जाऊन चार महिने झाले...ती आणि तो दोघंही नोकरी करणारी..मस्त कुटुंब..नुकताच फ्लॅट घेतला ...एक कंपनीत ती सेक्रेटरी तर तो IT इंजनिअर..

त्याला सरप्राईस द्यायला...खूप आवडायचं...अचानक संध्याकाळी घरी आला की

चल...

अरे पण जेवण होत आलंय रे ...

तू आवर पटकन आज चाइनीज खायला जाऊ ...

दुपारचं ऑफीसाच्या पुढे गाडी लावून फोन करे..

ये हाफ डे टाक चल पिक्चरला जाऊ मस्त...बाहेरच जेऊ आणि चौपाटी हिंडू..

अरे नको रे खूप काम पडलंय...

आग लाव त्याला. मी पाचच मिनीट वाट बघेन नायतर एकटा जाईन...

अर्ध्या तासन खाली यावं तर तो मुद्दाम पाठमोरा उभा .

सॉरी अरे. उशीर झाला ना ..

आपल्याला पिक्चरला जायचंच नव्हतं ....

मग????

सर्कसला ..जायचंय ..

काय रे तू काय लहान आहेस का आता ???

हे बघ...जो पर्यंत आयुष्य आहे लहान बनून जगायचं.... मज्या करायची... हे क्षण परत येत नाहीत..आयुष्याला शिव्या घालत जगणं आवडत नाही ग मला..आणि तुलाही सांगतोय ... माझ्या मागे पिल्लूला पण असंच करायचं ..

ये कायपण बोलू नको अभद्र...आणि साहेब पिल्लू व्हायचंय अजून..चला....

दिवस असेच जात होते..आणि त्यांना मुलगी झाली.

कित्ती खुश होता तो..परी हे नाव पण त्यानेच ठेवलं. पोटात घेऊन झोपायचा तिला. ती झोपली की तिच्या पोटाला हळूच गुदगुल्या करून लाडात बोबडं बोलायचं ...

हशू येत आमच्या पिल्लू ला .. काय रे!!!!!

आणि असाच एक दिवस तो सरप्राईज देऊन तो निघून गेला..कायमचा. एका अपघातात.. त्याची चुकीची नव्हती ...

तो असताना त्याने सेलेब्रेट केलेले दिवस त्याचा हसरा चेहरा त्याचा उत्साह...डोळ्यासमोर तरंगून गेला..ती आता कुठलाही दिवस साजरा करत नाही...तिचा वेलेन्टाइन निघून गेला होता ...

आणि परी परत हसली ..

मनाच्या पोकळीत एक विचार चमकून गेला ...

लगेच ती उठली..फ्रेश झाली..खिडक्यांचे पडदे उघडले..घरात उजेड पसरला...दोन मिनटात पूर घर आवरून घेतलं तिनं. तयार होऊन ती बसून राहिली परी उठण्याची वाट बघत ... नेहमीप्रमाणे परी उठली. मम् मम् मम्...करत पाळण्यात हातपाय हलवत बसली...

अरे आमचं पिल्लू उठल तर... लब्बाड कुठली !!!

गरम पाण्याने टब भरला...छान अंघोळ झाली परीची..नवीन कपडे घातले परीला पावडर लावली गालाला काळा टीका लावला ...

पायऱ्या झपाझप उतरून खाली आली...

मस्त चालत दोघी मायलेकी समुद्र किनारी आल्या..सगळीकडे प्रेमीयुगुलांची गर्दीच होती ..तारुण्याचा बहर फुलला होता त्यात खरी गुलाब किती आणि प्लास्टिकचे किती असा विचार करून त्यांच्यातून वाट काढत ताठ मानेन न संकोचता ती एक फुलवाल्या पाशी जाऊन उभी राहिली...भैया एक गुलाब देना....गुलाब देताना..भैय्याने विचित्र नजरेनं पाहिलं. .ती सरळ समोर चालत गेली वाळूत बसून परीला मांडीवर घेतली ...

