विलक्षण मनस्वी कथा आहे ही!जियो जान्हवी!!
तू गेलीस – जान्हवी पाटील
तू गेलीसच. ठरवुन की अजुन काही नको. नक्की ठरवले होतेस..? की वाट पाहत होतीस शेवटचा श्वास घेईपर्यंत.. कुणाचीतरी? अगदी तोच नाही..कुणीही चालले असते ना थांबवण्यासाठी? हक्काने दोन कानशिलाखाली वाजवणारे? थांबवणारे..?
दार आड केले होते. कडी नव्हतीच.
अडकला असेल..गुदमरुन गेला असेल श्वास..साडीच्या गाठीमध्ये मान टाकताना.
तुझ्या सताड उघड्या डोळ्यांतुन सुकलेल्या पाण्यात अपमान.. शिव्या.. कडू नजरा..अबोला..खरी खोटी स्वप्नं.. त्यांची ओझी.. त्यांचे तुकडे.. तुकड्यांच्या अचकुणीदार काचा वाहत होत्या.
त्या काचांमध्ये तू दिसली असशील तुला.. पार हरलेली.
पण...त्या पलिकडच्या काचेत पाहिलेस? त्यात तुमच्या दोघांचा चेहरा अजुन दिसतोय.
तू त्याचे नाव लावुन त्याच्य़ा / तुमच्या घरी गेलीस त्या दिवशीचा.. and they lived happily ever after वाला..का नाही पाहिलास..? एकदा स्वतःला पहायचे होतेस..
अन् डोळे मिटायचे तरी होतेस जाताना.. तुला काय दुखले ते कळले तरी नसते ना कुणालाच. कुणालाच!!
मला काय हवे होते ते आता तरी कळले का असं विचारताहेत तुझे डोळे.. टकटकीट उघडे राहुन. पण उत्तर शोधायला वेळ कुणाकडे आहे इथे.. कळले का आता तरी तुला काही?
तुला एक कळले का..कन्यादान झाले.. गळ्यात चार काळे मणी आले की पोर परकी होते पार..अन् इथे तर त्याचे नाव तर तु तुझ्या आवडीने जोडलेलेस.
लेकीने पाहुणी म्हणुन यावं आलंच तर..हक्क वैगरे काही नसते कुठेच.
घर नसतेच की तिला तिचं. लग्नाआधी आईबापाचं घर. लग्नानंतर नवर्याचं घर. तिचं स्वतःच असं काही नसतच. तुला कळले नाही नेमके तेच. नाव आडनाव बदलुन तु त्याच्या घरी गेलीस तेव्हा इकडचा हक्क सुटला तुझा. शेवटचा श्वास घ्यायला इथे आलीसच कशी? तुला हक्क नव्हता तो. नाव खराब झाले त्यांचे..तुझ्यामुळे.
डाग लावलास 'त्यांच्या'घराला.
तुला एक कळले का जाताना तरी.. त्याला तु निर्णय विचारलास काय निवडशीलवाला.. तेव्हा त्याला निवड करायला भाग पाडलेस- हे की ते मध्ये. तो गोंधळला. त्याच्यासाठी तुझे असणे गृहीत होते.. चुक बरोबरच्या गणितात नक्की काय ते समजायला तो तुझ्या जागी राहुन विचार करेल असं वाटलं तुला. पण असं असतं? होतं?
म्हणजे तुच चुक होतीस की त्याच्य़ाकडुन अपेक्षा करत होतीस. तुझी ओळख मागत होतीस. असं असतं का कुठे...स्वतःला शोधत राहिलीस त्याच्या घरात..जगात..कमी पडलीस गं रुजायला. कळलंच नाही तुला.. तु बाई आहेस. कुठेही रुजायचंच असतं ते..
वाट मात्र पाहलीस शेवटपर्यंत..त्याची.
तो नाही आला आणि दुसरे कुणीही आले नाही..तु मात्र सुटलीस. स्वतःच्या त्राग्यातुन. आता तरी थांबले का प्रश्न? सख्ख्यांच्या टोमण्यांचे.. नजरांचे घाव निवळले?
बरं जाऊदे..गेलीच आहेस तर नीट जा. पुन्हा अशा माणसांत येऊ नकोस.
ऐक. गंमत सांगते जाताजाता.. हसू येईल तुला ऐकुन..कुणीतरी म्हणत होते.. काय गरज होती ना इथे येऊन मरायची. जायचं होतं ना सासरी. इथे काय होतं तिचं? फुकट सालं बिल्डिंगच नाव खराब करुन गेली..
समजलीस....