पकडू नये कुणालाच...कधी...एखाद्या व्यक्तीला पकडणे....म्हणजे तिला लहान करून टाकणे आहे. तिचा अवकाश बंदिस्त करणे आहे.
काजळ - सौ.तनुजा कुलकर्णी चाटुफळे
किती घाई रे तुला माझी प्रत्येक भावना शब्दांत पकडायची .
किती रंगांच्या भावनांनी माझं मन भरून गेलंय तुला माहितीये?......असतीलही इंद्रधनुष्यात सात रंग पण माझ्या भावनांचे रंग बघ ना..........
हे काय मोजतोयस तू? माझ्या भावनांचे रंग?
वेडा होशील, हजारो लाखो रंगांच्या,लाख मोलाच्या माझ्या भावना,माझं मन भरून उरल्यात त्या, डोळ्यांतून भरून वाहतायत त्या...
तुझा मात्र वेडा हट्ट, त्या शब्दबद्ध करण्याचा. तू तुझा पुरुषार्थ मिरवलास जगभर, म्हणून तुला माझं
प्रेम सुद्धा मिरवायचय जगभर या शब्दात बांधून............
पण शब्दांमधून जातील त्या याच्या त्याच्या तोंडी आणि होतील जखमी........
माझं प्रेम, भावना बेरंग होऊन जाईल सगळं. म्हणूनच म्हणते, नको ना बांधून ठेऊ त्यांना शब्दशृंखलात. तूच फक्त वाच माझ्या डोळ्यांतून आणि साठवत रहा तुझ्या रिकाम्या डोळ्यांत.
जन्मभरासाठी आठवणींचं काजळ बनून रहातील त्या.
सौ.तनुजा कुलकर्णी चाटुफळे