WILL YOU BE MINE VALENTINE...असं म्हणून परीच्या हातात गुलाब दिला...परीनं घट्ट पकडून ठेवला तो..तिला तिचा व्हेलेंटाईन सापडला होता....

नजर विस्फारून तीन समोर पाहिलं ...

क्षितीजाच्या पलीकडून तो गालात हसत होता ...

हे सरप्राईज तिन त्याला दिल होत ......

काय झालं...?-Ashutosh Purohit

$
0
0

विलक्षण कथा .... काही सांगायची गरज नसते...काही ऐकायची गरज नसते...फक्त असणे पुरते.....आशुतोष तू जिंकलीस रे...

काय झालं...? – आशुतोष पुरोहित

शेवटी न रहावून तिनं स्टेटस अपडेट केलंच... ' Got Deeply Hurt... ' दुसऱ्या सेकंदाला तिच्या account वर msgs चा पाऊस...

"काय झालं ?", "काय झालं ?", "काय झालं ?".... एकंच प्रश्न वेगवेगळ्या सुरात चिवचिव करायला लागला.. "काय झालं...?" !!! एक खूप मोठं उत्तर असणारा, दोनच शब्दांचा छोटा प्रश्न...! सुरुवातीला तिलाही जरा दोन क्षण ' भारी' वाटलं.. आपली कोणीतरी काळजी करतंय हे पाहून.. पण, जो माणूस खरंच दुखावला गेलाय, तो त्याचं दुःख,

'काय झालं ?'

या, दुधाचा रतीब घालावा, इतक्या सहजतेने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नाहीच कोंबू शकत...

तिला कोणाकोणाला काय काय सांगावं कळेना.

मग तिनेही generalच, 'nthng much' असा थंड reply दिला.. काही चिवट(किंवा चावट) मित्र-मैत्रिणींनी पाठपुरावा केला... पण ते तेवढ्यापुरतंच..

तिचा प्रेमभंग वगैरे झाला नव्हता. पण कोणाच्यातरी अनपेक्षित वागण्यामुळे, ती आतून पुरती हलली होती..ढासळली होती.. पण, ' Got Deeply Hurt 'हे तीन शब्द, आतून किती चिरलं गेल्यावर मग पोतडीतून बाहेर काढायचे असतात, हे अनेकांना माहिती नसते. प्रत्येक गोष्टीत वरचेवर फक्त दुःखच वेचणार्यांना ते नाहीच कळायचं..!

एवढ्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला. भरून आलेला ढग डोंगराशी थटल्यावर फुटावा, तसं, तिकडून "हॅलो" ऐकल्याबरोबर, ही धायमोकलून रडायला लागली.. ५-७ मिनटं ती फक्त रडत होती.. फक्त रडत...

रडणं थांबल्यावर ती एकच वाक्य म्हणाली, "Thank You So Much "...

पलीकडून गोड हसण्याचा आवाज आला..खरंतर गेल्या ५-७ मिनिटात काहीच 'झालं' नव्हतं त्यांच्यात.. तरीही "काय झालं?" या प्रश्नाचं उत्तर पलीकडे पोहोचलं होतं..

बाकी काहीच 'झालं' नाही त्यांच्यात.... काहीच नाही....

शापित-Bhagyashree Beedkar

$
0
0

काही जीव शापित असतात...भळभळती जखम घेऊन तेलाची भिक मागित फिरतात...पण......

शापित-भाग्यश्री भोसेकर बीडकर

अर्धवट जळालेल्या सिगारेटचं थोटुक तिने विझवलं. सभोवार नजर फिरवली.

समोरच्या भिंतीवरचे दोन अप्रतिम पोर्टेटस, सोफ्यावर पडलेल्या कपड्यांचा अस्ताव्यस्त पसारा, त्याच्या बाजूला बेडरूमकडे जाणारी दरवाजाची चौकट, बेडरूमची उघडी असणारी खिडकी, त्या खिडकीतून येणाऱ्या हवेमुळे उडणारे पडदे, त्यांचा फडफड असा आवाज, बेडरूमच्या बाजूला प्रशस्त डायनिंग ऐरिया, त्या डायनिंग टेबलवर हौशेने सजवलेली फुलं जी आता सुकली आहेत पार. डायनिंग ऐरिया मधून दिसणारा अथांग समुद्र.. समुद्राच्या गाजेचा ऐकू येणारा हलका आवाज. त्यानंतर आटोपशीर किचन तिथल्या सिंकमध्ये पडलेले चहा कॉफीचे ओशट कप/मग.

