अक्षयने व्यक्तिचित्रण काय अफाट केले आहे...शाब्बास अक्षय वाटवे.....
विक्रम
दरिद्री – अक्षय प्रभाकर वाटवे
गंपू भटजी सत्यनारायणाची कथा सांगून तावातावाने घरी आला. ओसरीवर बसला. आतल्या आत स्वतःशीच वाद घालत... करवादत. ओट्यावरचं पानाचं ताट त्याने समोर ओढून घेतलं आणि आत आवाज दिला.
‘आयकलां... चाहचो घोट मिळणारें का मस.. अगों अजून परबांच्या अवाठातला सत्यनारायण पुजायचांय.. ‘
‘करवदतायशे.. काय झालां तुम्हास आरडायस..? सावतान गणपती पूजनात नारळ ठेवायस नाय काय...? का तांदूळ कमी घातलान?’ आतून प्रश्न आला.
‘मेलों फटकेचो वाको येंवो त्या सावत्यास आणि त्याच्या मुंबैकर पोरांस.. मी बाळ्याला आजच सांगणारांय. मासं तुझां हे गावाचां भटपणच नकों. मेलें भटाची चेष्टा करतांत. हे मुंबैकारांक सत्यनारायणाच्या कथेतलो दरिद्री ब्राह्मण दिसतां. तेंस, तुमच्या पाचवीं पासून बाराव्या पर्यंत सगळीकडे धावणारो भट दिसत नाय..? मुंबईत सायबाकडे काम करून घ्यायचा असलां का परस्पर रामेश्वरावर एकादशणी करून प्रसाद पाठवां, गाऱ्हाणां घाला म्हणून तार ठोकतास तेव्हां तुम्हांस हाच दरिद्री ब्राह्मण लागतो मां? मेलें चेष्टा करतायत माझी.’ गंपू भटाची शीरच तडकली..
हा प्रकार तिला नवीन नव्हता. कित्येक वर्ष झाली... हे असच होतं आणि तो कथेतला दरिद्री ब्राह्मणही तसाच होता. आणि गंपू भटाची टिंगलही होतच होती.. भटणीला आजकाल गंपूचाच राग येऊ लागला होता.
‘अहो अशें काय करतांय? कथेत जां लिहून ठेवलांय तां काय तुमी बदलणारांय काय..? आणि तुमीय काय बागायदार नाय मोटे. तुमच्या नाकांस मिरचे झोंबायस.. दादा सांगी तां गोयातला देऊळ अखरे खा, तेवा तेरम चढलेले नाय तुमाला? मग आता दरिद्री ब्राह्मण म्हणून हिणवलेनी तर काय भोका पडली अंगास..? पेज देते ती प्या आणि पुढल्या आवठातला उरकून या.. मगे बघूया कायता. तुमच्या सत्यनारायणाचा आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचा.’ भटीण ठसक्यात ओच्याला हात पुसत आत गेली.
एवढ्यात ‘भटजीनू तार.’ असं म्हणत पोस्टमन ओसरीवर आला.. ‘काय हाय अभिषेक काय एकादशणी?’ ‘नाय हो भटजींनू. ता...’ ‘मग काय लघुरुद्र लिहिलाय कांय ?’ गंपू भटजीच्या आशा पल्लवित झाल्या. तीनेकशे रुपयांचा हिशोब मनाशी घालत त्याने विचारले. ‘नाय हो भटजीनू..’ ‘काय मेल्या नायरो लावलय, हाड बघूया तार इकडे ती.’ असं म्हणत गंपूने पोस्टमनच्या हातातली तार हिसकावून घेतली. साशंक मानाने तो तारेवरून नजर फिरवायला लागला... आणि तो ओरडलाच. .‘अगो ऐकलास बाहेर ये आधी.. अगो येतेस मा...’ गंपू भटजीचा धीर निघत नव्हता. ‘काय झालाय तुम्हास..आरडायस?’ भटणीला पुढे काही बोलूच न देता गंपू म्हणाला...
‘अगो.. आपला चिंतू.. कलेक्टर झालाय कलेक्टर.. हायस कुठे? आता सरकारी बंगला, गाडी सगळा मिळणार.. अगो ही काय तार आलीये.. ही बाघ..’ असं म्हणत गंपूने तार फडफडवली... भटणीच्या नजरे समोरून इतिहास सरकला.. प्राथमिक शाळेत... मॅट्रिकच्या परीक्षेत कधीच चिंतूने पहिला नंबर सोडला नाही. परिस्थिती नसताना पुण्यात राहून शिकला. आणि आज कलेक्टर झाला. भटणीच्या तळहाताला घाम फुटत होता.. ती लगबगीने आत गेली आणि साखर आणून त्या पोस्टमनच्या हातावर घातली.
गंपूभट ओसरीवर बसून आपले अश्रू लपवत सत्यनारायणाची पोथी घेऊन कथेतला ‘दरिद्री’ शब्द खोडून काढत होता..