श्रद्धा डोळस अशी होते...
विक्रम
विश्वास – सुचिता घोरपडे
दूर मंदीरी पहाटेच्या काकड आरतीची गुंज ऐकू येत होती.आणि शालीनी आपल्या लाडक्या महादेवाला म्हणजे शिवलिंगाला दुग्धाभिषेक घालत मंत्रोच्चार करीत होती..पूर्ण देवघर तिच्या मंत्रोच्चारांनी भरून गेले होते.अभिषेक झाल्यावर शालीनीने शिवलिंगाची विधीवत पूजा केली.प्रेमाने त्याला सुंदर सुवासीक पांढ-या फुलांनी सजविले.पूजा झाली मग तिने श्रद्धेने दोन्ही हात जोडून मनोभावाने प्रार्थना केली.
नित्यनियमाने ती महादेवाची पूजा अर्चना करी.त्यामध्ये ती कधीही खंड पडू देत नसे.तिची महादेवावर अपार श्रध्दा. दिवस रात्र ती त्याच्याच भक्तीत लीन होऊन राही.मग कोणतेही काम करीत असो मनात मात्र महादेवाचाच जपं चालू राही.तिच्या या भक्तीसागरात मग सगळेजण आपोआप तल्लीन होऊन जात असत.
एक दिवस असेच ती पूजा आटोपून मुलीची वाट पहात बसली, आणि तिने पाहिले काही माणसे तिच्या मुलीला उचलून आणत आहेत,ती घाबरली, धावत जावून तिने मुलीला आपल्या कवेत घेतले.घरी आणले.लोकांनी सांगितले की तिची मुलगी खेळत असता अचानक चक्कर येऊन पडली.इतर मुलींनी मग आरडाओरड करून सगळ्यांना बोलाविले.
सगळ्यांनी त्या मुलीला दवाखान्यात नेले.पण काही उपयोग झाला नाही.ती शुध्दीवर येतच नव्हती.तिचे श्वास तर चालू होते पण शरीराची काहीच हालचाल होत नव्हती.खुप प्रयत्न केले सगळ्यांनी.अनेक दवाखाने झाले पण त्याला यश काही मिळत नव्हते.सर्वांनी हात टेकले.परमेश्वरावर भरवसा ठेवून तिला घरी आणले.
दिवसभर शालीनी मुलीची सेवा, देखभाल करी.आपली मुलगी एक दिवस नक्की बरी होणार आणि आपला महादेवच तिला ठीक करणार हा तिचा अटळ विश्वास होता.ती मुलीच्या काळजीसोबत म्हादेवाचीही रोज न चुकता तन्मयतेने पूजा करी.त्याला साकडे घाली.प्रार्थना करी.पण फरक असा काही पडतच नव्हता.उलट दिवसेंदिवस तिच्या मुलीची तब्येत आणखीनच बिघडू लागली.तरीही तिने आपली महादेवावरची अपार श्रध्दा कधीच ढळू दिली नाही.
इतकी वर्षे तिने भक्तीभावाने त्याची पूजा केली होती.त्याचे एक अढळ स्थान आपल्या जीवनात, आपल्या घरात निर्माण केले होते तिने.तिचा पूर्ण विश्वास होता की आपल्या श्रध्देला कधीही तडा जाणार नाही.आपली थोडी तरी कीव त्याला येईल आणि तो मुलीला ठीक करेल.पण व्यर्थ झाले सगळे.एक दिवस तिची मुलगी हे जग सोडून गेली.
इतका मोठा धक्का तिला सहन झाला नाही.ती भ्रमिष्ठासारखी करू लागली.ज्या महादेवाची ती न चुकता पूजा करी त्या महादेवाकडे एक नजरही तीने टाकली नाही.ती ना रडत होती ना हसत होती.नुसतेच एकटक मुलीच्या फोटोक़डे पहात बसायची.तिला कळत नव्हते की आपले असे काय चुकले म्हणून महादेवाने आपल्याला अशी कठोर शिक्षा केली आणि आपले आईपण हिरावून घेतले.
तिचा विश्वास तुटला,त्याला कधीही न भरून येणारा तडा गेला.तिची श्रद्धा ,तिचा भक्तीभाव याचे काहीही मोल राहिले नाही.महादेवावरच्या ज्या विश्वासाने ती जग जिंकत असे तो विश्वास आता रसातळाला गेला ..आता सगळे काही संपले होते.
आणि मग एक दिवस अचानक ती बाहेर पडली, चालतच राहिली एकटीच. क्षितीजापर्यंत........जिथे अथांग सागर दूरवर पसरला होता.तिथे तिने लाल कपडयात बांधून ठेवलेला शिवलिंग अलगद बाहेर काढला आणि सागरार्पण केला.........आपल्या विश्वासासह.