तिने या सगळ्याकडे पहात एक सुन्न उसासा सोडला. उठली..तिचं आवडतं कलेक्शन उघडलं.. व्हिस्की...ग्लासात भरली..ऑन द रॉक्स...ग्रामोफोनवर आवडती गझल लावली. ग्लास ओठाला लावला..एका दमात रिचवला.

तिला अचानक पार्टीमधलं संगीत ऐकू येऊ लागलं. सगळीकडे झगमगाट, छानछोकी कपडे, हसण, बोलणं सारं काही बेगडी..चेहऱ्यावरच्या मेकअपच्या थराइतकंच. काहींच्या नजरेत अनोळखी भाव, तर काहींच्या नजरेत तुसडे भाव तर काहींच्या नजरेत असूया देखील..तिच्या नजरेने हे सारं काही टिपलं आणि इतक्यात 'उत्कृष्ट नवोदित अभिनेत्री' म्हणून तिचं नाव पुकारण्यात आलं. टाळ्यांचा कडकडाट झाला, लोकांमधली कुजबुज वाढली. स्टेजवर जाताना एका प्रतिष्ठित अभिनेत्रीने अभिनंदनासाठी हात पुढे केला आणि तिला मिठीत घेत ती अभिनेत्री म्हणाली "हा तुझा पहिला आणि शेवटचा पुरस्कार. पाहू किती काळ टिकतेयस" आणि पुन्हा तेच बेगडी हास्य.

मग ती यशाच्या एकेक पायऱ्या चढत गेली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. जिंकायची सवय झाली तिला जणू. फिल्मी दुनियेत तिला मानमरातब मिळाला, तिच्या शब्दांची पत वाढली. यशाची झिंग चढत गेली, पैशाच्या धुराची वलय डोळ्यासमोर जमा होऊ लागली त्या पालिकडंच वास्तव जग मग अंधुक झालं, दिसेनास झालं. मग हळूहळू वक्तशिरपणाची, शिस्तीची जागा उद्धटपणाने घेतली..जुने दिवस ती सोयीस्करपणे विसरून गेली. पण या चंदेरी दुनियेला रोज नवेपणाचा शाप आहे हे देखील ती विसरून गेली. कुठे कोणी काही चांगलं काम करताना दिसलं की हिच्या मनात खुट्ट व्हायचं. स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास पार ढळला होताच पण तिच्या मनात सूड आणि असूये शिवाय दुसरे विचार यायचे नाहीत. सहकाऱ्यांच कौतुक करताना ही तोंडात मिठाची गुळणी धरून असायची. एका पुरस्कार समारंभात एका नवोदित अभिनेत्रीला पुरस्कार जाहिर झाल्यावर ही तिला अभिनंदन करताना म्हंटली "हा तुझा पहिला आणि शेवटचा पुरस्कार. पाहू किती काळ टिकतेयस"....

सदसदविवेकबुद्धीची जागा असूयेने घेतल्यावर त्या आगीत होरपळण निश्चित होतं आणि हळूहळू ही लोकांच्या विस्मरणात गेली.

तिने दुसरा ग्लास भरला. तोही ओठाला लावला. पाणी प्याव इतक्या सहजतेने प्यायली. तिला आता डोळ्यांसमोर एकेक माणसं एकेक आकृती दिसू लागली. अभिनंदन करणारी एक आकृती, "हा तुझा पहिला आणि शेवटचा पुरस्कार.." असं म्हणणारी एक आकृती, तिची या चंदेरी दुनियेतली जागा बळकवणारी एक आकृती, तिच्या अंगाला लोचट स्पर्श करणारी आकृती, तिच्या अप्रतिम सौदर्याचं कौतु्क करणारी एक आकृती ,तिच्या स्वतःमधली एक विकृत आकृती....ह्या सगळ्या आकृत्या तिच्यासमोर थयथयाट करायला लागल्या, तिच्याकडे बोट करून अक्राळविक्राळ हसू लागल्या, तिला खिजवू लागल्या. तिला शांतता हवी होती. तिने कानावर हात ठेवले, डोळे गच्च मिटले. ती जोरात ओरडली. ग्लास दूर फेकला...खळळ काचेचा आवाज आला.

