असे अनुभव जगण्याची आणि लढण्याची इच्छाशक्ती देतात....
प्रसन्न – मेघा निकम
आज पहाटे डेहराडून एक्स्प्रेसमधून बोरीवली स्टेशनला उतरले. ३:५० ची चर्चगेट लोकल उभीच होती. पाठीवरील मोठे ओझे पाहून मागे लागलेल्या रिक्षावाल्यांना चुकवून लोकलचे तिकीट काढून मी महिलांच्या डब्यात चढले. डब्यात तीन बायका, सुरक्षा पोलीस आणि मी एवढीच माणसे. त्यातील एक 'म्हातारी बाई' आधीच झोपलेली होती. दुसऱ्या दोघी कुठूनतरी लांबून प्रवास करून आलेल्या आणि आता अंधेरीला उतरणार होत्या.
मला हे माहित झाले कारण त्या दोघींपैकी एक साधारण ६०-६५ वर्षांची असेल माझ्याकडे येऊन विचारत होती की "ही ट्रेन अंधेरीला जाईल ना?"
मी 'हो' म्हटले तरी ती माझ्यासमोरच बसून राहिली.
काहीतरी बोलायचे म्हणून मी विचारले, "एकट्याच कुठे गेला होता?"
त्यांना बहुतेक ऐकू कमी येत असावे. त्यांचे असंदिग्ध उत्तर ऐकून मी पुन्हा दोनदा विचारले. शेवटी त्या म्हणाल्या "एकटी नाही, आईला घेऊन चालले." एवढे बोलून ती उठली आणि तिच्या आईजवळ गेली.
मी क्षणभर विचारत पडले. ज्या बाईला स्वत:लाच आता प्रवासात तिच्या मुलांनी किंवा कोणीतरी सोबत करायची गरज आहे, ती आईला सांभाळत आहे. तिची आई अतिशय वृद्ध आणि कृश दिसत होती.
मी पुन्हा काही क्षण डब्यात नजर फिरवली. झोपलेल्या 'त्या' म्हातारीकडे पाहिले. ती शेवटच्या स्टेशनवर उतरणार असेल असा अंदाज बांधला. ट्रेन निघायला आणि मग दादरला पोहचायला वेळ लागणार होता. पहाटेच्या शांततेत रेल्वेच्या सूचनांचा आवाज जरा जास्तच मोठा वाटत होता. मग मीही रिकाम्या बाकावर आडवी झाले. दिल्लीपासून ३० तास सलग केलेल्या प्रवासाने थोडा थकवा आलेला होताच आणि पहाटे साडेतीनला उतरायचे असल्यामुळे आणि सोबत कुणीही नसल्याने अर्थातच रात्रभर नीट झोपू शकले नव्हते. ट्रेन निघाली, मी आडवी होऊनही सावध झोपले होते. पुढील स्टेशन कांदिवली, मालाड, गोरेगाव अशा सूचना कानावर पडतच होत्या. अंधेरी स्टेशन आले तेव्हा एकदा उठून बसले. त्या दोन आज्जी त्यांच्या पिशव्या घेऊन उतरल्या. ते पाहिले आणि मी पुन्हा आडवी झाले. डोळा केव्हा आणि कसा लागला ते अजूनही आठवत नाहीये. पण "पुढील स्टेशन एल्फिन्स्टन रोड' कानावर आदळले आणि मी खाडकन जागी झाले.
'छे! आधीच वैतागले आहे आणि पुन्हा दादरसाठी दुसरी ट्रेन पकडून मागे जावे लागणार.'
पटकन सामान उचलले आणि उतरले. तेव्हा माझ्यासोबत ती झोपलेली आज्जीही उतरली होती. 'मी चुकून जरी या स्टेशनवर आले असले तरी माघारी जाण्यासाठी एक तिकीट घ्यावे लागणार' हा विचार चारदा आला पण कंटाळा, आळस आणि बेपर्वाई या गोष्टींनी त्यावर मात केली. माझ्यासारखेच असे किती विनातिकीट प्रवास झाले असतील ज्याची कुठेच नोंद नाही. तिकीट न घेताच मी उलट दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत एका बाकावर बसले.
तेवढ्यात गोड आवाजात आणि मिश्किल हसत ती आज्जी म्हणाली, "मला दादरला उतरायचे होते पण जागच आली नाही."
मी तिच्याकडे पाहिले, ती स्मितहास्य करत होती, मीही हसले, म्हटलं "अहो, मलाही तिथेच उतरायचे होते."
दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. त्यांच्या हातातल्या पिशवीकडे मी नकळत पाहत होते.
मी काही विचारण्याआधी त्या स्वत:च म्हणाल्या "भाजी घेऊन जायचंय."
पिशवीचा आकार लक्षात घेऊन मी म्हटलं "विकण्यासाठी का?"
त्यांनी होकारार्थी मान डोलावली. मी पुढे विचारलं "कुठे विकता?"
म्हणाल्या "दादरला घेते आणि बोरिवलीला नेऊन विकते."
मी पाहत राहिले. ६०-७० वर्षाची बाई. चेहऱ्यावरील सुरकुत्याच तेवढे वय दर्शवत होत्या. गळाबंद आणि कोपरापर्यंत लांब बाह्या असलेला ब्लाउज, साडीसारखे काहीतरी (पण साडी नक्कीच नाही) कापड अंगभर गुंडाळलेले, मान मागे पुढे डुलते आहे. साधारण साडेचार फूट उंची, पाठीला थोडासा बाक, आवाज अतिशय गोड आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य, प्रसन्न आणि तेजस्वी मुद्रा.
पहाटे चारच्या ट्रेनने प्रवास करून रोज भाजी विकते. दिवसाला ७०-८०रु.ची कमाई होत असेल की नाही कोणास ठाऊक! या वयात त्या करत असलेल्या कष्टांचे कौतुक वाटले तसेच थोडे दु:खही वाटले. घरी कोण असते विचारावे वाटले, तुम्ही या वयात ही धडपड का करता विचारावे वाटले, कधीपासून हे काम करता विचारावे वाटले, दिवसाला किती पैसे सुटतात विचारावे वाटले. पण मी विचारले काहीच नाही. त्या प्रसन्न चेहऱ्यावर चुकुनही दु:खाची छटा नको दिसायला असे वाटले.
जी काही परिस्थिती असेल त्यांची, त्यातही त्या आनंदी आहेत हे पाहून समाधान वाटले. ट्रेन आली, आम्ही दोघी चढलो आणि दोघीही दादरला उतरलो. त्या त्यांच्या मार्गे गेल्या, मी पुढे आले.
काही मिनिटांची आणि चार-पाच वाक्यांची ही भेट.