Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

आई कुणाच्याच वाटणीवर गेली नाही..! – ऐश्वर्य पाटेकर

$
0
0

ऐश्वर्य पाटेकर ह्यांचे नुक्कड वर स्वागत आहे...ऐश्वर्यचे नाव चांगलेच परिचित आहे...सकाळ प्रकाशन तर्फे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे..विविध आकृतीबंधात त्यांचे विपुल लेखन आहे...महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अंकात सुद्धा त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे...तर त्यांची ही भावगर्भ कथा

विक्रम

आई कुणाच्याच वाटणीवर गेली नाही..! – ऐश्वर्य पाटेकर

भल्यामोठ्या वाड्यासमोरचा लिंब एकाकी उभा होता. त्याला जर बोलता आलं असतं; तर मी फार उदास झालो आहे! असं त्यानं त्याच्या सुकून गेलेल्या फांदीफांदीतून सांगितलं असतं. नेहमी अंगणात येणारे चिमणीकावळेही दाणे न उचलता निघून गेले होते. एवढेच नाही तर गोठ्यातली गायही चारा खाणं विसरली होती. कुत्र भाकरीच्या समोर नुसतंच तोंड टेकून बसलं होतं. त्याची भाकरीवरची इच्छाच उडाली होती. वाड्याच्या दारी सुतकी कळा पसरून राहिली होती. त्याला कारणही तसंच होतं; वाड्याचं चैतन्य असलेले अप्पासाहेब धरणीला खिळून शेवटचे श्वास मोजत होते. त्यांचा जीव त्यांच्या दोन्ही लेकांत अडकून पडला होता. दोन्ही लेक मुलखाला..

अप्पासाहेसाहेबांची पत्नी, सारजामोठ्याई रस्त्यावर डोळे लावून बसली होती. लेक आता येतील; मग येतील..! पण अजूनही तिच्या एकाही लेकाचा पत्ता नव्हता. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्यास उगा विचारत होती.

‘काय रे सुदाम, फाट्यावरच्या गाडीतून कुणी उतरलं नाही का?’

‘न्हायी त मोठ्याई..कुणी येनार व्हतं का?’

‘अरे अभय अन विष्णू यायचे; अप्पाचा जीव अडकला नं त्यांच्यात!’

‘येतील येतील शेवटची गाडी यायचीय अजून!’

असं म्हणत सुदाम निघून गेला अन शेवटची गाडीही! सारजामोठ्याई हिरमुसली. तिचं कुंकू उडून जाणार ह्या भयानं आधीच अर्धी झालेली मोठ्याई, दु:खी कष्टी झाली. तिच्या डोळ्यासमोर भरभर काळ निसटत होता. जेव्हा तिनं अप्पासाहेबांबरोबर लग्न करुन; या घरात पाऊल टाकलं. तेव्हा झोपडीचा वाडा, मोठ्या कष्टानं उभा केला. पण आज त्या वाड्याला तडे जाऊ लागले होते. वाड्याचा खांबच जर असा निखळून धरणीवर पडला, तर वाड्यानं कुठवर तग धरावी? तिचे दोन्ही लेक तिच्या पदराखाली वाढले. थोरल्या विष्णूचा बापात जरा जास्तच जीव होता. तिला आठवलं..

विष्णू आठदहा वर्षांचा असेल तेव्हाची गोष्ट..अप्पासाहेबांचे पाय चिखलाने भरले होते. आप्पासाहेबांनी विष्णूला हाक मारली,

‘बाळा, विष्णू पाणी आण रे बदली भरून!’

‘अप्पा किती पाय भरले तुमचे चिखलाने!’

‘अरे पाणी देवून आलोय पिकाला; मग पाय भरणारच!’

‘अप्पा तुम्ही पाय ठेवा दगडावर!’ असं म्हणत विष्णूनं आप्पासाहेबांचे पाय धुवून दिले. घरात आल्यावर

लाकडी खुर्चीवर बसायला सांगितले. अप्पासाहेब नवलानं पोराच्या हरकतीकडे पहात राहिले. विष्णू त्यांच्या पायथ्याशी बसला. पाय मांडीवर घेवून उपरण्यानं पुसून देवू लागला. मोठ्याई चहा घेवून आली. तीही अप्रूपानं पहात बसली.

‘अग्गोबाई, तुमचा लेक बघा किती सेवा करुन राह्यलाय तो, बर का बाळा! अशीच माया राहू दे मोठेपणी! नाही तर व्हायची पातळ!’