तिने टेबलच्या खणात काहीतरी चाचपडलं. तिच्या हाताला काहीतरी लागलं. विष!!! विष जे तिला शांतता देणार होत, तिचा एकटेपणा घालवणार होत, तिच्या सुखद आठवणी जपून वाईट दिवस विस्मृतीत घालवणार होतं. तिने ते उघडून त्यातले दोन-पाच थेंब एका ग्लासात टाकले. ग्रामोफोनचा आवाज वाढवला. शेवटचा प्याला भरला...आणि घटघट पिऊन डोळे मिटले...शांतपणे... कायमचे.

अवसान–समिक्षा बांगडे

$
0
0

समिक्षा तुझ्या पहिल्याच कथेने खूप अपेक्षा निर्माण केल्या आहेत...लिहित रहा....

अवसान – समिक्षा बांगडे

आज नकळतं परत त्याच खिडकीत जाऊन बसलं होतं तिचं मन...

खिडकी तिच होती. रस्तावरची वर्दळ ही तीच, रोजचीच होती..आणि मुख्य म्हणजे आता तर ती ओळख ही चांगलीच जुनी झाली होती. मग जरा निवांत होउन विसावलंच तिचं ते स्वप्न, अगदी ऐसपैस, खिडकीत.

त्या येण्याची वाट बघतं. अधाशासारखं.

अशी येण्यापूर्वीची ही वाट बघायला लावणारी शांतता ना अगदी जीवघेणी ठरते रे ह्या वेड्या मनासाठी आणि सांगूनच टाकते की, तिच्यासाठी ही त्या घड्याळाची टीकटीक सुरु झाली होतीच. पण आता ती टिकटीक ही अगदी भेसुर वाटू लागली.

श्वास उसवत ही रात्र ही सरु लागली. असतात अशा जिवघेण्या रात्री जिथं फक्त क्षण सरायची वाट पहायची असते. ती समजावत राहिली वेडावलेल्या त्या मनाला.

आता बहुधा तिचं धडधडणारं ह्रदय थांबलेलं असावं. थोडं घाबरायलाच झालं मग तिला.

"याला इतक्यातच कसं जगणं असह्य झालं?" ती पुन्हा पुटपुटली.

"काय ना, आजही मला जिवंतपणा थोडा उसना आणावा लागेल बहुधा!" तिनं सांगून ठरवून टाकलं. मुद्दाम का होई ना केलाच आज मोबाईलवर गाणं ऐकण्याचा तो तसाच अट्टाहास!

तेवढीच सोबत होईल, त्या डोळ्यात प्राण एकटवुन वाटेवर नजर लावुन बसलेल्या जीवाला.

आणि चुकलाच तिचा अंदाज. समजलंच नाही त्या खिडकीतलं स्वप्नांचं अस्तित्व तिला, . . . शेवटी आता शांतता चिरु लागलीच.

आणि तिचं सर्वस्व असणारं , ते त्याचच गीत ऐकवत मोबाईल वाजलाच.

"बिन तेरे क्या है जीना"

क्षणात उधाणलेलं उसनं अवसान लगेच गळून पडलं.

पुन्हा कधी न उघडावी अशी बंद झाली खिडकी. पण स्वप्नं उभी राहिलित तशीच, अस्वस्थ ...न राहवून तिथे ही तिच शांतता दाटलीच.

मग ती ही उभी राहिली. धडाधड दारं खिडक्या उघडल्या...आणि गळुन पडलेलं अवसान एकटवुन धावत सुटली, परत एकदा स्वप्नांवरचे हल्ले रोखण्यासाठी....

Viewing all 1118 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>