Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

कहाणी-Kshama Shelar

$
0
0

छान आहे ही कथा...समोर बसून ऐकावी तशी ऐकत गेलो. श्रावणातल्या कथा अशा ऐकायचो. आईकडून!

कहाणी – क्षमा शेलार

कलियुगातली ही कथा. आटपाट नगर होतं. तेथ विठ्ठल रुक्मिणी रहात असत. अहो, पंढरीचा विठोबा नव्हे. श्री विठ्ठलपंत देशमुख आणीक रखुमाई देशमुख. त्यांना बरीच वर्षे मूलबाळ नव्हते. नवस केले, सायास केले.साती आसरा पुजल्या पण उपेग झाला नाही.

रखमा झुरे. विठ्ठलपंत म्हणत.

"रखमाई कष्टी होऊ नका. सोसले पाहिजे."

पण रखुमाईने अट्टाहासच केला होता. येके दिशी धुणी धुण्यास तळ्याच्या पाळी गेली असता तिज म्हातारी सवाशीण भेटली. तिनं रखुमाईस चार बोधाच्या गोष्टी सांगितल्या आणि कानात येक व्रत सांगितले. वर म्हणाली ,

"बाई उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको."

रखुमाई निजभावाने म्हटली,

"उतणार नाही मातणार नाही

घेतला वसा टाकणार नाही."

म्हाताऱ्या सवाष्णीने सांगितल्याप्रमाणे रखुमाईने अपत्य प्राप्ती साठी उग्र व्रत केले. देव प्रसन्न झाला आणि येका शुभदिनी रखमाबाईला आवळीजावळी दोन लेकरं झाली. काही पळे मोठा असणारा तो धनाजी आणि त्याहून धाकला तो संताजी. आईबापानं कवतिके बाळलेणी केली. बंद्या येक रूपयाचे पेढे वाटले.

दोघे येकमेकांसवे वाढू लागली. रखुमाईस त्यांचे आवरता आवरता पूरे पूरे होई. रखुमाई म्हणे,

'माझी बाळे हसतात कशी जणू नभीच्या चांदण्या अंगणी सांडतात.

दोघे झोपली की तिने कवतिके म्हणावे,

"माझी बाळे झोपी गेली

शिंपल्यात मोत्ये बंद झाली"

दोघेजण येकमेकांसवे खेळत. येक थाळीत जेवत. विठ्ठलपंत म्हणत,

"सत्ययुगी राम-लक्ष्मण, द्वापारयुगी कृष्ण-बलराम आणि कलीयुगी माझी लेकरे आहेत. मोठ्या मौजेचे दिवस चालले होते.

मुले अठरा वर्षांची झाली. पंत थकले होते. त्यांनी रितसर म्रुत्युपत्र करावयास घेतले. क्षेत्राची वाटणी केली. पळसपाटीचं क्षेत्र थोरल्याला आणिक आमराई असणारं वाढ्याचं क्षेत्र धाकल्याला. आईबापांस वाटले, लेकरे आता पुष्कळच सुखी होतील आणि दोघेही मायबापे निजधामास चालती झाली. बिचारी निवांतपणे गेली. त्यांनी त्यांच्या दृष्टीने अवघे प्रश्न सोडविले होते परंतु त्यांस काय ठावे, भविष्याचे प्रश्न कित्येक जरी सोडविले तरी दशांगुळे उरतातच.

कुणा कपट्याला दोघा भावंडांचे प्रेम देखवले नाही त्याने थोरल्याचे कान फुंकले. मनात अवघे गरळ भरले. थोरला म्हणु गेला.

“आमराई मला हवी. धाकल्यापास कसा सांभाळ होणार?”

धाकला म्हणे,

“मी धाकला, कवतिकाचा.म्हणून आमराई मला दिली.

दोघेही तावातावाने पंचांकडे गेली. पंचांनी कचेरीत पाठविले. कचेरीतून न्यायालयात प्रकरण गेले. दर अमावस्या पौर्णिमेला तारखा पडत. अशा कित्येक वर्षांच्या कित्येक चंद्रकला गेल्या. या युद्धकांडा पायी दोघे जवळपास दरीद्री नारायण झाले. सर्वे आप्तमित्र दुरावले. अवघा उन्हाळा उन्हाळा झाला. दोघांस मुली देखील सांगून आल्या नाहीत. पण प्रकरणाची तड काही लागेना. येके दिवशी थोरल्याचा संयम सुटला. त्याने न्यायालयाचा उपमर्द केला.

न्यायाधीशसाहेब पुष्कळ रागेजले,

"या बेअदबी मनुष्यास तुरुंगात टाका.अन्यथा दंड भरा."

दंड भरावयास कोण होते? ना सगा ना सोयरा. न्यायाधीशांचे बोल धाकल्याने ऐकले मात्र जणू वज्राघात झाला. धाकला मनी झुरू लागला. ''हे मी काय विपरित करून बसलो आहे? माझा अवघा विवेक कुठे गेला? मज दुराचारीचा धिक्कार असो.धिक् धिक्..."

धाकल्याने निग्रह केला. पळभरात त्याने स्वतःचे रुप्याचे कंकण उतरविले आणीक सावकारापास जाता झाला. जेवढी मिळाली तेवढी नाणी घेऊन न्यायालयात आला. दंड भरला आणीक थोरल्यास घेऊन घरी आला. एव्हाना थोरल्यासही उपरती झाली. व्यर्थ गेल्या काळाबद्दल व्यर्थ चिंता न करता दोघे येक होऊन राहीली. घरे नांदतीजागती झाली.

इति

साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>