‘लेक कुणाचाय सारजा! जळू नको उगा बापलेकाच्या मायेवर!’ अप्पा मिशा पिळत फुशारकीनं म्हणाले.

‘अप्पा मी मोठा होईन, तेव्हा तर तुम्हाला कुठलीच कामं करुन देणार नाही!’

अप्पासाहेबांचा तो मूठभर आनंद अजूनही मोठ्याईच्या काळजाच्या कागदावरुन पुसला गेला नव्हता. तो तसाच ताजा होता. मात्र आज दुखरी कळ सारजामोठ्याईच्या काळजाला बिलगून आली. बापावर डोंगराएवढी माया असलेल्या विष्णूला, बापाचा निरोप मिळूनही यायला उशीर होतोय.ती स्वत:शीच हसली. अन पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडू लागली..

थोरला विष्णू अप्पाचा; तर धाकला अभय आईचा. अभयला सर्वच गोष्टीत आई लागायची. एकदा तर चिडून अप्पासाहेब त्याला म्हणाले होते,

‘तुझी आई मेली तर काय करशील रे, सारखं आईच्या नावाचं पुंगानं लावलंस?’

‘मी नाही पिणार मावशीच्या हातून दूध; आई कुठेय?’

‘अरे राजा नको असा हट्ट करूस!’ सुमनमावशी अभयला समजावीत म्हणाली.

‘एकदा सांगितलं नं मावशी! मी आईच्याच हातून दूध पिणार; नाहीतर नाहीच पिणार!’

‘सुमन त्याला राहूदे उपाशी; भूक लागली की आपोआप पेईन!’ अप्पासाहेब म्हणाले.

तेव्हा सारजामोठयाई माहेरी गेली होती. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचंच होतं; पण बैलाचा पाय दुमता झाला. म्हणून थेट दुसऱ्यादिवशी आली. आल्या आल्या सुमनमावशीनं गाऱ्हाणं घातलं तिच्या कानावर.

‘ताई, तुझा लेक रात्री उपाशीच झोपला बाई!’

‘काय रे आभा, असं नाही करायचं बाळा!’

‘ताई, तू नशीबवान वो बाई! तुझ्यावर तुझ्या लेकाची फार माया!’

‘आभा असं रे काय? मी जर मेले तर!’

‘मी मरूच नाही द्यायचो तुला; का गं मावशी?’

‘हो रे बाबा!’

‘देवाघरचं मरण त्याला टाळता थोडंच येतं बाळा!’

‘तुला न्यायला येणाऱ्या देवाला म्हणेल, मला ने; पण माझ्या आईला नाही! त्यानं ऐकलंच नाही तर मी त्याच्याशी युद्ध करीन; त्याला हरवीन!’

सारजामोठ्याईनं त्याला कुशीत घेतलं. त्याचे पटापटा मुके घेतले..

आई पापणीआड झाली की कासावीस होणारा लेक आज आईच्या डोळ्यांच्या पापण्या, वाट पाहून पाहून गळायची वेळ आली; तरी तिच्या लेकाचा पत्ता नाही! म्हादू चहा घेवून आला.

‘आयसायब च्या घ्या!’

‘काय रे म्हादू, कधी येतील ही पोरं?’

‘येतील येतील नौकरीची माणसं ती! आपल्यासारखी रिकामी थोडीच हाये! सुट्टीसाठी आर्जफाटं करावं लागतं त्यास्नी; त्यात येळ जानारंच!’

‘हो रे बाबा म्हादू, मनाला उगा समज घालायची! माया फार तकलादू असते; कचाकड्याच्या खेळणीसारखी! जाते फुटून..उन्हातान्हात झिजून हे सारं उभं केलं त्यांच्यासाठी! पण त्यांना आहे का त्याचं काही? बाप मरणदारी वाट पाहून राहिलाय त्यांची..आपल्या माणसांपेक्षा कामे मोठी झाली का म्हादू?’

‘आयसायब! नका मनाला लावून घेवू; चांगले हायेत आपले मालक!’

तेवढ्यात दारात अभयची गाडी येवून उभी राहिली. गाडीतून उतरल्या उतरल्या अभयनं आईचं दर्शन घ्यावं,गहिवरून बापाकडे धाव घ्यावी! पण तसं काहीच झालं नाही. तो म्हणाला,

‘आई, काय गं विष्णूदादा नाही आला का अजून?’

‘तू आला नं! येईल तोही; निघालं असेल काही काम!’

‘त्याला फोन करुन कळवलं होतं मी; की मला सुट्टी नाहीये म्हणून! पण त्याचं असंचय!’

‘सुनबाई, पोरांना नाही आणलं बरोबर?’

‘त्यांचं काय काम आई! मी आलोय नं!’

‘माझ्या मेलीच्या लक्षात कुठं आलं की अप्पाचा जीव तुमच्यात अडकला होता. तुमच्या लेकराबाळांत थोडाच?’

‘आई टोमणे नको मारु; त्यांचा जीव रमला नसता इथं! म्हणून नाही आणलं. मी तर मोठ्या मुश्किलीनं आलोय!’

‘बरं झालं बाबा तू आला; थकला असशील, आधी चहापाणी घे!’

‘चहापाणी रस्त्यातच झालं आई!’

सारजामोठ्याईच्या जीवाला फार लागलं. ज्या पोराचं आईशिवाय पान हलत नव्हतं; त्याला आता आईचीही आवश्यकता राहिली नव्हती. आल्या आल्या बापाकडे जाऊन साधी चौकशी करावी, तर तेही नाही. काळ फारंच बदलला. माणसाला माणसाची कवडी गरज उरली नाही. अभय खूपच मोठा झाला; असं तिला जाणवलं. काळजात सुपारी चरचरत गेल्यासारखी वाटली. जरावेळानं विष्णूही आला. तोही एकटाच..

सारजामोठ्याईचा हात दोन्ही लेकांच्या हातात देत आप्पासाहेबांनी जीव सोडला. सतीगती लावून आल्यावर मोठ्याई खांबाला टेकून बसलेली. खरंतर तिचा जीव आप्पासाहेबांबरोबर निघून गेला होता. कुडी तेवढी मागं राहिली होती. पोरांची कोरडी झालेली माया पाहून स्वत:लाच खिजवल्यासारखी पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडून बसली.

‘सारजा, माझे दोन्ही लेक फार गुणीय. आपल्याला कधीच अंतर देणार नाही!’

‘अवो,पण शहराचा वारा लागला नं त्यांना मातीत काही करमणार नाही. म्हणून म्हणते, पुरी झाली शाळा. आपण एवढं कुणासाठी कमवून ठेवलंय?’

‘माती काही कुणी खंदून नेणार नाही सारजा!’

‘अवो पण मला नाही गमायचं बाई लेकांशिवाय! शाळा काय गावात राहूनही करता येईन की !’

‘सारजा, मला तुझं कळतंय पण आपले लेक तसे नाही!’

‘सोन्याचा पाळणा करुनच घेवून जातील काशीयात्रेला!’

‘नेतील नेतील माझं म्हणणं आठवेल तुला!’

सारजामोठ्याईला आज सारंच आठवत होतं. त्याचं काय करायचं? दशक्रियाविधी झाला नाही तोच दोन्ही लेकांत वाटणीवर चर्चा सुरु झाली. मोठ्याईच्या काळजावर कुऱ्हाड बसल्यासारखी झाली. अस्तराचा धागा धागा उसवला; त्याला कुठल्या सुई-दोऱ्यानं शिवणार? अन कशासाठी?

‘दादा, वाटणीचं काय?’

‘ते आताच मिटवून टाकू! परत काय येणं होणारय का आपलं!’

‘मलाही तेच वाटलं होतं!’

‘हे बघ, आंब्याचा मळा अन म्ह्सोबाचं पन्नास एकर मी घेतो, हा वाडा अन सत्तर एकराचं वाड्याचं वावर तुझ्या वाट्यावर!’

वकिलाला अन तलाठ्याला वाड्यात बोलवून वाटणी कागदोपत्री केली. थोरल्याला काहीतरी काम होतं तो घाईघाईनं निघूनही गेला. धाकल्याच्या वाट्याला वाडा आला होत. त्यानं दाराला कुलूप लावलं; अन गाडीचा धुराळा उडवीत, तोही निघून गेला.

आई मागे एकटीच उरली होती; तुळशीवृंदावनाला टेकून बसलेली. म्हादू आला. म्हणाला,

‘आयसायब चलावं माझ्या घरी!’

आई काहीच बोलली नाही. म्हादूनं हात लावला. तशी आई जमिनीवर घरंगळली.

आई कुणाच्याच वाटणीवर गेली नाही..!

आईची वाटणी राहिलीच...


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>